Monday, July 19, 2010

विज्ञान - तंत्रज्ञान : फळे पिकवणारी रसायने




आंबा हा फळांचा राजा मानला जातो. कारण वर्षांतून फक्त एकदाच हा आंबा आपल्याला मिळतो. तोही उन्हाळय़ातच. त्यामुळे या आंब्याची वाट आपण खूप पाहतो. विशेषत: लहान मुले! कोकणात तर आंब्याची खूप लागवड असते. दरवर्षी खूप आंबा परदेशातही कोकणातून जात असतो. अशा या आंब्याच्या व्यवहारात खूप परकीय चलनही आपल्याला मिळते. त्यामुळे आंबा हे महत्त्वपूर्ण फळ मानले जाते. असा हा आंबा लवकर तयार होण्यासाठी कच्च्या कैऱ्या काढून त्याची आढी तयार केली जाते व वातावरणातील उष्णतेने या कैऱ्या पिकू लागतात. त्यांचा हिरवा रंग बदलू लागतो व त्या तांबूस, लाल, गर्दलाल अशा मार्गाने पिवळा रंग धारण करतात व त्याची सालही पातळ होते. त्या पिकलेल्या आंब्याचा मधुर वास सर्वत्र दरवळतो. आंब्याने व वासाने मानवी मन बहरून येते. दरवर्षी नित्यनियमाने हे घडते. मध्यंतरी ‘लोकसत्ता’त एक बातमी अशी होती, की आंबा लवकर तयार व्हावा यासाठी रसायनाचा वापर केला गेला. तर अशा रसायनाचा वापर आंबा तयार करण्यासाठी- लवकर तयार होण्यासाठी केला जातो. तसेच केळीही लवकर तयार होण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. हे रसायन आहे कॅल्शियम कार्बाइड. या कॅल्शियम कार्बाइडचा संपर्क पाण्याशी आला तर त्यातून खूप उष्णता बाहेर पडते. या उष्णतेने आंबे, कैऱ्या लवकर पिकतात. तसेच कच्ची केळीही लवकर पिकविण्यासाठी याच रसायनांचा वापर केला जातो. परंतु या पद्धतीने पिकविलेले आंबे व केळी यांच्या मूळ चवीत फरक पडतो व त्या आंब्यांना, केळय़ांना एक विशिष्ट वास येतो. काही वेळा कच्च्या कैऱ्यांच्या आढीत या कॅल्शियम कार्बाइडच्या पुडय़ा ठेवल्या जातात व त्या पुडय़ांवर थोडे पाणी शिंपडून उष्णता निर्माण केली जाते. त्या उष्णतेने कैऱ्या लवकर पिकतात असे आढळते. काही वर्षांपूर्वी एका पोलीस स्टेशनकडून असे एक प्रकरण दाखल झाल्याचे स्मरते. ज्यामध्ये या अशा कच्च्या कैऱ्यांच्या आढीत या कॅल्शियम कार्बाइडच्या पुडय़ा ठेवल्या होत्या. त्या आढीजवळ एक मुलगा खेळत होता. खेळता खेळता त्या मुलाने त्या आढीत पाणी टाकले. त्यामुळे त्या पुडय़ावर पाणी पडले व त्यातून उष्णता निर्माण झाली. त्या मुलाचा पाय खूप भाजल्यामुळे आरडाओरडा झाला व पोलीस केस झाली. त्या वेळी हे प्रकरण न्याय सहायक प्रयोगशाळेकडे विश्लेषणास दाखल केले गेले. त्या वेळेस त्या पुडय़ा, आढीतले आंबे, गवत इत्यादी मुद्देमाल पाठविला गेला, तेव्हा त्या पुडीत हे रसायन कॅल्शियम कार्बाइड सापडले. हे कॅल्शियम कार्बाइड आंब्यामध्ये जात नाही, त्याचे अंश मिळाले नाहीत, पण या उष्णतेने या आंब्याची चव वेगळी आढळली.अशी वेगळी चव होण्याचे कारण म्हणजे हे कॅल्शियम कार्बाइड व पाणी यांच्या प्रक्रियेतून अ‍ॅसिटिलीन  वायू निर्माण होतो. हा वायू गॅस वेल्डिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो. या वायूमुळे त्या केळांना, आंब्यांनाही वेगळी चव येत असावी. त्यामुळे या रसायनाचा वापर करून पिकविलेले आंबे, केळी न खाणे हे उत्तम! नैसर्गिकरीत्या पिकविलेली/पिकलेली फळेच मानवी आरोग्यास उत्तम असतात. अशा फळांत सर्व प्रकारचे गुण नैसर्गिकरीत्या निर्माण होतात व तीच बाब महत्त्वाची! कृत्रिम गोष्टी दीर्घकाळ टिकत नाहीत, तर नैसर्गिक गोष्टी दीर्घकाळ राहतात हेच खरे!---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad