Monday, December 28, 2009

जांभया येणे

- डॉ. ह. वि. सरदेसाई
मानवी भावना संसर्गजन्य असतात. एखादी व्यक्ती घाबरली तरी आजूबाजूच्या व्यक्ती भयभीत होतात. एखादी व्यक्ती हसू लागली की सोबतच्या माणसांनाही हसू फुटते. त्याचप्रमाणे जांभया देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्यालाही जांभया येऊ लागतात.


कंटाळा आला, झोप येऊ लागली किंवा आजूबाजूच्या व्यक्ती जांभया देऊ लागल्या, की माणसाला जांभई येते. खोकला येणे, शिंकणे, उचकी लागणे, उलटी होणे या क्रियांप्रमाणेच जांभई येणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिया (reflex action)आहे. जांभई येण्याच्या क्रियेमागे मज्जासंस्थेचे काही भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील "बेसल गॉंग्लिया' नावाच्या भागातील केंद्राच्या कार्याचा जांभई येण्याचा संभव असावा असे मानले जाते. जांभई घेताना अनेक स्नायूंचे कित्येक सेकंद टिकणारे आकुंचन होत राहते. परिणामी व्यक्तीचे श्‍वसन दीर्घ पूरक स्थितीत जाते म्हणजे श्‍वास आत घेण्याची क्रिया नेहमीच्या श्‍वासोच्छ्वासापेक्षा लांबते. त्याच वेळी घशाचा आकार विस्तारतो. खालचा जबडा व जीभ खाली जाते. दीर्घ श्‍वास घेण्याने फुफ्फुस व पोट यातील पडदा (डायफ्रॅम) पोटाकडे सरकतो. परिणामी छातीच्या पोकळीत ऋण भार (negative pressure) तयार होतो. शरीरातील नीलांमधील रक्त छातीकडे (हृदयाकडे) जाते. त्यामुळे हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या रक्ताचा पुरवठा सुधारतो. दीर्घ श्‍वसनाचा दुसरा मोठा फायदा म्हणजे फुफ्फुसातील बंद कोष उघडले जातात.

आपल्या नेहमीच्या किमान 40 टक्के फुफ्फुसातील कोष कार्यान्वित होत नसतात. अशा न उघडलेल्या कोषातून प्राणवायूची देवाणघेवाण होत नाही. प्राणवायू कमी असणारे रक्त तसेच हृदयाकडे परत जाते व रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घटते. मधूनच दीर्घ श्‍वसन झाले तर हा दोष टळतो. अनेकदा हॉस्पिटल्समध्ये अति दक्षता भागात रुग्णांना कृत्रिम श्‍वास होणाऱ्या "व्हेंटिलेटर' र्(ventilator) मशिनवर ठेवले जाते. या वेळी रुग्णाला जांभई येत नाही. त्यामुळे बंद असणाऱ्या कोषातील "अशुद्ध' (म्हणजे प्राणवायू कमी असणारे) रक्त फुफ्फुसाकडून हृदयाकडे जाणाऱ्या रक्तात मिसळते. परिणामी रक्तातील प्राणवायूचे प्रमाण घसरते. तसे होऊ नये म्हणून जास्त दबावाने प्राणवायू देणयाची प्रथा आहे. कधी कधी खूपच जास्त दबावाखाली प्राणवायू वापरावा लागतो. हायपर बॅरिक ऑक्‍सिन चेंबर(hyper baric oxygen chamber) जांभई येताना चेहऱ्यावरचे स्नायू व हाताचे स्नायूदेखील कार्यान्वित होतात.

 या क्रियांनीदेखील रुधिराभिसरणाला चालना मिळते. शिवाय स्नायूंच्या आत असणाऱ्या काही मज्जा-स्वीकारांना (sensory receptors) चालना मिळते. यांच्यामधून मज्जारज्जूत व मेंदूत जाणाऱ्या चेतनांमुळे स्नायू शिथिल होण्यास मदत होते. ही झोपेची पूर्वतयारी आहे. हाताच्या स्नायूंचे हे काम मेंदूच्या हालचाल केंद्राच्या (motor cortex) ताब्यात नाही. एखाद्या व्यक्तीला पक्षाघात (hemiplegia) झालेला असला तर ती व्यक्ती आपला (उजवा किंवा डावा) हात स्वेच्छेने हलवू शकत नाही. कारण या हालचाल केंद्राचा व हात हलविण्यास जबाबदार असणाऱ्या मज्जारज्जूतील पेशींचा संबंध दुरावलेला असतो. अशा व्यक्तीला जांभई आली तर मात्र हात उचलला जातो, ताणला जातो. हीदेखील बेसल गॉंग्लियामधून देखरेख केलेली एक प्रतिक्षिप्त क्रियाच असते. असा लुळा पडलेला हात जांभईच्या वेळी हलताना पाहून पाहणाऱ्याला नवल वाटते.

उत्क्रांत होत असताना अनेक श्‍वापदांना आपल्या संरक्षणासाठी वास घेणे महत्त्वाचे ठरते. मोठ्या प्रमाणात श्‍वास घेण्याने बरीच हवा नाका -घशात जाते. या भागात नेहमी होणारी हवेची हालचाल संथ गतीने व कमी घनफळाची असते. त्यातील वाढीमुळे वास घेण्याची क्षमता वाढते. झोप येण्यापूर्वी आपल्या आसपास धोकादायक श्‍वापदाचे अस्तित्व जाणणे प्राणिमात्राच्या जीवन-मरणाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे. हा गुणधर्म सर्व प्राण्यांत दिसतो व मानवातदेखील उतरलेला आहे. झोप येण्यापूर्वी जांभया येऊ लागतात. ही क्रिया अनैच्छिक प्रतिक्षिप्त असते. कंटाळा येणे ही मानसिक प्रक्रिया झोप येणे या शारीरिक क्रियेशी संबंधित आहे. ज्या वातावरणात मन रमू शकत नाही (कंटाळवाणे व्याख्यान) तेव्हा मनाला तेथून दूर जावेसे वाटते. पण सांस्कृतिक आणि इतर कारणांनी शरीर तेव्हा दूर जाऊ शकत नसले तर मन त्या वातावरणातून दूर एखाद्या कोषात गेल्याप्रमाणे लक्ष काढून घेते. म्हणजेच मनाची झोप सुरू होते. मानवी भावना संसर्गजन्य असतात. एखादी व्यक्ती घाबरली तरी आजूबाजूच्या व्यक्ती भयभीत होतात. एखादी व्यक्ती हसू लागली की सोबतच्या माणसांनाही हसू फुटते. त्याचप्रमाणे जांभया देणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात असणाऱ्या जांभया येऊ लागतात.

क्वचितच जांभया येणे हे एखाद्या मेंदूच्या विकाराचे लक्षण असते. फेफरे (epileptic fit) येणाऱ्या रुग्णाला फिट येण्यापूर्वी जांभया येऊ लागणे शक्‍य असते. मेंदू-ज्वर या आजारातदेखील रुग्णाला सारख्या जांभया येतात. अफू हा एक मादक पदार्थ आहे. त्याचे नियमाने सेवन करणाऱ्या व्यक्तीला अफूचे व्यसन लागते. अशा व्यक्तीला अफू मिळाली नाही किंवा मादक पदार्थांचे परिणाम नष्ट करण्याची औषधे दिली तर सतत जांभया येऊ लागतात.

जांभई येणे हा जरी वैश्‍विक अनुभव असला तरी त्याबद्दल संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती अजून मिळालेली नाही. व्यवहारात असे दिसते की कोणत्याही कारणाने रात्री झोप न मिळाल्यास दिवसा सारख्या जांभया येतात.
--
Ayurveda, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad