Friday, April 4, 2008

डॉक्‍टर मी काय पिऊ?

(वैद्य विनीता कुलकर्णी)
उन्हाळ्याच्या दिवसात तहान फार लागते आणि मग शरीरावर भरपूर कोल्ड्रिंक्‍सचा मारा केला जातो. पण असं करणं योग्य असतं का? उन्हाळ्यात आणि एरवीही कोणत्या द्रवपदार्थांचे सेवन करावे? ते कोणत्या प्रमाणात करावे? अशा प्रश्‍नांचे जंजाळ अनेकांना नेहमी अस्वस्थ करीत असते. .......
सध्या विविध "कोल्ड्रिंक्‍स' हे लोकांचे प्रमुख आकर्षण झाले आहे. गोल्डस्पॉट, सिट्रा, लिम्का, कोकाकोला, मिरिंडा इत्यादी प्रकारची कोल्ड्रिंक्‍स तरुण पिढीच्या दृष्टीने "अमृत' बनली आहेत. तसेच चहा-कॉफी यासारखी पेये तर काही जण टाईमपास म्हणून तर काही जण केवळ जेवायला वेळ नाही म्हणून दिवसातून १०-१५ वेळेस घेण्यासही कमी करत नाहीत. त्या क्षणी आनंद मिळत असला तरी ही पेये जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा शरीरावर निश्‍चितच वाईट परिणाम होतो. बऱ्याचदा हे वाईट परिणाम त्वरित दिसून येतातच असे नाही. पण हळूहळू काही ना काही निमित्त/ कारण होऊन परिणाम जाणवायला लागतात.

जेव्हा अतिश्रम होऊन शरीराची ऊर्जा खर्च होते आणि तहान लागल्याची जाणीव होते तेव्हाच योग्य व आवश्‍यक तेवढेच पेयपान घ्यावे, तरच ते शरीरास हितकर होते. निरनिराळी कोल्ड्रिंक्‍स, मादक पेये, चहा, कॉफी यासारखी पेये वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात घेतल्यास शरीराची पचनशक्ती मंदावते; आणि अपचन, जडपणा, सर्दी इत्यादी तक्रारींना सुरवात होते. चहामधील "टॅनिन' हे द्रव्य शरीराला हानिकारक असते. चहा जास्त वेळ ठेवून प्यायल्यास त्यात टॅनिन जास्त प्रमाणात उतरते आणि त्याचा परिणाम पचनक्रियेवर होऊन ती बिघडते. परिणामी, मलोत्सर्ग व्यवस्थित होत नाही व मलबद्धता, अजीर्ण, गॅसेस या तक्रारी तोंड वर काढतात. निद्रानाश, आम्लपित्त यासारख्या व्याधी उत्पन्न होतात. खूप लोकांमध्ये अशी समजूत आहे, की चहापेक्षा कॉफी शरीराला चांगली असते, परंतु कॉफीमधील कॅफिन हेसुद्धा टॅनिनसारखेच हानिकारक असते. कित्येक लोकांना कॉफी उकळून त्याचा काढा करून पिण्याची सवय असते. पण अशा पद्धतीने कॉफी घेतल्यास भूक मंदावते. त्यायोगे अपचनाचा विकार जडतो. या पेयांमधून पौष्टिक घटक न मिळाल्याने शरीरावर लवकर सुरकुत्या पडतात; शरीर निस्तेज बनते. ही पेये उत्तेजक असल्याने ती सेवन केल्यास तात्पुरत्या स्वरूपात उत्साह, तरतरी वाढते, पण आवश्‍यक ती पोषक घटकद्रव्ये शरीरात न गेल्याने त्याचे दुरगामी परिणाम वाईट होतात. काही जणांना अत्यंत गरम, उकळता चहा घेण्याची सवय असते- ज्यामुळे जळजळ, अशक्तपणा आम्लपित्त या तक्रारी आढळून येतात.

आकर्षण टाळा
चहा-कॉफीप्रमाणेच प्रमुख आकर्षण असणारे अत्यंत घातक पेय म्हणजे मद्य! योग्य प्रमाणात, योग्य काळी मद्यपान शरीरास हानिकारक ठरत नाही; परंतु त्याचे वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास निश्‍चितच वाईट परिणाम होतात. यकृताचे विकार जडतात, कोठा बिघडून मलोत्सर्ग व्यवस्थित होत नाही, अपचनामुळे उलटी, ताप या तक्रारी वारंवार उद्‌भवतात.

आपल्या शरीराला अत्यंत हितकारक ठरणारे पेय म्हणजे पाणी! तहान लागल्यावर "पाणी' हेच पेय सेवन करणे अपेक्षित असते. अतिथंड पेयांमुळे पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. या पेयांच्या सेवनाने मिळणारा उत्साह तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. त्यामुळे जेव्हा शरीराला द्रवपदार्थाची नितांत गरज असते तेव्हा इतर कोणत्याही पेय प्रकारांपेक्षा "पाणी' हेच पेय हितकारक ठरते. शरीरातील सर्व भागास आकार, लवचिकपणा, उत्साह उत्पन्न करण्यास "पाणी'च कारणीभूत असते. अन्न चावताना जी लाळ त्यात मिळते तिच्यात ९१ टक्के पाणीच असते. अन्नाबरोबर सेवन केलेले पोषक क्षार पाण्याद्वारेच रक्तात मिसळतात. आरोग्याच्या दृष्टीने पाणी जर योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने घेतले तर निश्‍चितच हितकर ठरते.

पाणी कसे प्यावे?
पाणी हे पेय कसे घ्यावे, याबाबतही सर्वसामान्य लोकांच्या मनात गैरसमजुती आहेत. पाणी थंड प्यावे की गरम, उकळून थंड केलेले असावे का, केव्हा प्यावे, किती प्रमाणात प्यावे, या सर्व गोष्टी आरोग्य उत्तम राहण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. शास्त्रकारांच्या मते, स्वच्छ पाणी सूर्योदयापूर्वी प्यायल्यास उत्तम आरोग्य प्राप्त होते. पण अशा पद्धतीने प्यायलेले पाणी प्रत्येक व्यक्तीला लागू पडेलच असे नाही. कारण प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्यामुळे तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यानुसारच सकाळी पाणी पिण्याची सवय लावून घ्यावी. ताम्रपात्रातले पाणी पिण्यास उत्तम समजावे.

थंड पाणी आणि गरम पाणी- दोन्हींच्या गुणधर्मांमध्ये निश्‍चितच फरक आहे. थंड पाणी सेवन केल्यास मूर्च्छा, दाह, तृष्णा, उष्णता, रक्तपित्त शमन पावतात. पण हेच थंड पाणी ताप आल्यास, अजीर्ण झाल्यास, पोट दुखत असल्यास सेवन केले तर हानिकारक ठरते. गरम पाणी हे पाचक, कंठास हितकर असते. पोटफुगी, नवीन ताप, अजीर्ण, सर्दी, खोकला यात गरम पाणीच हितकर ठरते. अशा प्रकारे आरोग्य चांगले राहण्यासाठी थंड आणि गरम पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून घ्यावा लागतो. आपल्याला असे दिसून येते, की बऱ्याच लोकांमध्ये जेवताना पाणी प्यावे की नंतर प्यावे, या बाबतीत गैरसमजुती आहेत. आयुर्वेद शास्त्रानुसार जेवताना पाणी पिणेच इष्ट असते. त्यामुळे अन्नातील स्निग्ध पदार्थांचे सुलभ रीतीने पचन होऊन आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. या संदर्भात आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय सूत्रस्थानाच्या अध्याय ५ मध्ये असा उल्लेख आहे
समस्थूलकृशाभुक्तमध्यान्तप्रथमाम्बुपाः।
अ.हृ.सू. ५/१४

जेवताना प्रथम पाणी पिण्याची सवय असणारी व्यक्ती कृश बनते. आपण व्यवहारात पाहतो, की प्रज्वलित अग्नीवर पाणी घातल्यास तो मंद होतो किंवा विझतो, तद्वतच एखाद्या व्यक्तीला भूक लागते म्हणजेच त्या वेळी त्या व्यक्तीत जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. अशा वेळी आहाराऐवजी पाणी घेतले तर त्यावर परिणाम होऊन भूक मंदावते. परिणामी, अन्नपचन व्यवस्थित न होऊन कृशता येते. जेवणामध्ये पाणी प्यायल्यास अन्नांशाचे पचन होण्यास मदत होते आणि आरोग्य उत्तम राहते. जेवणानंतर पाणी प्यायल्यास कफाची वाढ होऊन स्थूलता येते, म्हणजेच जेवताना पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वाधिक हितकर असते. ज्याप्रमाणे पाणी केव्हा प्यावे, कसे प्यावे, याला महत्त्व आहे त्याप्रमाणे कोणत्या प्रकारचे पाणी शरीराला हितकर असते यालाही महत्त्व आहे; आणि त्याला ग्रंथोक्त आधारही आहे. खडकाळ जमिनीत क्षार कमी असतात व तीतून वाहत जाणाऱ्या पाण्यात क्षार फारसे मिळत नाहीत. याकरिता अशा खडकाळ जमिनीतील झऱ्याचे पाणी पिण्यास चांगले व आरोग्यकारक असते. अशा प्रकारे "पाणी' हे सर्वांना सुपरिचित पेयदेखील उत्तम आरोग्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने सेवन करावे, याला महत्त्व आहे.

ताकाचे महत्त्व
आपल्या आहारात असणारे आणि आरोग्यास हितकर असे आणखी एक पेय म्हणजे ताक. विरजलेल्या दह्यात पाणी घालून ते घुसळल्यावर जे लोणी येईल ते काढून जो द्राव शिल्लक राहतो त्यास ताक म्हणतात. ताक हे ताजेच असावे. लोणी न काढलेले ताक हे लोणी काढलेल्या ताकापेक्षा पचनास जड असते. ताक शक्‍यतो अर्धे जेवण झाल्यावर घ्यावे. पचनसंस्थेच्या विकारांवर ताक उत्तम कार्य करते. जुलाब होणे, आव पडण्याची तक्रार असणे, मूळव्याध, यासारख्या विकारांत तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार ताकाचा उपयोग केल्यास निश्‍चितच फायदेशीर ठरते. ताकावर विविध संस्कार करून निरनिराळे पदार्थही केले जातात. त्यापैकी "मठ्ठा' हा प्रकार सर्वांना परिचित आहे. त्यात हिंग, आले, जिरेपूड, साखर, कोथिंबीर इ. पदार्थ योग्य प्रमाणात मिसळलेले असतात. पचनाच्या तक्रारीत अथवा भूक मंदावल्यास मठ्ठ्याचा योग्य पद्धतीने उपयोग करावा. अशा प्रकारे "ताक' हे पेय सर्वांनीच योग्य पद्धतीने सेवन करावे. आजच्या या प्रचंड धावपळीच्या काळात थकवा कमी व्हावा याकरिता दूध, ताकासारखी पेये जरी आवश्‍यक असली तरी त्वरित तरतरी आणि उत्साह आणणारी पेये तेवढीच गरजेची असतात. अशा वेळी विविध कोल्ड्रिंक्‍स, मिल्कशेक यांच्या आहारी न जाता नारळाचे पाणी, लिंबू सरबत, फळांचे रस यांचे सेवन केले तर त्वरित उत्साह तर वाटतोच, पण त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होत नाही. खूप उन्हात फिरल्याने थकवा आल्यास नारळाचे पाणी प्यावे. मळमळ होत असल्यास, पित्ताचा त्रास होत असल्यास थंड लिंबू सरबत घ्यावे; ज्यामुळे आरोग्यास हानी होत नाही आणि थंड पेय घेतल्याचे समाधानही लाभते. त्याचप्रमाणे डाळिंबाचा रस, मोसंबी ज्यूस, कोकम सरबत यांचाही उपयोग करावा.

भूक मंदावू नये म्हणून
आजच्या फॅशनच्या युगात विविध हॉटेले लोकांचे लक्ष वेधून घेतात. वाढदिवस, पार्टीच्या निमित्ताने पुष्कळ लोक हॉटेलात जाऊन यथेच्छ भोजन करताना आढळतात. जेवणापूर्वी सूप घेण्याची पद्धत खूप ठिकाणी आढळून येते. आजच्या भाषेत "ऍपिटायझर' म्हणून पुष्कळ लोक सूप घेताना आढळतात. पण त्यामुळे भूक मंदावते. मागे उल्लेख केल्याप्रमाणे भूक लागलेली असताना, म्हणजेच शरीरातील अग्नी दीप्त असताना प्रथम द्रवाहार घेतला तर अग्नी मंद होतो. म्हणजेच पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जेवणामध्ये "सूप्स' हा प्रकार घेतला तर तो विशेष हानिकारक ठरत नाही. ऍपिटायझरच्या नावाखाली प्रचलित असणारी अत्यंत मसालेदार सूप्स घेतल्यास त्याचा त्रास होण्याचा संभव असतो.

अशा प्रकारे सध्या प्रचलित असणारे कोल्ड्रिंक्‍सचे विविध प्रकार, चहा, कॉफी, दूध- फळेमिश्रित मिक्‍सफ्रूट ज्युसेस, मिल्कशेक यांच्यापेक्षा शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबतासारखी पेये सेवन केली तर निश्‍चितच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आयुर्वेदशास्त्रात स्वास्थ्यरक्षणास सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आहार कसा असावा, किती प्रमाणात असावा, या गोष्टी जितक्‍या महत्त्वाच्या आहेत तितकेच महत्त्व पेय प्रकारांना आहे आणि उत्तम स्वास्थ्यासाठी कोणती पेये उपयोगी असतात याचे वर्णन आयुर्वेदीय ग्रंथांत आढळून येते. विविध जाहिराती पाहून सध्या प्रचलित असणाऱ्या कोल्ड्रिंक्‍सच्या आहारी न गेल्यास आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्याच्या आनंदात मद्य, चहा यासारखी पेये न घेतल्यास उत्तम स्वास्थ्य लाभेल, यात काहीच शंका नाही.

- वैद्य विनीता कुलकर्णी
आयुर्वेद तज्ज्ञ, पुणे.

1 comment:

  1. फारच उपयुक्त माहिती मिळाली, त्याबद्दल धन्यवाद !!

    ReplyDelete

ad