Monday, February 15, 2010

हृदयरोग व उपचार

रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला, तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात. कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृदयरोगाची लक्षणे बदलतात. आधुनिक तंत्रज्ञानाने नेमके निदान करता येते. त्यानंतर नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृदयरोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरून जाऊ नये.
तसे पाहता सर्वच शरीरावयव महत्त्वाचे असतात. पण काही अवयवांवर इतर अवयवांपेक्षा खूप मोठी जबाबदारी असते. असाच एक शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय. संपूर्ण शरीराला रात्रंदिवस शुद्ध रक्‍ताचा पुरवठा करणाऱ्या हृदयाचे कार्य होण्यासाठी कोणकोणते घटक जबाबदार असतात हे आपण 15 जानेवारीच्या "फॅमिली डॉक्‍टर' पुरवणीत पाहिले. हृदयात बिघाड काय कारणांनी होऊ शकतो आणि त्याची लक्षणे काय असतात याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत.

आयुर्वेदात "स्रोतस' नावाची एक विशेष संकल्पना आहे. शरीरात महत्त्वाची अशी तेरा स्रोतसे असतात. प्रत्येक स्रोतसाची काही विशिष्ट कामे असतात. उदा. अन्नवहस्रोतसाचे काम अन्न स्वीकारणे, ते पचवणे, नंतर उरलेला मलभाग शरीरातून टाकून देणे असते. प्राणवहस्रोतसाचे काम श्‍वासामार्फत आलेला प्राण स्वीकारून उच्छ्वास बाहेर टाकण्याचे असते. स्रोतसाचे असे विशिष्ट अवयव असतातच, पण प्रत्येक स्रोतसाची दोन मुळे असतात. ही मुळे प्रत्यक्ष स्रोतसापासून शरीरात शारीरिकदृष्ट्या दूरही असू शकतात. पण स्रोतसाच्या कार्यकारित्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. हदय हे रसवहस्रोतसाचे व प्राणवहस्रोतसाचे मूळ असते. म्हणूनच या दोन स्रोतसांमधला बिघाड हृदयाला बाधक ठरू शकतो आणि हृदयातील दोषामुळे या दोन स्रोतसांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही.

प्राणवहस्रोतसाचे एक मूळ हृदय असते, तर दुसरे मूळ असते महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग. स्रोतसाचे एक मूळ बिघडले तर त्याचा परिणाम दुसऱ्या मुळावर होणेही स्वाभाविक असते. थोडक्‍यात, रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

या तीन स्रोतसांमध्ये, पर्यायाने हृदयामध्ये बिघाड कोणत्या कारणांनी होतो हे पुढील श्‍लोकांवरून समजते.

प्राणवहस्रोतस व हृदय क्षयात्‌ सन्धारणात्‌ रौक्ष्यात्‌ व्यायामात्‌ क्षुधितस्य च।
प्राणवाहिनि दुष्यन्ति स्रोतांस्यन्यैश्‍च दारुणः ।।...चरक विमानस्थान
धातूंचा क्षय झाल्याने, मल-मूत्र वगैरे वेगांचे धारण करण्याने, रुक्ष वस्तूंचे अति प्रमाणात सेवन करण्याने, भूक लागली असतानाही व्यायाम करण्याने व स्वशक्‍तीच्या आवाक्‍याबाहेर कार्य करण्याने प्राणवहस्रोतस बिघडते आणि त्याची परिणाम हृदयावर होतो.

स्रोतस व हृदय
अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनम्‌ । अन्नवाहिनी दुष्यन्ति वैगुण्यात्‌ पावकस्य च ।। ...चरक विमानस्थान
अवेळी अति प्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

रसवहस्रोतस व हृदय
गुरुशीतमतिस्निग्धं अतिमात्रं समश्‍नताम्‌। रसवाहिनी दुष्यन्ति चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌ ।। ...चरक विमानस्थान
पचण्यास जड, अति थंड, अति स्निग्ध पदार्थ खाण्याने, अति मात्रेत भोजन करण्याने व अति चिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो.

माधवनिदानात हृद्रोगाची कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत.
अत्युष्ण-गुर्वन्न-कषाय-तिक्‍त-श्रमाभिघाताध्यशनप्रसंगैः । सचिन्तनैः वेगधारणैश्‍च ।।...माधव निदान
अति उष्ण, पचण्यास जड, तुरट, कडू चवीचे भोजन करण्याने, अति श्रम, अति भोजन, शारीरिक वा मानसिक आघात, अति मैथुन, अति चिंता व मलमूत्रादि वेगांचे धारण या कारणांनी हृद्रोग होऊ शकतो.

हृद्रोगाची संप्राप्ती म्हणजे हृदयरोग कसा होतो हे पुढील सूत्रावरून समजते,
दूषयित्वा रसं दोषा विगुणं हृदयं गताः। हृदिबाधा प्रकुर्वन्ति हृद्रोगं तं प्रचक्षते ।।...माधव निदान
कारणानुरूप ज्या कोणत्या दोषात बिघाड होतो तो दोष रसधातूला बिघडवतो. बिघडलेला रसधातू हृदयात पोचला की त्या ठिकाणी बाधा उत्पन्न करतो आणि हृद्रोग होतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते, की कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृद्रोगाची लक्षणे बदलतात. नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृद्रोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरू नये.

वातामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे * हृद्‌शून्यभाव - हृदयात पोकळी असल्यासारखे वाटणे.
* हृद्‌द्रव - छातीत धडधडणे. व्यायाम वा काही उत्सुकता असली की सुद्धा छातीत धडधडते पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृद्रोगात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते.
* हृत्शोष - छातीत, हृदयात शोष पडण्यासारखे वाटणे, कोरडेपणा वाटणे.
* हृन्भेद - हृदयाच्या ठिकाणी फुटल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे.
* हृत्स्तंभ - हृदयाचे कार्य एकाएकी थांबले आहे असे वाटणे.
* हृदयोद्वेष्टन - छातीत पिळवटल्याप्रमाणे वेदना होणे.
* हृत्तोद - छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे.
* दीनता-भय-शोकप्रतीती - एकाएकी, विशेष असे कारण नसतानाही दीन, खिन्न होणे, भीती वाटणे, शोकग्रस्त होणे.
* शब्दासहिष्णुता - मोठा आवाज, गोंगाट, गडबड सहन न होणे.
* वेपथुः - सर्वांगाला कापरे भरणे.
* श्‍वासरोध - श्‍वास घेण्यास व सोडण्यास त्रास होणे.
* अल्पनिद्रता - झोप कमी येणे.
वातकाळात म्हणजे जेवण पचल्यावर, अगदी पहाटे वा सूर्यास्तानंतर छातीत वेदना होणे.

पित्तामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
* हृद्‌दाह - छातीत जळजळणे.
* तिक्‍तास्यता - तोंडात कायम कडवट चव जाणवणे.
* अम्लोद्‌गार - आंबट ढेकर येणे.
* क्‍लम - अकारण थकवा वाटणे.
* शोष - पाणी प्यायले तरी तहान न शमणे.
* मूर्च्छा - घेरी / चक्कर येऊन खाली पडणे.
* भ्रम - गरगरणे.
* स्वेद - अकारण, एकाएकी घाम फुटणे.
* अम्लच्छर्दि - आंबट चवीची उलटी होणे.
* धूमक - हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे.
* तमःप्रवेश- डोळ्यासमोर अंधारी येणे.
* ज्वर - शरीरतापमान वाढणे.
जेवणानंतर थोड्या वेळाने, भूक लागली असता वा मध्यरात्री त्रास होणे.

कफदोष वाढल्यामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
* हृद्‌भार - छातीत जडपणा जाणवणे.
* हृत्स्तंभ - हृदयात जखडल्यासारखे वाटणे.
* तंद्रा - आळस, तंद्रीत असल्यासारखे वाटणे.
* अरुची - तोंडाला चव नसणे.
* अग्निसाद - भूक न लागणे, अग्नीचे काम मंदावणे.
* अतिनिद्रा - अति प्रमाणात झोप येणे.
* आस्यमाधुर्य - तोंडात गोडसर चव राहणे.
जेवणानंतर लगेच वा सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटणे.

हृद्रोग झालेल्या व्यक्‍तींना प्रत्यक्ष तपासताना सहसा वात-पित्ताची, पित्त-कफाची वा वात-कफाची अशी एकत्रित लक्षणे दिसतात. हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे, अकारण दीन-खिन्न वाटणे, छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटणे वगैरे काही लक्षणे वाचायला वा ऐकायला विचित्र वाटली तरी काही रुग्ण अगदी याच शब्दात वर्णन करताना दिसतात.

हृद्रोगाचे निदान करताना लक्षणे विचारात घ्यावी लागतातच, पण लक्षणे कशामुळे वाढतात, कधी कमी होतात हेही बघावे लागते. उदा. छातीत धडधडणे हे हृद्रोगातले बहुधा सगळ्यांमध्ये आढळणारे लक्षण असते, पण ते मल-विसर्जनानंतर वाढत असल्यास वातामुळे असते. ताण आल्याने वाढत असले तर त्याचा संबंध रसधातूशी आणि मनाशी अधिक असतो.

पाळीच्या आधी जाणवत असल्यास तर बरोबरीने स्त्रीसंतुलनासाठी प्रयत्न करावे लागतात. धूम्रपानाने वाढत असले तर हृदयाच्या बरोबरीने फुप्फुसांवरही काम करावे लागते. अर्थातच निदान जितके अचूक, तितका उपचार यशस्वी ठरत असल्याने या सर्व गोष्टी लक्षात घेण्याचा खूप फायदा होत असतो. सध्या बहुतेक वेळेला आधुनिक पद्धतीने नेमके निदान करून हृद्रोगी आयुर्वेदिक तज्ज्ञांकडे येत असतो.

हृदयातले शारीरिक बदल वा हृदयाची एकंदर कार्यक्षमता आधुनिक निदानपद्धतीमुळे नेमकी समजू शकत असली तरी त्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या वात-पित्त-कफदोषांच्या आधारे नेमके वर्गीकरण करून घ्यावे लागते किंवा प्राणवहस्रोतस, महास्रोत, रसवस्रोतसांपैकी कुठे दोष आहे, कोणत्या कारणामुळे दोष उत्पन्न झालेला आहे, पुन्हा असा त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी याकडे लक्ष द्यावे लागते आणि त्यानुसार त्या त्या व्यक्‍तीमध्ये प्रकृतीविशिष्ट, दोषस्रोतस-धातु-विशिष्ट उपचार करावे लागतात.
क्रमशः

- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405 Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad