Saturday, November 3, 2012

चंद्राचा अमृतरस दुधात!


शुद्ध दुधाचे माहात्म्य जाणून घ्या. केवळ कोजागरीलाच नव्हे, तर रोजच पित्त शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले आहे. शरद ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल, हे पाहणे इष्ट असते. सर्जनप्रक्रियेचे चक्र निरंतर सुरू राहावे, या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा स्वीकार केलेले दूध सेवन केले जाते. सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते. 

शरद ऋतूचे आगमन झाले, पावसाळा संपला. पहिल्या पावसाचे पहिले थेंब मातीवर पडल्यावर येणारा सुवास प्रत्येक प्राणिमात्रास मोहित करतो. हा सुवास कशामुळे येतो व तो पसरतो कसा? उन्हाळ्याने पृथ्वीच्या मातीला भाजून काढलेले असते. गरम तव्यावर पाणी पडल्यास त्याचा सुंदर आवाज होऊन वाफ होऊन उडून जाते, तसेच पृथ्वीच्या पोटात साठवलेल्या उष्णतेमुळे पहिल्या पावसाच्या पाण्याची वाफ होते व या वाफेबरोबर भूमितत्त्वाचा वास सगळीकडे पसरतो व सर्व जण मोहित होतात.

पावसाळ्यामध्ये मनुष्याच्या शरीरात साठलेला पित्तदोष बाहेर ऊन पडल्यावर अशाच तऱ्हेने उफाळून येतो. शरीरातील पित्त काढून टाकण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला विरेचन विधी तसा वर्षभर करता येत असला तरी शरदात विरेचन विधी केल्यास शरीरात अनायासे प्रकुपित झालेले पित्त बाहेर टाकायला मदत होते. शरीरात झालेला अग्नीचा प्रताप म्हणजे पित्तदोष असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण जीवन माणसाच्या नात्यातील उष्णतेच्या उबेवर, कर्तृत्वशक्‍तीसाठी लागणाऱ्या अग्नीच्या शक्‍तीवर, शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी हॉर्मोन्सच्या अग्नीवर अवलंबून असते. अग्नीला जीवनात एकूणच अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो अग्नी संतुलित राहावा व पित्तदोष वाढू नये ही अपेक्षा असते, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे रोग किंवा शारीरिक, मानसिक त्रास पित्तामुळेच होत राहतात. त्वचा लाल होणे, त्यावर बारीक पुटकुळ्या येणे, गांधी येणे, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, आंबट-कडू उलट्या होणे, छोट्याशा कारणाने राग येणे, राग मस्तकात जाणे, असे अनेक त्रास पित्तामुळे होत राहतात.

शक्तिपरिवर्तनासाठी... 
पित्तदोष वाढून त्रास होऊ नये यासाठी अनेक नियम सांगितलेले असतात. अग्नी हा वायूचा मित्र आहे. तेव्हा पित्तदोषाबरोबरच वातदोषही वाढतो व पावसाळ्यातील वातदोष पित्ताला उफाळण्यास मदत करत असावा. म्हणून वात-पित्ताची जोडी सांभाळावीच लागते. त्यासाठी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. निसर्गातील ऋतुबदल प्राणिमात्रांच्या शरीरातही परिणाम घडवतात. त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भारतीय परंपरेत सणावारांची योजना केलेली आहे.

ऋग्वेदातील पुरुषसूक्‍तातील 16 ऋचांपैकी सहाव्या ऋचेत म्हटले आहे-
यत्‌ पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत । 
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ।।6।। 

शरीराची व एकूणच आरोग्याची काळजी घेणारी व देवत्व धारण करणारी केंद्रे अन्नाचे ऊर्ध्वगमन करून शक्‍ती व जाणिवेत रूपांतर करण्यासाठी होणाऱ्या यज्ञाला वातावरणातील बदल जबाबदार असतात, असे या ऋचेत सुचविलेले आहे. वसंत ऋतू एक प्रकारे या सर्व क्रियेचे नियमन करतो व आज्य म्हणून मदत करतो; ग्रीष्म ऋतू अग्नी पेटविण्यासाठी व अग्नी प्रकट करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचे काम करतो व त्यातून शरद ऋतूत अन्न तयार होते, जे आहुती म्हणून यज्ञात द्यावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्व स्थित्यंतरे या यज्ञावरच म्हणजे या शक्‍तिपरिवर्तनाच्या क्रियेवर चालतात. त्यासाठी आवश्‍यक असते अन्न. "अन्नाद्‌ भवन्ति भूतानि' म्हणजे सर्व प्राणिमात्र अन्नानेच अस्तित्वात येतात, अन्नानेच वाढतात, अन्नानेच त्यांचा उत्कर्ष होतो, असे म्हटलेले आहे. असे अन्न शरद ऋतूत शरीररूपी यज्ञात आहुतीरूपाने व्यवस्थित दिले गेले तर पुढे वर्षभर ताकद व स्फूर्तीचा लाभ होतो. पण या ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल हे पाहणे इष्ट असते. म्हणून शरद ऋतूत प्रथम येणाऱ्या नवरात्रोत्सवात शक्‍तीची उपासना करून शक्‍तीला एका विशिष्ट मार्गाने आशीर्वादाच्या मर्यादेत आणून नंतर भौतिक पातळीवर शरद पौर्णिमेच्या दिवशी एक खास उत्सव केला जातो.

सर्जनाची प्रक्रिया जेथून सुरू झाली ते लक्षात राहावे या हेतूने ज्येष्ठ अपत्याला मान दिला जातो. नंतर हे चक्र सतत चालू राहावे या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा दुधामध्ये स्वीकार करून ते दूध सेवन करावे आणि सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते. आपल्या शरीरात होणारे बदल बाहेरील निसर्गात होणाऱ्या बदलांना समांतर राहिले तर आयुष्य व्यवस्थित राहते, अन्यथा ऋतुमानातील प्रत्येक बदल प्रकृती अस्वास्थ्य उत्पन्न करू शकतो.

पित्त शमवणारी कोजागरी 
शरीरात साठलेले पित्त शरद पौर्णिमेला किंवा कोजागरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता दूध पिऊन शांत व्हावे ही झाली सुरवात; परंतु संपूर्ण शरद ऋतूत किंवा एरवीही वाढलेल्या पित्ताचे शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले असते. शरीरातील पित्त अशा प्रकारे संतुलित राहिल्यानंतर वर्षभर शरीराला ताकद मिळू शकेल, असे अन्न दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येकाने खावे, अशी योजना असते. ही सर्व उत्सवांची योजना पाहिल्यानंतर भारतीय परंपरा व आयुर्वेद एकमेकांत हात घालून कसे जातात व एकूण मनुष्यमात्राचे जीवन सुखी कसे करतात, हे लक्षात येईल.

प्रत्येकाने दूध अवश्‍य प्यावे, पण ते होमोजिनाइज केलेले नसावे. शुद्ध ताजे दूध मिळाले तर उत्तम, अन्यथा पाश्‍चराइज केलेले दूध चालू शकते; पण ते उकळण्याच्या बिंदूपर्यंत किंवा साय धरून फुगा येईल इथपर्यंत एकदा तापवलेले असावे. ज्या दुधात किमान पाच-सात प्रतिशत स्निग्धांश आहे असे दूध अमृतासमान असते व ते शरीराला कायम उपयोगी पडू शकते. दूध हे रोगहारक आहे. दुधाचा सत्त्वांश म्हणजे तूप. पारंपरिक व आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले तूप अमृतासमान असते व ते आरोग्यासाठी अप्रतिम असते, हे लक्षात ठेवून दीपावलीच्या शुभमुहूर्तावर तुपाचा उपयोग संपूर्ण स्वयंपाकासाठी करावा. योग्य प्रकारे बनविलेले तूप सेवन केले असता शरीरातील अतिरिक्‍त चरबी तर घटतेच, पण शरीरात साठलेले इतर दोष शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते. अमृताने जसे आयुष्य वाढते तसे तुपामुळे शरीरातील दोष दूर झाल्यानेही आयुष्य वाढते.

या कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनाच या अमृताचा लाभ व्हावा व आता तरी शुद्ध दुधाचे माहात्म्य ओळखून पुन्हा एकदा भारतवर्षात शुद्ध दुधाचे पर्व सुरू होईल हा विश्‍वास! 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad