Sunday, February 27, 2011

'घाई जन्माची'

गर्भावस्थेत "गर्भसंरक्षक मंत्रस्तोत्रा'चे पठणही अभिप्रेत असते. गर्भवतीने व्यवस्थित काळजी घेतली व गर्भसंस्कार व्यवस्थित केले तर गर्भावस्था नऊ महिने नऊ दिवस असणे अपेक्षित असते. पण बऱ्याच वेळी गर्भवतीला असलेले काही त्रास, रोग, तिचे वय, पूर्वायुष्यातील घडलेले प्रसंग, बीजशक्‍ती कमी असणे वगैरे अनेक कारणांमुळे अपत्याचा जन्म लवकर होऊ शकतो.

कुठल्याही घरात बालकाच्या जन्माचा आनंद अवर्णनीय असतो. साधे गाईला वासरू झाले तरी ती त्याला चाटून साफ करते, शक्‍ती देते, उभे करण्याचा प्रयत्न करते. मनुष्याच्या बाबतीत अपत्याचा जन्म ही तर एक पर्वणीच असते. सृष्टिचक्र व्यवस्थित चालावे म्हणून परमेश्‍वराने निर्माण केलेली ही योजना हे जाणण्याची बुद्धी माणसाजवळ असते. केवळ एक निसर्गभाव म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन यापैकी निसर्गभावातून झालेला अपत्यलाभ असे न समजता माणसाला एक विशिष्ट कल्पना समजलेली असते. अत्यंत परिश्रमाने व काळजी घेऊन विकसित केलेले गुण व बुद्धी पुढे चालावी, गुणसूत्रांवर केलेली प्रक्रिया व संस्कार वाया न जाता ती गुणसूत्रे घेऊन पुढील पिढी जन्माला यावी आणि व्यावहारिक पातळीवर उभा केलेला पसारा आपल्या कुटुंबातील अंशाने पुढे सांभाळावा वगैरे अनेक तऱ्हेच्या कल्पना मनुष्य करू शकतो. म्हणून अपत्याचा जन्म ही फार मोठी पर्वणी ठरते. परंतु अपत्य जन्माला यावे किंवा आपल्याला मूल व्हावे अशी कल्पना डोक्‍यात येईपर्यंत वयाची 25-30 वर्षे खर्ची पडलेली असतात. लहानपणी लहान म्हणून व तरुणपणी लक्ष शिक्षणावर किंवा उच्छृंखलतेवर, मस्ती करण्यावर भर असल्यामुळे आधीच काही चुका घडतात. अपत्यप्राप्ती व्हावी असा विचार मनात आला की शारीरिक, मानसिक अडचणी दिसायला लागतात. वय परिपक्व नसताना केवळ एक शारीरिक आकर्षण म्हणून घेतलेल्या लैंगिक आनंदाचा पुढे अपत्यप्राप्तीच्या वेळी त्रास होऊ शकतो.

म्हणजे वीर्यशक्‍ती दूषित होणे, कमी होणे, तसेच शरीरसंबंधात अडचणी येतील अशा तऱ्हेने विकृती निर्माण होणे, वेगवेगळ्या तऱ्हेची इन्फेक्‍शन आल्यामुळे किंवा बीजांड, बीजांडकोश वा बीजवाहिन्यांमधील सिस्ट, गाठी, सूज उत्पन्न होण्यामुळे अपत्यप्राप्ती होण्यास अडथळा येऊ शकतो. यापैकी बरेचसे त्रास योग्य पंचकर्माद्वारे व आयुर्वेदिक उपचारांद्‌वारे दूर करता येऊ शकतात. पण तरीही 100 टक्के यश येईल याची खात्री देता येत नाही, काही भाग देवावर सोडावा लागतोच.

गर्भ राहिल्यापासून बालकाच्या जन्मापर्यंत आयुर्वेदीय गर्भसंस्कार व्यवस्थित केले, तर विशिष्ट गुणांनी युक्‍त अपत्य जन्माला येते. परंतु एकूणच प्रजननसंस्थेत मोठा दोष राहिला असल्यास अपत्याला त्रास भोगावाच लागतो.

अपत्याचा जन्म म्हणजे दोन द्रव्यांचे मिश्रण किंवा संयुग नव्हे. त्यात विशेष चैतन्याचा प्रभाव येऊन एक जीव स्वतःच्या सर्व संकल्पनेसह शरीर धारण करणे हा योगायोग असतो. त्यासाठी वंशपरंपरागत आलेले काही दोष किंवा येणाऱ्या जिवाचा स्वतःचा असा एक कार्यक्रम असू शकतो. म्हणून बऱ्याच वेळा स्त्री-पुरुषामधील प्रजननसंस्था वैद्यकीय दृष्ट्या सुव्यवस्थित असली तरी अपत्यप्राप्ती होत नाही. मूल अपंग वा सव्यंग जन्माला आले किंवा जन्म घेताना आईला वा मुलाला काही अडचणी उत्पन्न झाल्या तर त्याचे कारण शोधून काढणे खूप अवघड जाते.

गर्भावस्थेत मातेच्या गर्भाशयात गर्भाची वाढ विशिष्ट पद्धतीने होत असते. त्यात कुठलीही अडचण उत्पन्न होऊ नये म्हणून महिन्यागणिक वेगवेगळे आहार व विशेष शक्‍तीची उपासना सांगितलेली दिसते. तसेच गर्भावस्थेत "गर्भसंरक्षक मंत्रस्तोत्रा'चे पठणही अभिप्रेत असते. गर्भवतीने व्यवस्थित काळजी घेतली व गर्भसंस्कार व्यवस्थित केले तर गर्भावस्था नऊ महिने नऊ दिवस असणे अपेक्षित असते. पण बऱ्याच वेळी गर्भवतीला असलेले काही त्रास, रोग, तिचे वय, पूर्वायुष्यातील घडलेले प्रसंग, बीजशक्‍ती कमी असणे वगैरे अनेक कारणांमुळे अपत्याचा जन्म लवकर होऊ शकतो. सहा महिन्यांच्या आत जन्म झाल्यास गर्भाच्या शरीरातील अवयव व्यवस्थित व पूर्ण वाढ झालेले नसतात, त्यामुळे अशा अपत्याला वाढविणे ही तारेवरची कसरत ठरते. आठव्या महिन्यात जन्माला आलेल्या मुलाला सुद्धा त्रास होऊ शकतो, तसेच मातेलाही त्रास होऊ शकतो. म्हणून आठव्या महिन्यात प्रसूती होऊ नये यासाठी काळजी घ्यायला सुचविलेले असते.

परंतु एकूणच पूर्ण दिवस भरल्याशिवाय जन्माला आलेल्या मुलाला वाढविणे खूप अवघड ठरते. आधुनिक विज्ञानाने कमी दिवस गर्भात राहिलेल्या अशा बालकाच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी बरेच संशोधन करून उपाययोजना सांगितलेल्या आहेत. पण तरीही सर्व व्यवस्थित होऊन मूल दिसामासाने वाढावे म्हणून देवाची प्रार्थना करावीच लागते.

प्री मॅच्युअर बेबी किंवा कमी दिवस गर्भात राहिलेले मूल जन्माला आले तर त्याला वाढविणे खूप अवघड असते. एकदा का असे मूल व्यवस्थित वाढीला लागले, की मग मात्र त्याची शारीरिक, मानसिक व बौद्धिक वाढ सर्वसामान्यपणे किंवा अपवाद म्हणून विशेष चांगली झालेली दिसते. तरीही अशा प्रकारच्या अपत्याला जन्म देताना जर काही विशेष मदत घ्यावी लागली किंवा बाळ बाहेर यावे यासाठी त्याला डोक्‍याला धरून बाहेर आणण्यासाठी अवजारांचा वापर करावा लागला तर पुढे बालकाच्या मेंदूवर वा वाढीवर परिणाम होऊ शकतो.

एकूण काय तर निसर्गाच्या चमत्कारापैकी सर्वात मोठा चमत्कार असलेली जन्मप्रक्रिया व्यवस्थित व्हावी व निसर्गाने दिलेली काळ, वेळ व वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून काळजी घेणे आवश्‍यक असते. ह्यासाठी "गर्भसंस्कार संगीत' (सी.डी. - डॉ. श्री बालाजी तांबे) ऐकण्याचा खूप चांगला उपयोग होतो. देवाचा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर असावा अशी सकारात्मक विचारसरणी ठेवून श्रद्धा वाढवणेही गरजेचे आहे.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

No comments:

Post a Comment

ad