Sunday, September 19, 2010

आरोग्यासाठी चक्रोपासना

डॉ. श्री बालाजी तांबे

आयुर्वेदातील त्रिदोष आणि योगशास्त्रातील षट्‌चक्रे यांच्यातील दुवा पंचमहाभूतांच्या साह्याने साधता येतो. सहाही चक्रांपैकी शेवटचे सहस्रदल चक्र सोडले, तर इतर पाचही चक्रांचा कोणत्या ना कोणत्या महाभूताशी संबंध सांगितलेला आहे. आयुर्वेदातही कोणत्या महाभूतांच्या संयोगाने कोणते दोष तयार होतात, हे समजावलेले आहे. षट्‌चक्रांचे स्थान, त्यांचे गुण, त्यांचे रंग यावरूनही षट्‌चक्रांचा आरोग्याशी असलेला संबंध लक्षात घेता येतो. 
प्रसन्न आत्मेन्द्रियमनः स्वस्थमित्यभिधीयते ।
म्हणजे "मन, इंद्रिये आणि आत्मा यांचे प्रसन्नत्व हे खरे आरोग्य' अशी आरोग्याची व्याख्या आयुर्वेदाने केली. फक्‍त रोगनिवारण नव्हे, तर आरोग्यरक्षण हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असेही सांगितले, यावरून आयुर्वेदशास्त्र अमर्याद आहे हे लक्षात येऊ शकते.

औषध घेण्याने, मसाज, स्वेदनादी उपचार घेण्याने किंवा शस्त्रकर्म करण्याने संपूर्ण आरोग्य मिळेलच असे नाही. आयुर्वेदाला अभिप्रेत असणारे सर्वांगीण आरोग्य मिळविण्याचे प्रयत्न करायचे असतील, तर शारीरिक व मानसिक पातळीच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. यासाठी चक्रोपासना उपयोगी पडू शकते. आयुर्वेदशास्त्राचा सख्खा जोडीदार म्हणजे योगशास्त्र. षट्‌चक्र, चक्रोपासना हे विषय योगशास्त्राचे असले तरी यांचा आधार घेण्याने आयुर्वेदाचाही मूळ उद्देश साध्य होण्यास मदत होऊ शकते.

आयुर्वेदातील त्रिदोष आणि योगशास्त्रातील षट्‌चक्रे यांच्यातील दुवा पंचमहाभूतांच्या साह्याने साधता येतो. सहाही चक्रांपैकी शेवटचे सहस्रदल चक्र सोडले, तर इतर पाचही चक्रांचा कोणत्या ना कोणत्या महाभूताशी संबंध सांगितलेला आहे. आयुर्वेदातही कोणत्या महाभूतांच्या संयोगाने कोणते दोष तयार होतात, हे समजावलेले आहे. षट्‌चक्रांचे स्थान, त्यांचे गुण, त्यांचे रंग यावरूनही षट्‌चक्रांचा आरोग्याशी असलेला संबंध लक्षात घेता येतो.

मूलाधार व स्वाधिष्ठान चक्रमूलाधार चक्र हे पहिले चक्र. या ठिकाणी पृथ्वीतत्त्वाचे आधिक्‍य असते. याचा गुण "गंध' आहे, तर रंग सोनेरी पिवळा असतो व ते मेरुदंडाच्या तळाशी स्थित असते. स्वाधिष्ठान चक्र हे त्यावरचे चक्र. या ठिकाणी जलतत्त्व असते. याचा गुण "चव' असतो, तर रंग पांढरा / चंदेरी असतो व ते ओटीपोटात असते.
पृथ्वी व जल महाभूताची जोडी जमणे स्वाभाविक असते. आयुर्वेदात या दोन तत्त्वांच्या संयोगातून कफदोष तयार होतो, असे सांगितले आहे. तसेच योगशास्त्रानुसारही ही दोन चक्रे एकमेकांशी संबंधित असल्याचे समजू शकते. या दोन्ही चक्रांचा एकत्रितपणे आरोग्यावर काय परिणाम होत असतो, हे आपण पाहणार आहोत.

मूलाधार आणि स्वाधिष्ठान या चक्रांचा प्रभाव गुद, मलाशय, मोठे आतडे, मूत्राशय, वृक्क, गर्भाशय, योनी, बीजाशय, प्रोस्टेट, वृषण, लिंग, पाय, कंबर वगैरे अवयवांवर असतो. या चक्रांतील दोषामुळे बद्धकोष्ठ, मूत्रविकार, लैंगिक विकार, शुक्रदोष, वंध्यत्व, कंबरदुखी, स्त्रियांच्या बाबतीत पाळीतील दोष, गर्भाशयाचे विकार वगैरे विकार होऊ शकतात. मूळव्याध, भगंदर, परिकर्तिका (फिशर) यासारख्या रोगांचे, तसेच मूतखडा, वृक्कहानी, प्रमेह यासारख्या विकारांचे मूळ या दोन चक्रांमधील बिघाडात असू शकते.

वातविकारांचे मूळ
आयुर्वेदाप्रमाणे शरीराचा खालचा एक तृतीयांश भाग वातदोषाच्या आधिपत्याखाली येतो. वातदोषाचे मुख्य स्थान मोठे आतडे व पक्वाशय असते. त्यामुळे विविध वातविकारांचे मूळही या दोन चक्रांमध्ये असू शकते. संधिवात, कंबरदुखी, अर्धांगवात, अंग सुन्न होणे, गृध्रसी (सायटिका), अंग सुकणे, अर्दित (चेहरा वाकडा होणे), अंग जखडणे, अमुक ठिकाणी स्फुरण होत राहणे, पायावरच्या वगैरे शिरा जाड होणे, निद्रानाश, शुक्रनाश, अस्वस्थता, अंग कडक होणे, स्पर्शज्ञान न होणे, चव न समजणे, वास न येणे, नजर कमकुवत होणे, यासारखे अनेक त्रास वातविकारात समाविष्ट होतात.
मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राचा अनेक शरीरव्यापार व्यवस्थित होण्यामध्येही महत्त्वाचा हातभार असतो. त्यातील काही महत्त्वाचे शरीरव्यापार पुढीलप्रमाणे सांगता येतील -

* मलप्रवर्तन क्रिया वेळच्या वेळी होणे व पोट साफ होणे.
* मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित होणे.
* स्त्रियांच्या बाबतीत पाळी वेळच्या वेळी येणे आणि रक्‍तस्राव वेदनारहित, गाठीरहित वगैरे असणे.
* गर्भधारणा होणे, गर्भाची वाढ व्यवस्थित होणे आणि योग्य वेळेला नैसर्गिक प्रसव होणे.
* गंधाचे व चवीचे ज्ञान होणे.
* स्पर्शज्ञान व्यवस्थित असणे.
* मन उत्साहित राहणे.

मनावर प्रभाव
चक्रांचा शरीरावयवांवर, शरीरव्यापारांवर जेवढा प्रभाव असतो, त्यापेक्षा त्यांचा काकणभर अधिक परिणाम मनावर असतो.
पृथ्वी महाभूत स्थिरता, सौष्ठवता, मजबुती, अचलता वगैरे गुणांनी परिपूर्ण असते, तर जल महाभूत उचित ओलावा, स्निग्धता, मार्दवता, प्रसन्नता वगैरे भावांचे कारण असते. दोन गोष्टींना जोडण्याचे कामही जल महाभूताच्या ओलाव्याशिवाय होऊ शकत नाही.

एखादा मूर्तिकार ज्याप्रमाणे मातीत योग्य प्रमाणात पाणी मिसळून, तिला नीट मळून सुबक मूर्ती तयार करतो, त्याचप्रमाणे पृथ्वी व जल महाभूताच्या संयोगाने म्हणजेच संतुलित मूलाधार, स्वाधिष्ठान चक्रांमुळे प्रभावी, कणखर व्यक्तिमत्त्वाचा लाभ होऊ शकतो. मनाची स्थिरता, सतत कार्यमग्न राहण्याची प्रेरणा, विषयाचे अचूक आकलन, निश्‍चित निर्णय घेण्याची क्षमता, हे सर्व मानसिक भावही पाठोपाठ येतात. याउलट या दोन चक्रांत दोष असला, तर गैरसमज, गोंधळ, आळस, अस्थिरता वगैरे मानसिक त्रास होऊ शकतात. चरकसंहितेत एक सूत्र आहे -

सर्वां हि चेष्टा वातेन स प्राणः प्राणिनां स्मृतः । तेनैव रोगा जायन्ते तेन चैवोपरुध्यते ।। ...चरक सूत्रस्थान
संतुलित वात शरीरातील सर्व कामे करतो, म्हणूनच "प्राण' म्हणवला जातो. परंतु हाच "प्राण'रूपी वात बिघडला तर त्यातून अनेक रोग होऊ शकतात. एवढेच नाही, तर मृत्यूही येऊ शकतो.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog


2 comments:

  1. डा. बालाजी तांबे नी लिहिलेले मी वाचले आहे. तसेच सम tv वर गीता भाष्य पण मी नियमित ऐकतो. एक छोटीसी अवघड परिस्थिती अशी आहे कि बालाजी तांबे हे मूळ विषय सोडून फापट पसाराच जास्त बोलतात. त्यामुळे होते काय कि श्रोत्याला मूळ विषयाचे आकलनच होत नाही. त्यामुळे मूळ विषयाचा विपर्यास होतो. मूळ विषयावर अन्याय होतो. पण सांगणार कुणाला, बालाजी तांबे नाव सध्या मोठे होते आहे ना. वाईट ह्याचे वाटते कि ज्या लोकांना काहीच माहित नाही त्यांना आपल्या संस्कृतीचे कदाचित चुकीचे दर्शन होईल. असो. माझे विचार मांडले कादाचीन माझी पण चूक असू शकते..

    ReplyDelete
  2. डा. बालाजी तांबे नी लिहिलेले मी वाचले आहे. तसेच सम tv वर गीता भाष्य पण मी नियमित ऐकतो. एक छोटीसी अवघड परिस्थिती अशी आहे कि बालाजी तांबे हे मूळ विषय सोडून फापट पसाराच जास्त बोलतात. त्यामुळे होते काय कि श्रोत्याला मूळ विषयाचे आकलनच होत नाही. त्यामुळे मूळ विषयाचा विपर्यास होतो. मूळ विषयावर अन्याय होतो. पण सांगणार कुणाला, बालाजी तांबे नाव सध्या मोठे होते आहे ना. वाईट ह्याचे वाटते कि ज्या लोकांना काहीच माहित नाही त्यांना आपल्या संस्कृतीचे कदाचित चुकीचे दर्शन होईल. असो. माझे विचार मांडले कादाचीन माझी पण चूक असू शकते..

    ReplyDelete

ad