Friday, November 13, 2009

लवकर निजे, लवकर उठे; त्याला ऋद्धी-सिद्धी भेटे

झोप ही परमेश्‍वराची देणगी असल्यामुळे झोपेसाठी कुठल्याही बाह्य साधनांची आवश्‍यकता नसते. खरे तर झोप प्रत्येकाच्या स्वाधीन असावी व नैसर्गिक झोप मिळण्याचे भाग्य प्रत्येकास लाभावे. त्यासाठी "लवकर निजे, लवकर उठे' हा नियम पाळणे आवश्‍यक आहे.
- डॉ. श्री बालाजी तांबे

आमचे वडील रोज पहाटे साडेतीन वाजता उठत असत. नंतर दोन-अडीच मैल फिरायला जात असत. येताना कधी दंतमंजनासाठी व होम-हवनासाठी लागणाऱ्या गोवऱ्या बनविण्यासाठी शेण, कधी चार फुले गोळा करून आणत असत. साहजिकच ते रोज रात्री दहा वाजता झोपून जात असत. त्यांची दिनचर्या पाहून मनात विचार आला, की ते रोज सकाळी ऋद्धी-सिद्धीला भेटायला जात असावेत व त्यांना ऋद्धी-सिद्धी भेटतही असाव्यात. घराचा व वडिलांचा नियम व शिस्त म्हणून पहाटे उठणे आमच्या अंगवळणी पडलेले होतेच. वडील नियमाने रात्री दहा वाजता झोपत असत; पण बाकीच्यांना रात्री एवढे लवकर झोपणे जमत नसे. पिढीतले अंतर म्हणा वा नवीन पिढीच्या सवयी व कामकाजाच्या पद्धती म्हणा, पण रोज रात्री लवकर झोपणे आम्हा मुलांना जमत नसे. परंतु आम्हा "ऋद्धी-सिद्धी भेटे' या वचनाचे आकर्षण मात्र खूप होते. ऋद्धी-सिद्धी कोणाला नकोत?

यावर नीट विचार केल्यावर लक्षात आले, की अल्पशा उत्पन्नात सात माणसांचे कुटुंब व्यवस्थित चालवून, सर्व सण-वार, आला-गेला, पै-पाहुणा, देणे-घेणे वगैरे सर्व सांसारिक गोष्टी सांभाळून जीवन आनंदात जगण्यासाठी सिद्धीची आवश्‍यकता असणार. आम्हा मुलांना शिक्षणाची आवड लावून त्यांचे शिक्षण पुरे करणे आणि मुलांना पुढे त्यांचे जीवन व्यवस्थित जगता येईल अशी ऋद्धी-सिद्धींची शिदोरी त्यांना देणे, हे सर्व साध्य झालेले पाहिले, की "लवकर निजे, लवकर उठे; त्याला ऋद्धी-सिद्धी भेटे' हे खरे असावे, असे पटते.

परमेश्‍वर चर्मचक्षूंना दिसत नाही, त्यामुळे ऋद्धी-सिद्धी या देवता असल्याने त्याही डोळ्यांना दिसत नाहीत. परंतु या देवता सर्जनाच्या रूपाने प्रकट होतात. कर्म करत राहिले, की आपले हात व त्यात असलेले आपले कौशल्य आपल्याला दिसते. पण परमेश्‍वराचे ऋद्धी-सिद्धींच्या माध्यमातून मदतीला आलेले हात दिसत नसले, तरी कार्य पूर्ण झाल्यावर त्या यशात परमेश्‍वराच्या हाताचे अस्तित्व नक्कीच दिसू शकते. निसर्गचक्राला अनुसरून मनुष्य चालला तर यश मिळेल, यात काही शंका नाही.

सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपसूक सर्व प्राणिमात्र जागे होतात, शक्‍तीचे उत्थापन होते, कामाला प्रेरणा मिळते व हलके हलके दिवस जसा जसा वर येतो तसतशी स्फूर्ती वाढते आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी आपणही विसावा घ्यावा, अशी भावना उत्पन्न होते. म्हणून हे चक्र सांभाळण्यासाठी सकाळच्या प्रहरी उठणे आरोग्यासाठी हितकर ठरावे.

सूर्योदयापूर्वी उठल्यास उषःकाली सूर्यकिरणांमध्ये विशिष्ट प्रकारच्या शक्‍ती मनुष्याला मिळू शकतात. पहाटे एकूणच वातावरण शांत असते, आदल्या दिवसाचे गोंधळ घालणारे विचारतरंगही शांत झालेले असतात. म्हणून नवीन संकल्पना, प्रेरणा उत्पन्न होण्यासाठी या शांत वातावरणाचा फायदा होऊ शकतो. सकाळी उठून केलेला अभ्यास नीट स्मरणात राहतो.

साहजिकच पहाटे लवकर उठायचे असल्यास माणसाला आवश्‍यक असणारी सहा-सात तासांची झोप पूर्ण होण्यासाठी रात्री लवकर, 10-11 वाजता झोपणे आवश्‍यक आहे. तेव्हा लवकर उठणाऱ्याला लवकर झोपावे लागतेच वा ते आपसूक घडतेच. रात्रीच्या वेळी पित्ताची वेळ असल्याने त्या वेळी शरीरात वाढणारे पित्त व उष्णता कमी करण्यासाठीही लवकर झोपून लवकर उठण्याचा उपयोग होतो. यामुळे माणसाची प्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी उपयोग होतो आणि एकूणच मनःस्वास्थ्य मिळून यश व उत्कर्ष होतो.

दिव्याची चिमणी व कंदिलांच्या युगात अभ्यास करण्यासाठी पहाटेच्या प्रकाशाचा लाभ घेतला, की अभ्यास करणे व वाचन सोपे होत असे. त्यामुळे या काळी रात्री उशिरा जागून अभ्यास करण्याचा प्रश्‍न येत नसे. त्या काळी रात्री एकूणच अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोर-चिलटे सोडून सर्व जण रात्री लवकर झोपून जात असत. सध्या आधुनिक काळात रात्री जागरण करण्यासाठी दिवे जाळावे लागत असल्याने विजेची मागणी वाढते, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास होतो. सूर्य उगवण्याच्या वेळेस वा सूर्य उगवल्यानंतर झोपून राहणे म्हणजे सर्व दिवे चालू ठेवून, मीटर चालू ठेवून झोपण्यासारखे आहे. अशा दृष्टीने विचार केला असताही "लवकर निजे लवकर उठे' या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. वाहनांचे अपघात रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात होतात, रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांकडून कमी काम केले जाते, त्यांचे कामावर लक्ष कमी असण्याचा संभव अधिक असतो.

परस्वाधीनता म्हणजे दुःख व स्वतःच्या आत्मप्रेरणेने सर्व घडणे म्हणजे सुख व स्वतंत्रता. झोप ही परमेश्‍वराची देणगी असल्यामुळे झोपेसाठी कुठल्याही बाह्य साधनांची आवश्‍यकता नसते. काही व्यक्‍तींना झोप येण्यासाठी पुस्तक वाचणे, टीव्ही पाहणे, संगीत ऐकणे यांची गरज भासते. काहींना तर झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येत नाही. खरे तर झोप प्रत्येकाच्या स्वाधीन असावी व नैसर्गिक झोप मिळण्याचे भाग्य प्रत्येकास लाभावे. त्यासाठी "लवकर निजे लवकर उठे' हा नियम पाळणे आवश्‍यक आहे. असा सर्व बाजूंनी विचार केला असता रात्र झोपण्यासाठी असते हे लक्षात येते. रात्रीचे जागरण करूनही त्रास न होणारी मंडळी लाखात एक-दोन असू शकतात. इतर सर्वांनी मात्र लवकर निजे लवकर उठे हा नियम पाळल्यास मानवजातीचे कल्याण होऊ शकेल. कारण त्यांच्या पाठीमागे उभ्या असतात ऋद्धी-सिद्धी!

- डॉ. श्री बालाजी तांबे

No comments:

Post a Comment

ad