Wednesday, February 3, 2016

आरोग्यासाठी प्रसन्न मन -1

ज्याला आपण मन म्हणतो त्याचे केंद्र हे फक्‍त मेंदूपुरते मर्यादित आहे का? ज्याअर्थी मनाचा अंमल सर्व शरीरावर असतो त्याअर्थी मन प्रत्येक पेशीत असतेच. माझे मन कशावर तरी बसलेले आहे, माझे मन कशावर तरी जडले आहे असे आपण म्हणतो. याचा अर्थ मन मेंदूपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठी झालेली असते. मनाची व्याप्ती एवढी छोटी नसते, की ते एका ठिकाणी बसले, की दुसऱ्या ठिकाणी त्याचे कार्य चालत नाही. मन ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीने कार्य करण्याची शक्‍ती प्रत्येक पेशीत असते. म्हणजेच प्रत्येक इंद्रियात पण मन असते. आणि त्याचा वापर करून इंद्रियावर जरी बाहेरून बंधन घातले तरी कार्य करत राहते. 

‘मला सगळे कळते’ असे ज्या वेळी माणसाला वाटते, निदान एखाद्या विषयात तरी मी संपूर्ण ज्ञानी आहे (उदा. मला रोगांचे व औषधांचे सर्व कळते असे डॉक्‍टरला वाटते, मला सर्व तांत्रिक कळते असे इंजिनिअरला वाटते, मला संगीतातील सर्व कळते असे संगीतकाराला वाटते) आणि तो स्वतःला मोठे समजतो, त्या वेळी त्याला सम्यक ज्ञान मिळू शकत नाही. सम्यक ज्ञान मिळवण्याची त्याची तयारी नसते. मनुष्य स्वतःला मी मोठा असे समजतो, त्यातून अहंकार उत्पन्न होतो, त्यातून मान-अपमान तयार होतो, एखादी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे न झाल्यास उत्पन्न होणाऱ्या त्राग्यामुळे राग, क्रोध तयार होतात व यामुळे बेशुद्धी येते. या ऐवजी मनुष्याने गुरूंचे - ज्ञानाचे व अभ्यासाचे मार्गदर्शन घेतले तर तो योग्य मार्गाने आत्मानंदापर्यंत पोचू शकतो. म्हणूनच ‘सद्‌गुरुवाचोनि सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी’ असे म्हटलेले आहे. पाय का धरायचे, तर सद्‌गुरूंच्या डोक्‍यावर बसायचे नसते, कुठल्याही प्रकारे आव्हान करून, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारे वाद करून त्यांना निःशब्द करण्याचा किंवा माझे तेच खरे असे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा नसतो. गुरूंची कधीही निंदा करायची नसते तर त्याऐवजी त्यांच्या पायाकडे लक्ष

ठेवायचे असते, म्हणजे त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून जायचे असते. ‘मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्‌गुरू पाय दोन्ही’ असे जे म्हटलेले आहे ते यासाठीच. गुरूंचा चेहरा व्यवहारात वेगवेगळा दिसला तरी आतमध्ये गुरूतत्त्व एकच असते. या गुरूतत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली बुद्धीचा वापर होऊ शकतो. शेवटी गुरू काय किंवा तुमची अंतरबुद्धी काय, दोन्ही केवळ रस्ता दाखवण्याचे काम करतात; चालावे लागते स्वतः व्यक्‍तीलाच, म्हणजे शेवटी इंद्रियांचेच व्यापार चालतात. त्या बुद्धीच्या वापरानंतर मनावर ताबा मिळून इंद्रियविजय मिळविणे सोपे होते. इंद्रिये ताब्यात आल्यावर मन प्रसन्नता मिळून शक्‍ती मिळेल, रोगनिवारणही होऊ शकेल. मनाचे आरोग्य आले की, पाठोपाठ शरीराचे आरोग्य येऊ शकते. तेव्हा मन प्रसन्नतेच्या मार्गाने गेले तर आपल्याला शारीरिक आरोग्यही मिळू शकते. 

शेवटी पुन्हा मुद्दा इंद्रियांवरच येऊन थांबला आहे. इंद्रिये शारीरिक पातळीवर असतात, इंद्रियांचे व्यवहार आपल्याला समजू शकतात, कळू शकतात. इंद्रियांचे व्यवहार त्या त्या विषयापुरते, त्या त्या क्षेत्रापुरते चालतात. इंद्रियांना त्यांचे काम करू द्यायचे की थांबवायचे यासाठी व्यवस्था असते. मन प्रसन्नतेतील अडथळे शोधत असताना आपण पुन्हा इंद्रियनिग्रहापर्यंत म्हणजेच इंद्रियांच्या व्यवस्थापनापर्यंत किंवा त्यांच्या अनुशासनापर्यंत येऊन पोचतो. डोळे मिटून घेता येतात, म्हणजे इंद्रियांचे व्यवहार थांबवता येतात किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येते असे आपण समजतो. डोळे बंद करून घेतले तरी डोळ्यांचे आंतरेंद्रिय, विषय पाहिलेला नसताना, आतल्या आत कल्पना करत असते व तो विचार मनापर्यंत पोचवते. परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नसल्यामुळे साहजिकच मन स्वस्थ राहात नाही. 

ज्याला आपण मन म्हणतो त्याचे केंद्र मन हे फक्‍त मेंदूपुरते मर्यादित आहे का? ज्याअर्थी मनाचा अंमल सर्व शरीरावर असतो त्याअर्थी मन प्रत्येक पेशीत असतेच. माझे मन कशावर तरी बसलेले आहे, माझे मन कशावर तरी जडले आहे असे आपण म्हणतो. याचा अर्थ मन मेंदूपुरते मर्यादित न राहता त्याची व्याप्ती मोठी झालेली असते. मनाची व्याप्ती एवढी छोटी नसते की, ते एका ठिकाणी बसले की, दुसऱ्या ठिकाणी त्याचे कार्य चालत नाही. मन ज्या पद्धतीने चालते त्या पद्धतीने कार्य करण्यची शक्‍ती प्रत्येक पेशीत असते. म्हणजेच प्रत्येक इंद्रियात पण मन असते. आणि त्याचा वापर करून इंद्रियावर जरी बाहेरून बंधन घातले तरी कार्य करत राहते. उदा- डोळे मिटून घेतले तरी त्यातले मन डोळ्यांच्या विषयाविषयी चिंतन करून नको नको ते सत्य नसलेले किंवा काल्पनिक  विचार तयार करून त्याभोवती चिंतन करत राहते. हीच खरी अडचण आहे. डोळे मिटून बसले तरी आत चिंतन चालूच राहते, कान बंद केले तरी आपण विचार ‘ऐकत’ राहतो. काही न खाता उपवास करायचा ठरविला तरी काही तरी बहाणा शोधून ‘हे चालेल, ते चालेल’ असे ठरवून खाल्ले जाते. ‘हे खाल्ल्याने मला बरे वाटेल, ते खाल्ल्याने बरे वाटेल, उपवास असल्यामुळे आज अमुक गोष्ट मी खाल्ली नाही तरी उद्या मात्र नक्की खाणार. हा उपवासाचा दिवस कधी संपेल आणि मी भरपूर पोटभर केव्हा खाईन’ वगैरे विचारसुद्धा खाण्याच्या इंद्रियाचेच आहेत. यौवन इंद्रियेसुद्धा मैथुनाविषयी वेगवेगळ्या कल्पना रंगवत राहतात. 

असे सर्व विचार इंद्रियांवर निग्रह केल्यावरही येत राहिलेले असतात, म्हणजे खरे पाहता इंद्रियांचे काम चालू राहिलेलेच असते. या सगळ्यामुळे सम्यक मनाला विचारांना बुद्धीच्या प्रभावाखाली आणून प्रत्यक्ष ज्ञान करून घेऊन मेंदूपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करण्यास वावच मिळत नाही. तेव्हा मनाला आवरण्यासाठी, इंद्रियांना आवरण्यासाठी बुद्धी हा एकमेव आधार शिल्लक राहतो. म्हणून बुद्ध केव्हा अवतार घेऊन येतील, श्रीकृष्णांनी म्हटल्यानुसार ते केव्हा अवतार घेतील व आम्हाला मदत करतील याची वाट सामान्यजन वर्षानुवर्षे पाहात राहतात. ‘तुझे आहे तुझपाशी’ किंवा ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ असे जे म्हटले जाते त्याचा अर्थ असा की, प्रत्येकाजवळ त्याच्या आतच आयुष्याला चांगली दिशा दाखवून आनंद मिळविण्यासाठीची बुद्धी असतेच; मिळविलेल्या बुद्धीचा उपयोग करून घेणे प्रत्येकाच्या हातात असते आणि त्यातून ‘नर से नारायण’ स्वतःलाच व्हावे लागते. 

अनुभवातून तावून सुलाखून निघालेली बुद्धी म्हणजे ज्ञान. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी पुस्तकात असतात, पण ते ‘ज्ञान’ नसते ती ‘माहिती’ असते. या माहितीचा वापर करणारे धाडशी व नशिबवान असतात व त्यांनी मिळविलेल्या अनुभवाला ज्ञान म्हणता येते. अशा अनुभवी व्यक्‍तीकडून चांगल्या-वाईटाचे मार्गदर्शन बुद्धीमार्फत करून घेणे हाच शेवटचा उपाय दिसतो. 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad