Friday, July 17, 2015

निसर्गचक्र आणि दिनचर्या

डॉ. श्री. बालाजी तांबे
वयानुसारही शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग केलेले आहेत... बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था! बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्‍य असते, कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्यप्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनविण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा यांसारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात संतुलित कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होऊ शकतो.
- डॉ. श्री बालाजी तांबे

कोणतेही काम वेळेवर केले की चांगल्या प्रकारे होते आणि नंतर होणारा मनस्ताप टाळता येतो, हा आपल्या सर्वांचा रोजचा अनुभव असतो. उदा. विजेचे किंवा टेलिफोनचे बिल भरायचे असले तर दिलेल्या अंतिम तारखेच्या आत ते भरणे सयुक्‍तिक असते. तारीख उलटून गेली तर दंड भरावा लागतो, फारच उशीर झाला तर घर अंधारात बुडू शकते. अगदी असेच आपल्या शरीराच्या बाबतीतही असते. चौरचौघांमध्ये किंवा समाजामध्ये कसे वागावे, बोलावे हे आपल्या सर्वांना माहिती असते. पण स्वतःच्या आरोग्यासाठी शरीराकडून कोणत्या वेळी काय करून घ्यायला हवे, हेसुद्धा समजून घ्यायला हवे. 

याचसाठी आयुर्वेदाने ‘दिनचर्या’ ही संकल्पना समजावलेली आहे. दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो. त्या वेळेवर केल्या तर त्या सहजतेने होतात, शिवाय चांगल्या प्रकारे होतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. कोणत्या वेळी काय काम करावे, हे निसर्गचक्रानुसार ठरवले जाते. उदा. पहाटे सूर्योदय होतो त्या वेळी किंवा त्याच्या आधीच उठणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते. रात्री वेळेवर झोपले व रात्री शांत झोप लागलेली असली तर सकाळी लवकर उठणे सोपे असते. 

एकदा सूर्य वर आला आणि अंगात आळस भरला की उठता उठवत नाही, शिवाय उठल्यावर उत्साह वाटत नाही, हा अनुभव सर्वांचा असतो. 
निसर्ग व शरीर यांचे हे समांतर रीतीने चालणारे चक्र पुढील सूत्रातून समजावलेले आहे,

वयोऽहोरात्रिभुक्तानां तेऽन्तमध्यादिगाः क्रमात्‌ । 
... अष्टांगहृदय सूत्रस्थान
वात-पित्त-कफ हे दोष, वय, दिवस, रात्र व अन्नपचन होत असताना अनुक्रमे अंती, मध्यकाळी व प्रारंभी अधिक बलवान असतात व विशेषत्वाने कार्यरत असतात.

दिवसाचे १२ तास आणि रात्रीचे १२ तास यांचे प्रत्येकी तीन-तीन भाग केले असता पहिल्या भागात कफाचे आधिक्‍य असते, म्हणजे सकाळी व संध्याकाळी ६ ते १० हा काळ कफाचा समजला जातो. मधला भाग म्हणजे दुपारी व मध्यरात्री १० ते २ या काळात पित्त वाढत असते, तर तिसऱ्या भागात म्हणजे दुपारी २ ते ६ व रात्रीच्या शेवटी २ ते ६ हा काळ वाताचा असतो. वात-पित्त-कफ यांचे असे ठराविक वेळेला वाढण्याचे आणि नंतर आपोआप कमी होण्याचे चक्र आपल्या शरीरात अविरत, रोजच्या रोज चालू असते.

वात हे शरीरात गती व हालचाल करू शकणारे तत्त्व होय. त्यामुळे झोपेतून उठण्याची क्रिया तसेच पोट साफ होण्याची क्रिया वाताच्या कार्यक्षेत्रातील असते. वरील सूत्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता वाताचा काळ संपतो. म्हणजे सहज उठायचे असेल तर वाताच्या काळातच उठायला हवे. एकदा का सहा वाजल्यानंतर कफाचा काळ सुरू झाला की उठणे अधिकाधिक अवघड होत जाते. सकाळी लवकर उठण्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वाताच्या काळात मलमूत्रविसर्जन सुलभ व योग्य प्रकारे होऊ शकते, कफाचा काळ सुरू झाला की विसर्जनाची क्रिया पूर्ण होणे अवघड होते, पर्यायाने अख्खा दिवस आळसात जाऊ शकतो. 

पहाटे सहानंतर कफाचा कालावधी सुरू होतो. ‘कफ’ हा शांत, स्थिर स्वभावाचा असल्याने सकाळच्या वेळी अभ्यास किंवा उपासना करणे मन एकाग्र होण्याच्या दृष्टिकोनातून सोपे असते. तसेच सकाळच्या या कफाच्या काळात मुखातील अतिरिक्‍त कफाची शुद्धी व्हावी यासाठी गंडुष, कफनाशक वनस्पतींनी मुखमार्जन वगैरे उपचार करायचे असतात. डोळ्यांत अंजन घालून तेथून कफदोष दूर केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. सकाळच्या वेळी व्यायाम करण्याचा फायदा सर्वाधिक असतो. कारण, कफाच्या काळात केलेल्या व्यायामाने शरीरात कफदोष संतुलित राहतो. मेदसुद्धा अति प्रमाणात वाढत नाही, एकंदर शरीरसौष्ठव आणि दिवसभरासाठी आवश्‍यक असणारी स्फूर्ती मिळवून ठेवता येते. कफदोषामुळे शरीरात येणारा जडपणा, आळस, मंदपणा दूर होण्यासाठी आपल्या भारतीय परंपरेत सकाळच्या वेळी सूर्यस्नान घेण्यास सुचवले आहे. सकाळी जोपर्यंत सूर्याची किरणे फार तीव्र नसतात तोपर्यंत म्हणजे उन्हाळ्यात आठच्या आधी, हिवाळ्यात नऊपर्यंत अगोदर अंगाला तेल लावून थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणे किंवा सूर्यकिरणांत सूर्यनमस्कार करणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असते, हाडांची बळकटी टिकविणारे, रोगप्रतिकारशक्‍ती नीट ठेवण्यास कारणीभूत असणारे असते, तसेच मधुमेह होण्यास प्रतिबंध करणारे डी जीवनसत्त्व फक्‍त सूर्यप्रकाशातच शरीर तयार करू शकते, असे आधुनिक विज्ञानाने शोधून काढले आहे. मात्र, फार तीव्र सूर्यप्रकाश त्वचेसाठी धोकादायक असू शकतो. त्यामुळे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात १०-१५ मिनिटांसाठी बसणे किंवा सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार करणे आरोग्यासाठी उत्तम होय. 

पित्त हे पचनाचे कार्य करणारे तत्त्व आहे. त्यामुळे पित्ताच्या काळात अर्थात दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवल्यास अन्नाचे पचन सहज होऊ शकते. जेवणाची वेळ होऊनही जेवले नाही तरी निसर्गचक्रानुसार पाचक पित्त

स्रवतेच आणि त्याला पचवायला काही नसले की त्यामुळे पोटात, आतड्यात उष्णता वाढत राहते. आयुर्वेदात तर सांगितले आहे की संधुक्षित झालेल्या अग्नीला पचविण्यासाठी अन्न मिळाले नाही तर तो शरीरधातूंना पचवायला सुरवात करतो, परिणामी शरीरातील आवश्‍यक तत्त्वे जळून जातात. याचसाठी वेळेवर जेवणे महत्त्वाचे होय. वेळेवर न जेवता फार उशिरा जेवले तर तोपर्यंत स्रवलेले पाचक पित्त विरून गेलेले असते. परिणामतः अन्न योग्य प्रकारे पचू शकत नाही, पचनसंस्थेवर अतिरिक्‍त ताणही येतो. प्रत्यक्षातही असे दिसते की अनेक दिवस वेळेवर न जेवणाऱ्या व्यक्‍तींना अपचन, गॅसेस, वजन वाढणे अशा प्रकारचे अनेक त्रास होऊ लागतात. हे सर्व टाळायचे असेल तर दुपारचे जेवण पित्ताच्या काळात म्हणजे १२ ते १ या अवधीत करणे उत्तम होय. 
झोपण्याच्या बाबतीतही त्रिदोषांचे हे चक्र ध्यानात घ्यावे लागते. झोप येते ती कफामुळे. कफाचा काळ रात्री १०-११ वाजेपर्यंत असते. त्यामुळे या वेळेपर्यंत झोपल्यास झोप लगेच लागते व ती झोप शांत असते. याउलट रात्री ११च्या पुढेही जागत राहिले म्हणजे पित्ताचा काळ सुरू झाला की त्याने शरीरात पित्तदोषाचे असंतुलन व्हायला सुरवात झाल्याने अंग गरम होणे, डोळ्यांची व हातापायांच्या तळव्यांची आग होणे, डोके दुखणे, केस गळणे वगैरे विविध तक्रारींना आमंत्रण मिळते. रात्रपाळी करणाऱ्या किंवा विमानात काम करणाऱ्या असंख्य व्यक्‍तींचा हा अनुभव आहे. 

वयानुसारही शरीरातील वात-पित्त-कफाचा प्रभाव बदलत असतो. आयुर्वेदाने वयाचे तीन भाग केलेले आहेत, बाल्यावस्था, तारुण्यावस्था व वृद्धावस्था. बाल्यावस्थेत स्निग्ध, बलस्वरूप कफाचे आधिक्‍य असते कारण या काळात शरीराची वाढ होणे अपेक्षित असते. सर्व धातूंना योग्य प्रकारे पोषण मिळून शरीराला दृढ बनवण्याचे काम हा कफ करत असतो. म्हणून लहान वयात कफदोष वाढणार नाही, पण बलस्वरूप, निरोगी कफाचे पोषण होईल यासाठी दूध, लोणी, तूप, सुका मेवा यासारख्या पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करायचा असतो. लहान वयात संतुलित कफाचा योग्य प्रकारे परिपोष झाला की त्याचा फायदा पुढे आयुष्यभर होऊ शकतो.

तारुण्यावस्थेत पित्ताचे आधिक्‍य असते त्यामुळे तारुण्यात जोम, स्फूर्ती, मिळून उत्साहपूर्णता मिळू शकते व धडाडीची कामे होऊ शकतात. मात्र अति उत्साहाने शरीराची ताकद विनाकारण खर्च होणार नाही, उलट ताकद टिकून राहील यासाठी काळजी या काळात घ्यायची असते. 

वृद्धावस्थेत वात वाढतो त्यामुळे शरीराची शक्‍ती हळूहळू कमी होणे, इंद्रियांची ताकद क्षीण होणे स्वाभाविक असते, म्हणूनच या काळात वाताला शक्‍य तेवढे संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. 

अशा प्रकारे निसर्गाचे चक्र लक्षात घेऊन जीवनाचा क्रम तसेच रोजचा दिनक्रम आखला तर आरोग्य टिकेलच शिवाय जीवनाचा अधिकाधिक आनंद घेता येईल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad