Wednesday, December 5, 2012

आवळी पूजन-भोजन


आवळी पूजन-भोजन
डॉ. श्री बालाजी तांबे
आवळ्याच्या वृक्षाच्या छायेपासून ते आवळ्याचे फळाचे अगणित उपयोग असल्याने त्याला "अमृतफळ' म्हणायला हरकत नाही. आवळा हे फळ दुर्लक्षिले जाऊ नये, या हेतूने व आवळ्याच्या फळात व वृक्षात असलेल्या जाणिवेशी संपर्क वाढविण्याच्या हेतूने योजलेले असते आवळीपूजन व आवळीभोजन. साधारणतः आवळीपूजन पुरुष करत असले, तरी आवळ्याच्या झाडाच्या परिसरात काही वेळ घालवणे, भोजन करणे, खेळ खेळणे हा विषय स्त्रियांचा व मुलांचा असलेला दिसतो. तेव्हा आवळीच्या झाडाभोवती असलेले वातावरण व त्यातून बाहेर पडणारी तरंगशक्‍ती यांचा लाभ घेण्याच्या निमित्ताने आवळ्याच्या झाडाचे वर्षभर संवर्धन केले जाते. 

हेमंत ऋतूत ऋतुबदलाचा व ऋतुमानाचा अधिकाधिक फायदा घेता यावा, या दृष्टीने आवळ्याच्या झाडाची पूजा, आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसणे, तेथे भोजन करणे असे संस्कार भारतीय परंपरेत असलेले दिसतात. साधारणतः आवळीपूजन पुरुष करत असले, तरी आवळ्याच्या झाडाच्या परिसरात काही वेळ घालवणे, भोजन करणे, खेळ खेळणे हा विषय स्त्रियांचा व मुलांचा असलेला दिसतो. तेव्हा आवळीच्या झाडाभोवती असलेले वातावरण व त्यातून बाहेर पडणारी तरंगशक्‍ती यांचा लाभ घेण्याच्या निमित्ताने आवळ्याच्या झाडाचे वर्षभर संवर्धन केले जाते. आवळ्याचे रसायन म्हणून असलेले माहात्म्य सर्वांच्या कायम लक्षात राहावे, हाही आवळीपूजनाचा हेतू.

घराजवळ लावाव्या अशा ज्या वनस्पती भारतीय आयुर्वेद शास्त्रात सांगितल्या आहेत त्यात आवळ्याचे स्थान वरचढ आहे. जवळजवळ सर्व रोग बरे करण्यासाठी सुंठीचा उपयोग होत असतो, लिंबू सर्व प्रकारच्या भौतिक, मानसिक, आध्यात्मिक असंतुलनावरचा उपाय आहे. अनेक तक्रारींवर उपयोगी ठरणारे त्रिफळा चूर्णाचे घटक असणारे आवळा, हिरडा व बेहडा हे वृक्ष खूप महत्त्वाचे आहेत. आमलकी रसायन, च्यवनप्राश, आवळा खाणे, आवळ्याचा रस घेणे, आवळा चूर्ण सेवन करणे अशा अनेक प्रकारे आवळ्याचे सेवन करता येते. आवळा हा सर्वांना परवडणारा व रसायन गुणाने अत्युत्तम, आयुष्यवृद्धी करणारा, अमृतासमान असणारा आहे.

हेमंत ऋतूत रसायनाचे सर्वांत अधिक महत्त्व असते. रसायनात सर्वोत्तम, वर्षभर टिकणारे, कायम सेवन करता येणारे, आबालवृद्धांना उपयोगी पडणारे रसायन म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राशात बनविताना इतर 30 ते 35 वनस्पती आवश्‍यक असल्या तरी आवळा हा च्यवनप्राशातील मुख्य घटक आहे. च्यवनप्राश बनविताना विशिष्ट वनस्पतींचा काढा करताना त्यात आवळे शिजवून घेतले जातात. आवळे शिजताना फुटून जाऊन वनस्पतींमध्ये मिसळून जाऊ नयेत म्हणून ते चाळणीत ठेवून किंवा पोटलीत बांधून शिजवणे आवश्‍यक असते. त्यानंतर आवळ्यातील बिया व रेषा (धागे) काढून टाकून आवळ्याचा मऊ व सुंदर असा गर लेह रूपाने सुटा केला जातो. आवळे ज्या वनस्पतींच्या काढ्यात शिजवले तो काढा एकचतुर्थांश झाल्यानंतर काढा गाळून घेऊन वनस्पती टाकून दिल्या जातात. काढा मंद आचेवर आटवला जातो. काढा चाटणासारख्या अवस्थेत आला की त्यात खडीसाखरेचा पाक, तेला-तुपावर परतलेला आवळ्याचा गर टाकला जातो. हे मिश्रण शिजवले की च्यवनप्राशाची प्राथमिक अवस्था तयार होते. या रसायनात नंतर सुंठ, मिरी, पिंपळी वगैरे द्रव्ये टाकली जातात. शेवटी मध मिसळला की च्यवनप्राश तयार होतो. या च्यवनप्राशात वीर्यवर्धन करणारी इतर द्रव्ये, सोन्या-चांदीची भस्मे वा वर्ख टाकून त्याची ताकद वाढवली जाते. आवळ्याबरोबर दुसरे कुठले तरी फळ मिसळणे, स्वस्तात मिळालेल्या चार-पाच वनस्पतींचे चूर्ण साखरेच्या पाकात टाकून बनविलेला च्यवनप्राशसदृश पदार्थामुळे कुठलाच फायदा होऊ शकत नाही. योग्य विधीने बनविलेल्या च्यवनप्राश सेवन केल्याने मेंदूने दिलेल्या संवेदना इंद्रियांपर्यंत पोचवणे ही क्रिया योग्य रीतीने घडते, मेरुदंडाचे स्वास्थ्य, लहान व मोठ्या मेंदूचे आरोग्य सांभाळले जाते, मनुष्याला तारुण्यशक्‍ती, बुद्धी, मेधा यांचा लाभ होतो.

आवळे चोचवून साखरेत ठेवून केलेला मोरावळा उत्तम औषधी असतो. चांगले आवळे वाळवून केलेले चूर्ण शिकेकाईमध्ये मिसळून केस धुणे केसांना हितकर असते. आवळ्याचे चूर्ण सेवन करण्याचेही अनेक लाभ होतात. हे सर्व आवळ्याचे उपयोग लक्षात घेतले तर आपल्या परंपरेत ठेवलेले आवळीपूजन किती आवश्‍यक आहे याची कल्पना येऊ शकेल.

एकूण आवळ्याच्या वृक्षाच्या छायेपासून ते आवळ्याचे फळाचे अगणित उपयोग असल्याने त्याला "अमृतफळ' म्हणायला हरकत नाही. आवळा हे फळ दुर्लक्षिले जाऊ नये या हेतूने व आवळ्याच्या फळात व वृक्षात असलेल्या जाणिवेशी संपर्क वाढविण्याच्या हेतूने योजलेले असते आवळीपूजन व आवळीभोजन.

www.balajitambe.com


Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad