Sunday, July 19, 2009

मूत्राघात

मूत्राघाता (किडनी फेल्युअर)चे प्रमाण वाढल्याचे अलीकडे आढळते. मूत्रपिंड निकामी होण्याची प्राथमिक लक्षणे विचारात घेऊ. प्रथमतः हे लक्षात घेणे आवश्‍यक आहे, की मूत्राघात प्रामुख्याने दोन प्रकारांत आढळतात.
(१) क्रॉनिक रिनल फेल्युअर, (२) ऍक्‍यूट रिनल फेल्युअर.
(१) क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये धीमेपणाने रोगवृद्धी होत असते. हळूहळू शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी व्हायला लागते. याचे कारण असे, की रक्तातील एक अतिमहत्त्वाचा घटक अल्क्‍युमिन हा लघवीवाटे जात असतो. अलीकडच्या काळात आपल्या जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळी घराघरातून आजीबाई असे. तिच्याजवळ परंपरेने चालत आलेला घरगुती औषधांचा बटवा असे. ती आपल्या नातवंडांची रोग लक्षणे विचारात घेऊन तिच्या दृष्टीने योग्य व आवश्‍यक औषधे योग्य त्या अनुपानांतून देत असे व आपल्या नातवंडांना सुदृढ व आरोग्यवान ठेवण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे बऱ्याचदा घरातून सुदृढ बालके असत. आजच्या जमान्यात बरीच नातवंडे आजीच्या संपर्कात नसतात. त्यामुळे आजी आपल्या नातवंडांची आरोग्यविषयक काळजी घेऊ शकत नाही.
आणखी आजच्या जमान्यातला महत्त्वाचा फरक म्हणजे घराघरातून जमिनीऐवजी लाद्यांचे प्रमाण वाढले आहे. आजकाल स्वच्छतेच्या नावाखाली लाद्या पुसल्या जातात. लाद्या पुसणे, त्या स्वच्छ करणे, ही अत्यंत आवश्‍यक गोष्ट आहे यात काही शंका नाही; परंतु घरातील लाद्यांमुळे आपण एक वेगळ्या प्रकारचे संकट आपल्यावर ओढवून घेतले आहे; कसे ते पाहा- आपल्या घरातील लहान मुलांनी लघवी केली की ती आपण लगेच पुसून टाकतो. पण घरात जमीन असल्यास ते मूत्र जमिनीत जिरते. काही वेळाने ती जागा पांढुरकी दिसू लागली की समजावे, त्या बाळाला लघवीतून खर (पांडूर, अल्क्‍युमिन) पडत आहे. या आजारावर पूर्वीच्या काळी आजीबाई आपल्या बटव्यातून योग्य औषधे काढून ती उगाळून आपल्या नातवंडांना चाटवत असे. आणि त्या आजारातून बरे करत असे. परंतु आता लहान मुलांच्या लघवीतून खर पडते ते बरेच दिवस कळत नाही. हळूहळू त्या बाळाचे रक्तनिर्मितीचे कार्य थांबते. त्याची मूत्रपिंडे निकामी होतात. तपासणी केल्यावर हे कळून येते. दोन-तीन महिन्यांच्या बालकातसुद्धा हा दोष आढळतो. अशी बालकेसुद्धा योग्य आयुर्वेदिक औषधानी चांगल्या तऱ्हेने बरी करता येतात.
जसे बालकात मूत्राघात होतात, तसेच कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना मूत्राघात होऊ शकतो. त्याला कारणेही खूप आहेत. या ठिकाणी आपण मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या घटकाचा विचार करू. (१) मूत्र मार्गात काही अडथळे निर्माण होतात, मूत्रमार्गात सूज येणे, पुळ्या किंवा गळू होणे, त्यामुळे मूत्रपिंडात योग्य प्रमाणात रक्त शुद्धीसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे रक्तातील विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे स्वाभाविकच मूत्रनिर्मितीचे प्रमाण कमी व्हायला लागते. तसेच लघवीतून पांडूर जायला लागतो. रुग्णांत रक्त क्षीणता व्हायला लागते. क्वचित काही रुग्णात नत्रयुक्त खाद्यान्नाचे नीट पचन होत नाही. त्यामुळे रक्तातील -बीयू एनचे प्रमाण वाढते. यकृत नीट कार्य करीत नाही. हेही एक मूत्राघाताचे कारण असते. यावर आयुर्वेदात उत्तम इलाज आहेत. योग्य पथ्य, योग्य वेळी व योग्य औषधांचे सेवन केल्यास मूत्राघात हा आजार मुळातून बरा होतो.
म. स. केळकर, अलिबाग, रायगड.

उपचार दम्यावर!

दमा अथवा अस्थमा ही रुग्णाला कासावीस करणारी श्‍वसनमार्गाची व्याधी आहे. पूर्वी प्रौढ वयात जास्त आढळून येणारा हा रोग सध्या मात्र सर्व वयोगटांतील माणसांमध्ये दिसून येत आहे व दम्याच्या रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.
निरोगी श्‍वसनसंस्था माणसाच्या शरीराला योग्य प्रमाणात ऑक्‍सिजन (प्राणवायू) पुरवते व त्यावर शरीरसंस्थेच्या अनेक क्रिया अवलंबून असतात, तसेच श्‍वसनामुळे शरीरात ऑक्‍सिजन व कार्बन डाय ऑक्‍साईडची योग्य पातळी राखली जाते. यासाठी नाक, श्‍वसननलिका, फुफ्फुसे व आलव्हिओली आणि त्या भोवतीचे रक्तवाहिन्यांचे जाळे इ. श्‍वसनसंस्थेच्या सर्व रचनांमध्ये आकुंचन व प्रसरण क्रिया योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे, तसेच भोवतालच्या बरगड्या, छाती व पोटामधील पडदा आणि श्‍वासाबरोबर आत येणाऱ्या कणांना अडवण्यासाठी सिलियाचीही योग्य रीतीने हालचाल होणे आवश्‍यक ठरते.
दम्याच्या रुग्णांमध्ये या श्‍वसनमार्गाला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे (External or Internal factors) सूज असते व त्यामध्ये स्राव (Mucus) जमा होतो. यामुळे श्‍वसनमार्गाची नैसर्गिक रुंदी कमी होते, तसेच या मार्गातील स्नायू आकुंचन पावल्यामुळे (bronchospasm) श्‍वसनमार्ग अधिकच अरुंद होतो. यामुळे श्‍वासोश्‍वास करण्यास अडथळा निर्माण होतो.

दम्याची कारणे ः
१) अनुवंशिकता, २) हवेचे प्रदूषण (धूळ, तंबाखू/ सिगारेटचा धूर, जळत्या लाकडांचा धूर, पेट्रोल/ डिझेलचा धूर, कारखान्यांचा धूर.) ३) कीटकनाशके, सेंट अथवा सुगंधी द्रव्यांचा वास, ४) केसाळ अथवा पिसे असणाऱ्या पाळीव प्राणी, पक्ष्यांचा सहवास, ५) सतत थंड व कोरड्या हवेत राहणे, ६) घरात अथवा आजूबाजूला दमटपणा व ओलसरपणा सतत असणे, ७) एखाद्या अन्नपदार्थाची (गहू, अंडे इ.) किंवा डबाबंद पदार्थात घातलेल्या एखाद्या घटकाची ऍलर्जी. ८) एखाद्या औषधाची ऍलर्जी, ९) सतत सर्दी, पडसे, सायनसचा त्रास असणे, १०) कारखान्यातील रासायनिक पदार्थांचा वास, कापसाचे कण, ११) फुलांचा वास अथवा परागकणांची ऍलर्जी, १२) सतत अपचनचा त्रास असणे, १३) अतिशय शारीरिक श्रम, १४) अत्याधिक मानसिक ताणतणाव, अस्वस्थता, दडपशाहीमुळे भावनांचा कोंडमारा होणे, १५) शरीराची प्रतिकारशक्ती एकंदरीत कमी असणे.
अर्थात वरीलपैकी कोणतेही कारण नसल्यामुळेसुद्धा दमा होऊ शकतो, तर वर सांगितलेल्या कोणत्याही कारणांमुळे शरीराची प्रतिक्रिया होते (श्‍वसनमार्ग आकुंचन पावणे) म्हणून दम्याला ठशरलींर्ळींश अळीुरू ऊळीशरीश असेही म्हटले जाते. म्हणून रुग्णाने थोडी जागरूकता ठेवून दम्याच्या लक्षणांपूर्वीचे कारण ओळखून त्या गोष्टीचा संपर्क टाळावा.

दम्याची लक्षणे
१) श्‍वास घ्यायला अतिशय त्रास, धाप लागणे,
२) सर्दी, खोकला,
३) छातीत जडपणा जाणवणे,
४) छातीतून आवाज येणे (थहशशूळपस),
५) बोलण्यास त्रास होणे,
६) रुग्णास अशक्तपणा, बेचैनी जाणवून तो घाबराघुबरा होतो.
७) झोपल्यावर त्रास वाढतो, तर बसल्यावर कमी होतो.
८) कधी कधी सारख्या दम्यामुळे रुग्ण चिडचिडा होतो.
९) चेहरा लाल होणे, मानेचे स्नायू ताठरणे, जीभ व नखे निळसर दिसणे ही घातक लक्षणे होत.
दम्याचा ऍटॅक काही मिनिटांपासून काही तास ते काही दिवसांपर्यंत राहू शकतो. आहार, विहार, आजूबाजूच्या वातावरणाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाय केले, तर दमा त्रासदायक ठरत नाही. मात्र ऍटॅक आल्यावर तातडीचे उपचार घेणेच योग्य ठरते. निसर्गोपचार व ऍक्‍युपंक्‍चरमुळे दम्याचा त्रास (ऍटॅक कमी होणे, सर्दी कमी प्रमाणात बाहेर पडणे, हुशारी वाटणे) निश्‍चितपणे कमी होऊ शकतो.

कोणती काळजी घ्यावी?
१) सर्वप्रथम अतिशय सकस व पूरक आहार घ्यावा. जेणेकरून जीवनसत्त्वे व पूर्ण प्रथिनांची कमतरता भरून निघेल व शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
२) पोषक आहार एकाच वेळी पोट जड होईपर्यंत न घेता थोड्या थोड्या प्रमाणात दिवसातून ४-५ वेळा घेणे. ८-१२-४-८ वाजता अशा दिवसाच्या आहाराचा आदर्श वेळ ठरतील. (आपल्या दिनक्रमानुसार यात थोडा बदल चालेल, मात्र रात्रीचे जेवण ८-८।। पर्यंत घ्यावेच.)
३) तळलेले पदार्थ व थंड पदार्थ, पाणी टाळावे. उलट कोमट पाणी दिवसभर घेतल्यास रुग्णास फायदाच होईल.
४) कोमट दुधामध्ये मध (१ चमचा चहाचा) घालून घ्यावे.
५) ७-८ तुळशीची पाने १/२ ग्लास पाण्यात घालून उकळावे. कोमट झाल्यावर प्यावे.
६) अनुलोम - विलोम, भस्त्रिका प्राणायाम योग्य पद्धतीने हळूहळू करत ५ मिनिटांपर्यंत नियमित रोज केले तरी खूप फायदा होतो. उजव्या नाकपुडीतून हवा घेऊन डाव्या नाकपुडीने हवा सोडणे असे १-१० अंक मोजेपर्यंत करावे.
७) सिद्धासन, भुजंगासन, सुप्त वज्रासन, मत्स्यासन, शवासन इ. आसने आधी नीट शिकून घेऊन करावीत. शिवमुद्राही १० मिनिटांपर्यंत करावी.
८) काही ऍक्‍युप्रेशर बिंदूंनाही दाब देऊन फायदा होतो.
९) ज्यांना शक्‍य असेल त्यांनी सकाळचे ऊन छातीवर व पाठीवर घ्यावे. (कडक ऊन नको) किंवा सोसवेल एवढ्या गरम कपड्याने छाती व पाठीकडची बाजू शेकावी.
१०) गरम पाण्याचा वाफारा नियमित घेणे व गरम पाण्याच्या गुळण्या करणे यामुळे सुद्धा रुग्णांना खूप आराम मिळतो.
११) आंघोळीच्या वेळी गरम पाण्याची (सोसवेल एवढेच) धार छातीवर व पाठीवर धरावी.
१२) सोन्याचा व चांदीचा छोटासा पत्रा अथवा तुकडा घालून उकळलेले पाणी रुग्णास प्यायला द्यावे.
१३) रुग्णाने मोकळ्या हवेत फिरून येणारी तरतरी अनुभवावी.
१४) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार करून ताणतणावांपासून दूर राहावे. मनातील भावनांचा व मतांचा निचरा वेळोवेळी योग्य पद्धतीने करावा.
१५) दिवसातील ५ मिनिटे तरी भगवंताचे नामस्मरण जरूर करावे.
१६) ज्या रुग्णांना तपकीर ओढण्याची, तंबाखू, पानमसाला खाण्याची व विडी/ सिगरेट ओढण्याची सवय असेल त्यांनी या गोष्टींपासून दूर राहावे.
१७) आहारात लसूण, पडवळ, दुधी भोपळा, चवळई इ. भाज्यांचा समावेश करावा.
स्वतःचा विकास साधताना औद्योगिक क्रांती व त्यामधून गतिमान झालेल्या जीवनशैलीच्या दुष्परिणामांना सामोरे जाताना मानवाची दमछाक होऊ लागली आहे. तेव्हा निसर्ग नियमांनुसार आहार, विहार व स्वनियंत्रित जीवनशैलीकडे वळता आले तर आपण दम्याला नक्कीच दम देऊ शकू!
डॉ. आरती साठे, मुंबई

मेंदूस्तवन

शरीराने विशेष बलाढ्य नसतानाही माणूस नावाच्या प्राण्याने पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना काबूत आणले ते सुमारे तीन पाउंड वजनाच्या मेंदूमुळे! इतर प्राण्यांमध्येही तो असतो; पण माणसात तो कमालीचा विकसित झाला. मेंदूमुळे विचारशक्ती आली. सत्‌-असत्‌ असा विवेक आला. भावना सूक्ष्म बनल्या. विचार, भावना व्यक्त करण्यासाठी वाणीची क्षमता विकसित झाली. निरनिराळ्या भाषा विकसित झाल्या. अस्तित्वातील प्रत्येक सूक्ष्म व स्थूल गोष्टीचा वेध घेणारी संशोधक वृत्ती आली.
निसर्गाने बनविलेल्या मेंदू या अद्‌भुत अवयवाविषयी आपण विचार करतो; त्याच्या क्षमतेचे, कार्याचे विश्‍लेषण करतो आणि त्यासाठीही आपण वापरतो तो मेंदूच! असंख्य मृत आणि जिवंत मेंदूंचा मेंदूच्याच साह्याने अभ्यास करूनही आपल्याला आपल्या मेंदूच्या पाच टक्‍क्‍यांहून अधिक गोष्टींविषयी माहिती नाही. म्हणजे मेंदूच्या पंचाण्णव टक्के कार्याविषयी आपण व शास्त्रज्ञ सारखेच अडाणी आहोत. त्यामुळे मेंदूचा ठासून वापर करणाऱ्या विचारवंतांनी त्यांची फुशारकी मारण्याची जरुरी नाही, तसेच मेंदूचा वापर हा आपल्यासाठी वैकल्पिक आहे, असा गोड गैरसमज करून घेऊन कलावंतांनी त्याची अफाट ताकद नजरेआड करू नये.
मेल्यानंतर मेंदूचे काप करता येतात; पण जिवंत मेंदू हा अर्धद्रव असतो. तो खास पोषण करणाऱ्या द्रव्यामध्ये कवटीच्या बंद पेटीत तरंगत असतो. मेंदूभोवती तीन आवरणे असतात. बाहेरून आतल्या क्रमाने त्यांची नावे "ड्यूरा', "ऍरेकनॉइड', आणि "पाया' अशी असतात. इतर अवयवांप्रमाणे मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे नसते. शिवाय मेंदूलगतचे "पाया' आवरण रक्तामध्ये फिरणाऱ्या जिवाणू- विषाणूंना, तसेच इतर अनेक रासायनिक व दूषित पदार्थांना मेंदूमध्ये शिरण्यास मज्जाव करते. या "पाया' आवरणाला "ब्लड-ब्रेन-ब्ररिअर' म्हणतात. या "कस्टम'मधून अल्कोहोल, निकोटिनसारखे मुरब्बी गुन्हेगार मात्र शिताफीने घुसतात आणि इतर अवयवांप्रमाणे मेंदूवरही घातक परिणाम करतात.
मेंदूमध्ये सुमारे दहा अब्ज पेशी असतात. मेंदूची प्रत्येक पेशी साठ हजार पेशींना जोडलेली असते. लहानपणापासून दररोज मेंदूच्या तीन हजार पेशी मरत असतात. मेंदू आणि हृदयाच्या पेशींना शरीरातल्या इतर पेशींप्रमाणे आपली आवृत्ती काढता येत नाही. त्यामुळे एकदा पेशी मेल्या, की तिथली जागा जोडणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या पेशी भरून काढतात. त्यामुळेच या दोन्ही पेशींचा कॅन्सरही होत नाही. कारण पेशी विभाजनाची प्रक्रिया नसल्यामुळे सदोष कॅन्सरपेशी निर्माण होण्याचे कारणच नाही. "ब्रेन ट्यूमर' म्हणून जे आपण ऐकतो वा चित्रपटात पाहतो, ते मेंदूच्या पेशींना जोडणाऱ्या मधल्या पेशींचे असतात.
ढोबळमानाने मेंदूचे तीन भाग पडतात. आकाराने सर्वांत मोठा असा "सेरेब्रम'. ज्याला डावा व उजवा असे दोन भाग असतात. स्वतःच्या इच्छेने होणारी, बुद्धीचा-तर्काचा वापर केली जाणारी कार्ये त्याच्यामार्फत होतात. स्मरणशक्तीच्या साह्याने साठवलेले माहितीचे भांडार सेरेब्रमच्या विविध भागात असते. दुसरा भाग म्हणजे लहान मेंदू. जो हालचालींमध्ये सफाईदारपणा आणण्यासाठी, शरीराचा तोल सांभाळण्यासाठी आणि प्रत्येक कृतीत व स्थितीत शरीराची ढब सांभाळण्यासाठी उपयुक्त असतो. तिसरा भाग म्हणजे मेंदूचे देठ- ब्रेनस्टेम. या आकाराने लहान असलेल्या भागात हृदयाची गती, श्‍वासाची गती वगैरे अनैच्छिक क्रियांची नियंत्रणकेंद्रके असतात.
मेंदूमधून शरीराकडे येणारे सर्व संदेश ब्रेनस्टेममधूनच मज्जारज्जूमध्ये येतात.
मेंदूच्या या देठाच्या शेजारी "हायपोथलॅमस' नावाचा बोराच्या आकाराचा मेंदूचा "कारभारी' असतो. हायपोथलॅमसला मात्र भरपूर रक्तपुरवठा असतो. याचे कारण म्हणजे शरीराचे विशिष्ट तापमान टिकवणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवणे, तहान-भूक ओळखणे, रक्तातले साखरेचे प्रमाण ओळखणे, या सर्व महत्त्वाच्या सेवांचे "हेडऑफिस' या ठिकाणी आहे. हायपोथलॅमसचा विश्‍वासू सेवक म्हणजे "पिट्युटरी ग्रंथी'. तिच्या हाताखाली थायरॉइड, ऍड्रेनल इत्यादी ग्रंथी सरदार असतात. हायपोथलॅमस-पिट्युटरी आणि इतर ग्रंथींची ही अजब यंत्रणा संप्रेरकाच्या माध्यमातून नानाविध कार्ये करते.
मेंदूमधून शरीराच्या पेशींकडे व सर्व ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे संदेशाची देवाणघेवाण नसांच्या माध्यमातून केली जाते. ताशी २९० कि.मी. वेगाने हे संदेशवहन केले जाऊ शकते. मेंदूच्या आज्ञेशिवाय सूक्ष्मतमही हालचाल केली जात नाही. तसेच शरीराच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियांच्या प्रत्येक पेशीला प्रतिक्षणी होणारी माहिती मेंदूला कळल्याशिवाय राहत नाही.
डॉ. हिमांशू वझे

अन्नयोग - पालेभाज्या

मुळ्याची पाने

आपल्या आहारात पालेभाज्या असल्याच पाहिजेत. पण कोणत्या भाज्या कुणी खाव्यात, कुठे रुजलेल्या भाज्या खाऊ नयेत, हेही पाहायला हवे.
आपण चाकवत, तांदुळजा, पालक, माठ वगैरे पथ्यकर समजल्या जाणाऱ्या भाज्यांची माहिती घेतली. आज आपण अजून काही पालेभाज्यांबद्दलचे आयुर्वेदिक मत पाहणार आहोत.
आंबट चुका
चुक्रा त्वम्लतरा स्वाद्वी वातघ्नी कफपित्तकृत्‌ ।
रुच्या लघुतरा पाके वृन्ताकेनातिरोचनी ।।
...भावप्रकाश
आंबट पानांची ही भाजी स्वादिष्ट असते, वातशामक असते, मात्र कफपित्तकारक असते. पचायला हलकी असते व वांग्याच्या भाजीसह खाल्ल्यास खूप रुचकर असते. अन्नाचे पचन व शोषण योग्य प्रकारे होत नसताना चुक्‍याची भाजी आहारात ठेवणे चांगले असते. मात्र पित्तदोषाचा संबंध असताना किंवा आम्लपित्ताचा त्रास होणाऱ्यांनी ही भाजी जपून वापरावी.
अळू
अलुकं शीतलं चैव अग्निदीप्तिकरं तथा ।
स्तम्भकरं प्रोक्‍तं मधुरं तु जडं मतम्‌ ।।
रुक्षं वृष्यं दुर्जरं च बलवृद्धिकरं परम्‌ ।
स्तन्यकृन्मलमूत्राणां कफवायोश्‍च वृद्धिकृत्‌ ।।
...भावप्रकाश
अळूची भाजी थंड असते, मात्र पचायला जड असल्याने बद्धकोष्ठता निर्माण करणारी असते. अग्नीस प्रदीप्त करते. योग्य प्रमाणात सेवन केली असता स्तन्य वाढवते. मल, मूत्र, कफदोष आणि वायुदोष यांनाही वाढवते.
अधूनमधून थोड्या प्रमाणात अळूची भाजी खाणे ठीक असले तरी पोटात वायू धरण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अळूची भाजी न खाणेच चांगले. तसेच अळू सांडपाण्यावर वाढलेला नाही ना, याची खात्री करून मगच वापरावा.
करडई
कुसुम्भपत्रं मधुरमनेत्र्यमुष्णं कटु स्मृतम्‌ ।
अग्निदीप्तिकरं चातिरुच्यं रुक्षं गुरु स्मृतम्‌ ।।
सरं पित्तकरं चाम्लं गुदरोगकरं मतम्‌ ।।
...निघण्टु रत्नाकर
करडईची भाजी चवीला आंबटगोड पण विपाकाने तिखट असते, म्हणूनच उष्ण स्वभावाची असते. डोळ्यांसाठी अहितकर असते. अग्नी प्रदीप्त करते, रुचकर असते, रुक्ष गुणांची असते, पचायला जड असते, पित्त वाढवते, सारक असते. अति प्रमाणात सेवन केल्यास गुदरोग तयार करू शकते.
उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी करडईची भाजी फारशी खाऊ नये. करडईच्या तेलामुळे रक्‍तदोष उत्पन्न होऊ शकतो, असेही शास्त्रवचन आहे.
अंबाडी
स्याद्‌ अम्लवाटी कटुकाम्लतिक्‍ता तीक्ष्णा तथोष्णा मुखपाककर्ती ।
विदाहपित्तास्रविकोपनी चविष्टम्भदा वातनिबर्हणी च ।।
...निघण्टु रत्नाकर
अंबाडीची भाजी चवीला आंबट, तिखट व कडवट असते, उष्ण, तीक्ष्ण गुणाची असते, बद्धकोष्ठता निर्माण करू शकते. अंबाडीची भाजी नियमितपणे खाल्ल्यास तोंड येऊ शकते, रक्‍तपित्ताचा त्रास होऊ शकतो.
अंबाडीची जून झालेली भाजी अजिबात खाऊ नये. त्यामुळे पोटदुखी, शौचाला खडा होणे वगैरे त्रास होऊ शकतो.
घोळाची भाजी
लोणी रुक्षा स्मृता गुर्वी वातश्‍लेष्महरी पटुः ।
अर्शोघ्नी दीपनी चाम्ला मन्दाग्नि विषनाशिनी ।।
...भावप्रकाश
घोळाची भाजी चवीला आंबट, खारट असते, रुक्षता वाढवते, पचायला जड असते, वात तसेच कफदोष कमी करते. उष्ण वीर्याची असल्याने मंदाग्नीमध्ये हितकर असते. शरीरातील विषद्रव्यांचा नाश करते. मूळव्याधीमध्ये हितकर असते.
मुळ्याच्या पानांची भाजी
पाचनं लघु रुच्योष्णं पत्रं मूलकजं नवम्‌ ।
स्नेहस्निग्धं त्रिदोषघ्नं असिद्धं कफपित्तकृत्‌ ।।
...भावप्रकाश
मुळ्याची कोवळी पानेच वापरावीत. कोवळी पाने पचायला हलकी असतात. उष्ण वीर्याची असल्याने पचन करतात. तेल-तुपासह शिजवली असता त्रिदोषांचे शमन करतात. मात्र कच्ची खाल्ली असता कफ-पित्तदोष वाढवितात.
- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405

'इ' जीवनसत्त्वाचा शारीरिक क्षमतेशी संबंध

वृद्धपणी माणसांची शारीरिक क्षमता कमी होते, हा आपला सर्वसाधारण अनुभव आहे. पण प्रत्येकाचीच क्षमता विशिष्ट वर्षानंतर कमी होते असे नाही. एखादी व्यक्ती साठीनंतरच शारीरिकदृष्ट्या अक्षम बनलेली दिसते, तर काही जण नव्वदी पार केल्यानंतरही मस्त मजेत दिसतात. असे का होते?
एका अमेरिकी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार "इ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे शारीरिक क्षमता कमी होते. किंबहुना, "इ' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच माणसाला वृद्धत्त्व गाठते. म्हणजेच "इ' जीवनसत्त्वाचा पुरवठा शरीराला केला तर वृद्धत्त्व जरासे लांबवता येऊ शकेल, असे या विद्यापीठातील अभ्यासकांना वाटते.
अमेरिकन मेडिकल असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या या माहितीनुसार, फ्लोरेन्स शहराच्या आसपास स्कूल ऑफ मेडिसिन (येल विद्यापीठ) तर्फे हा अभ्यास करण्यात आला. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सुमारे ६९८ जणांची शारीरिक क्षमता तपासण्यात आली. ज्यांची शारीरिक क्षमता कमी होती त्या सर्वांमध्ये "इ' जीवनसत्त्वाची कमतरता आढळली.
सुमारे तीन वर्षे हे अध्ययन सुरू होते. या काळात ज्यांची शारीरिक क्षमता कमी आढळली त्यांना "इ' जीवनसत्त्व देण्यात आले. त्यावेळी त्यांची ताकद त्या काळात वाढलेली दिसली. "फॉलेट', "बी - ६', "बी - १२' आणि "ड' या जीवनसत्त्वांचा काही परीणाम होतो का, हेही पाहण्यात आले. पण तसा काही संबंध आढळला नाही.
शरीरातील पेशींच्या विघटनामुळे होणारे शरीराचे नुकसान "इ' जीवनसत्त्वामुळे टाळले जाते. तसेच, "इ' जीवनसत्त्वामुळे तांबड्या रक्तपेशी बनण्यास मदत होते.
वृद्ध व्यक्तींची शारीरिक क्षमता "इ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे कमी झालेली आढळल्यानंतर कुपोषितांबाबतही काही चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, कुपोषणात आणखीही काही गोष्टींचा अंतर्भाव असल्याने याबाबत नेमक्‍या निष्कर्षांपर्यंत अभ्यासकांना पोहोचता आले नाही.

घेतले शरीर जाणुनी

'सकाळ'ने आरोग्यविषयक प्रबोधनासाठी २००३ मध्ये "फॅमिली डॉक्‍टर' ही पुरवणी सुरू केली. गेली सहा वर्षे या पुरवणीद्वारे भारतीय जीवनशास्त्राच्या आधारे प्रबोधन केले जात आहे. या पुरवणीच्या पहिल्या शंभर अंकांत कोणकोणत्या विषयांची हाताळणी केली गेली, याचा हा आढावा....
आरोग्य ही प्रत्येक जिवाची मूलभूत आवश्‍यकता आहे असे म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरू नये. आरोग्य हा जणू जीवनाचा सहजभाव असतो. जिवंत आहे म्हणून जगणे, हे काही खरे जगणे नाही. जीवनाचा आनंद घेत, अनुभव घेत अधिकाधिक संपन्न पद्धतीने जगण्याला जगणे म्हणायला हवे, पण त्यासाठी आरोग्य आवश्‍यक असते. म्हणूनच म्हणतात,
सर्वमन्यत्‌ परित्यज्य शरीरं अनुपालयेत्‌ ।
अन्य सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे. कारण शरीर अर्थात आरोग्य असेपर्यंतच जीवनाला संपन्न बनविण्याची, जीवन खऱ्या अर्थाने जगण्याची धमक असते. म्हणूनच आरोग्याचे रक्षण आणि रोगापासून खऱ्या अर्थाने मुक्‍तता हे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य समजायला हवे. याच उद्देशाने २००३ मध्ये आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांच्या पूजनदिनी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी "फॅमिली डॉक्‍टर' ही पुरवणी सुरू केली.
जीवनशास्त्राची माहिती
यामधून जनमानसामध्ये आरोग्याच्या दृष्टीने जागरुकता निर्माण होणे अपेक्षित होतेच, तसेच सर्वसामान्यांना एकंदर वैद्यकशास्त्राची तोंडओळख व्हावी, हीसुद्धा इच्छा होती. आधुनिक वैद्यकशास्त्रे असोत की हजारो-लाखो वर्षांची परंपरा लाभलेली आपली आयुर्वेद, योग वगैरे शास्त्रे असोत, ती मुळात तयार झाली ती जनकल्याणाच्या हेतूने. शास्त्र म्हणून ती योग्य हातात जायला पाहिजेत हे जितके खरे, तितकेच ज्यांच्यासाठी ती तयार झाली त्यांच्यापासून ती अगदीच नामानिराळी राहायला नकोत, हेही खरे.
"फॅमिली डॉक्‍टर'ने नेमके हेच काम केले. विशेषतः आरोग्यशास्त्र किंवा जीवनशास्त्र म्हणायला हवे अशा आयुर्वेदशास्त्राची शास्त्रोक्‍त माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी "फॅमिली डॉक्‍टर' कमालीचा यशस्वी ठरला. लहान मुलाला अ, आ, इ, ई पासून भाषा शिकवावी त्याप्रमाणे आरोग्यासंबंधी सर्व विषयांची मूलभूत माहिती साध्या व सोप्या भाषेत देणे हे "फॅमिली डॉक्‍टर'चे वैशिष्ट्य समजावे लागेल. यामुळे आजपर्यंत गुपित असलेले ज्ञानाचे भांडार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी तर मोकळे झालेच. शिवाय वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना, अगदी वैद्यक व्यवसायातील मंडळींनाही साध्या भाषेत समजावलेली ही शास्त्रवचने उपयुक्‍त ठरली.
जीवनशास्त्र असणाऱ्या आयुर्वेदशास्त्रातली अनेक तत्त्वे आपणा भारतीयांच्या जीवनशैलीत आपोआप रुजलेली आहेत. पण परंपरा म्हणून चालत आलेल्या या नियमांना, चालीरीतींना शास्त्राचा भक्कम पाया आहे हे समजणे अतिशय आवश्‍यक होते. "फॅमिली डॉक्‍टर'मधील 'आयुर्वेद उवाच' या लेखमालेने हे काम करायचे ठरविले. आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आयुर्वेदाने सांगितलेले स्वस्थवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या वगैरे विषय अगदी साध्या भाषेत मांडले. नुसते मांडले असे नाही, तर ते प्रत्यक्ष जीवनात कसे आणायचे, याचेही मार्गदर्शन केले.
आयुर्वेदाचा गूढार्थ
कोणतेही शास्त्र म्हटले की त्या शास्त्राची म्हणून काही विशेष परिभाषा असते, विशिष्ट संज्ञा असतात. बऱ्याचदा या संज्ञांचे नुसते भाषांतर करणे पुरेसे नसते, तर त्या शास्त्राला अपेक्षित असणारी संकल्पना समजून घेणे आवश्‍यक असते. "आयुर्वेद उवाच' या लेखमालेतून आपण आयुर्वेदाच्या पारिभाषिक संज्ञा गूढार्थासह समजून घेतल्या.
आरोग्य हे कणाकणाने मिळवायचे असते. आहार, निद्रा, मैथुन वगैरे सहजभाव असणाऱ्या गोष्टींमध्ये संतुलन साधले तर काय फायदे होतात व त्यांच्या अति आहारी जाण्याने काय नुकसान होते, याविषयी माहिती आपण घेतली.
द्रव्यगुणविज्ञान हा आयुर्वेदातील महत्त्वाचा विषय. कोणती वस्तू कधी योग्य, कधी अयोग्य हे माहिती होण्यासाठी मुळात त्या वस्तूचे गुण-दोष माहिती हवेत. आयुर्वेदाने द्रव्यगुणविज्ञानातून हे काम अतिशय समर्पक रीतीने केलेले आहे. गोड, तिखट, कडू वगैरे चवी फक्‍त आवडीनिवडीपुरत्या मर्यादित नसतात, तर त्यांचा शरीरावर विशिष्ट परिणाम होत असतो, याविषयीची माहिती आपण घेतली. पदार्थातील गुण-दोषांचे ज्ञान होण्यासाठी त्याचे गुण, वीर्य, विपाक, प्रभाव, माहिती असणेही आवश्‍यक असते, या सर्वांची माहिती "फॅमिली डॉक्‍टर'मधल्या "आयुर्वेद उवाच'मधून घेतली.
यानंतर आपण महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची माहिती घेतली. बऱ्याच औषधी वनस्पती आपल्या आसपास उगवलेल्या असतात, पण ती औषधी आहे हे माहिती नसते किंवा तिचा औषध म्हणून घरच्या घरी कसा उपयोग करून घेता येईल याचे ज्ञान नसते. आयुर्वेद उवाचमधून वनस्पती दिसते कशी, वाढते कुठे, तिचे शास्त्रीय नाव काय, तिचे गुण, चव, वीर्य, विपाक, प्रभाव काय व त्यानुसार तिचे औषधी उपयोग काय असतात याविषयी थोडक्‍यात माहिती घेतली.
भारतीय शास्त्रांची ओळख
आयुर्वेद हे जसे आरोग्याचे शास्त्र आहे, तसेच इतर अनेक भारतीय शास्त्रे आहेत. ही सर्व शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. एका शास्त्रामध्ये निपुण व्हायचे असले तरी या पूरक शास्त्रांची ओळख असणे आवश्‍यक असते. त्या दृष्टीने न्यायशास्त्र, वैशेषिकशास्त्र वगैरे शास्त्रांची ओळख करून घेतली. आयुर्वेदाने शरीराची माहितीही अतिशय वेगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने दिलेली आहे. पंचभौतिक शरीराची माहिती करून घेण्यापूर्वी आपण पंचमहाभूते समजून घेतली. स्थूल शरीर म्हणजे काय, सूक्ष्म शरीर म्हणजे काय हे बघितले. प्रमाणबद्ध निरोगी शरीर कसे असावे हे पाहिले. हृदय, मेंदू, फुप्फुसे वगैरे महत्त्वाच्या अवयवांची आयुर्वेदोक्‍त माहिती बघितली तसेच मर्म संकल्पनाही समजून घेतली.
अशा प्रकारे "आयुर्वेद उवाच' ही लेखमाला आयुर्वेद म्हणजे काय हे समजावणारी होती. आयुर्वेदाच्या विद्यार्थ्याने जसा आयुर्वेदाचा अभ्यास करावा तसाच अभ्यास "आयुर्वेद उवाच' वाचून इतरांनाही करता आला. विषयाला समर्पक श्‍लोक आणि त्याचे साध्या स्पष्ट भाषेत स्पष्टीकरण असे "आयुर्वेद उवाच'चे स्वरूप असल्याने आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनाही हसतखेळत आयुर्वेद शिकता आला.
सर्वसामान्य वाचकांमध्ये आरोग्यजाणीव
"फॅमिली डॉक्‍टर'ने आजपर्यंत अनेक विषय हाताळले. आरोग्यरक्षण, रोगनिवारण, मनःशांती, योग, सौंदर्य, दीर्घायुष्य, तारुण्य, बुद्धिमत्ता असे विविध पण जीवनाभिमुख विषय "फॅमिली डॉक्‍टर'ने निवडले व लोकांपर्यंत पोचवले. यातून आरोग्याच्या संदर्भात उत्तम ज्ञानप्रबोधन होऊ शकले.
रोगाच्या नुसत्या नावावरून वास्तविक फारसे काही समजत नाही. अमुक रोग झाला म्हणजे शरीरात नेमके काय बिघडले? असा बिघाड होण्यामागे काय कारणे होती? रोगावर उपचार करण्यामुळे नेमके काय साधले जाणार आहे? घरातल्या इतरांना, विशेषतः पुढच्या पिढीला हा रोग संक्रामित होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी "फॅमिली डॉक्‍टर'मधील मुखपृष्ठ कथा वा स्तंभातून समजू शकल्या. आयुर्वेद हे ज्ञानाचे अगाध शास्त्र आहे आणि त्याचे वैशिष्ट्य असे, की त्याचा जेवढा अभ्यास करावा, जेवढे चिंतन करावे तेवढा त्याचा गूढार्थ अधिकाधिक स्पष्ट होत जातो. "फॅमिली डॉक्‍टर'मधील लेखामधून असा गूढार्थ लक्षात आल्याचा अनेक वैद्यांनीही सांगितले.
"फॅमिली डॉक्‍टर'च्या मुख्य विषयासंबंधी असणाऱ्या मुखपृष्ठ कथेतून डोळे, नाक, कान, त्वचा वगैरे इंद्रियांची माहिती घेतली, त्यांचे आरोग्य कसे सांभाळायचे, त्यासंबंधात कोणते त्रास होऊ शकतात, त्यावर कशा प्रकारचे उपचार होऊ शकतात वगैरे माहिती घेतली.
आधुनिक जीवनाचा भाग बनलेल्या ऍलर्जी, डोकेदुखी, आम्लपित्त, अपचन वगैरे त्रासांबद्दल पाहिले. स्थूलता, मधुमेह, दमा, रक्‍तदाब, मूळव्याध, संधिवात वगैरे पदोपदी आढळणाऱ्या आजारांविषयी जाणून घेतले. केस, त्वचा, स्तन, शरीरबांधा वगैरे सौंदर्यसंबंधित विषयही "फॅमिली डॉक्‍टर'मध्ये येऊन गेले. कोलेस्टेरॉल, डायट वगैरे सातत्याने चर्चेत असणाऱ्या विषयांची खरी माहिती "फॅमिली डॉक्‍टर'मधून लोकांसमोर मांडता आली. जनुकशास्त्र, किरणोत्सर्ग वगैरे आधुनिक विषयांचाही समावेश केला. मन म्हणजे काय, बुद्‌ध्यंक म्हणजे काय, स्मृती-विस्मृतीचा खेळ कसा असतो, जीवनात सकारात्मकता कशी आणायची या विषयांचेही मार्गदर्शन केले. तारुण्याचा खरा अर्थ, तारुण्य टिकविण्याचे उपाय, कायाकल्पाची संकल्पना जनसामान्यांपर्यंत आणण्याचे मोलाचे काम "फॅमिली डॉक्‍टर'ने केले.
हा होता "फॅमिली डॉक्‍टर'च्या पहिल्या १०० अंकांचा आढावा. पहिल्या १०० अंकांतच इतके विषय हाताळले तरी आजपर्यंत "फॅमिली डॉक्‍टर'चा प्रवास अखंडपणे चालू आहे.
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405