Showing posts with label उपवास. Show all posts
Showing posts with label उपवास. Show all posts

Thursday, July 9, 2009

आत्मवास

उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही- जो मनाला बरोबर घेऊन वा मनाला बाजूला ठेवून, शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो.
भारतीय संस्कृतीत व प्राचीन भारतवर्षात मानवाच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी जे काम करून ठेवले आहे, ते संपूर्ण जगात इतरत्र कुठेही झालेले दिसत नाही. लोककल्याणासाठी, मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी, मानवाचे जीवन समृद्ध करण्यासाठी अनेक शास्त्रे विकसित केली व महत्त्वाचे म्हणजे ही सर्व शास्त्रे एकमेकाला पूरक आहेत. आरोग्य उत्तम राहण्यासाठी, आध्यामिक उन्नती व्हावी यासाठी व माणसाला हवी असलेली चिरंतन शांती मिळावी यासाठी उपवासाचे नियोजन केलेले दिसते.
साधारणतः उपवास म्हणजे खाण्याशी संबंधित क्रिया हे समीकरण असल्यामुळे उपवासाचा संबंध केवळ शरीराच्या आरोग्याशी आहे असा समज होतो. परंतु उपवास हा माणसे त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्म्याशी जोडणारा एक विधी आहे. "उप' म्हणजे जवळ व "वास' म्हणजे राहणारा. म्हणजे आपल्या सर्वात जवळ राहणाऱ्याशी भेट करवून देणारा तो "उपवास'. खरे पाहताना मनुष्य स्वतःच्या जेवढा जवळ असेल जेवढा स्वतःशी एकरूप असेल, त्याचे बाह्य व्यक्तिमत्त्व त्याच्या अंतरंगाशी जेवढे समरूप व जोडलेले असेल तेवढा मनुष्य आरोग्यवान राहतो.
प्रज्ञापराध म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यापासून दूर नेणारे कर्म असे समजायला हरकत नाही व आयुर्वेदाने प्रज्ञापराध हेच सर्व रोगांचे कारण सांगितले आहे.
उपवास ही एक शरीर व मन व आत्मा यांना एकत्र जोडण्यासाठी केलेली योजना आहे. म्हणजे उपवास हा सर्वात मोठा आध्यात्मिक योग म्हणायला हरकत नाही, जो मनाला बरोबर घेऊन वा मनाला बाजूला ठेवून, शरीर व आत्म्याला एकत्र जोडतो.
भारतात चार महिने एवढ्या मोठ्या कालावधीसाठी उपवासतंत्राचे विशेष नियोजन केलेले दिसते. वर्षा ऋतूत ज्यावेळी पावसाळा परम अवस्थेत असतो, म्हणजे साधारण श्रावण, भाद्रपदात होणारी वातवृद्धी सर्वांना त्रासदायक ठरू शकते. वातामुळे शरीराला अस्वस्थता येऊ शकते, रोग निर्माण होऊ शकतो वा मनाला चंचलता प्राप्त होऊ शकते. मनाच्या चंचलतेमुळे सर्व कटकट व त्रास उत्पन्न नाही झाले तरच नवल.
म्हणून आषाढी एकादशीपासूनचे पुढचे चार महिने उपवासासाठी वापरावेत असे शास्त्राने सांगून ठेवले आहे. या चार महिन्यात एखादी विशिष्ट वस्तू सेवन न करणे, जडान्नाचे सेवन टाळणे, मांसाहार न करणे, मद्यपान न करणे, कांदा, वांगे वा तत्सम वातूळ पदार्थ न खाणे असा उपवास करता येतो. याच बरोबर सोमवार, शनिवार वगैरे आठवड्यातून एक दिवस किंवा एकादशी, प्रदोष, चतुर्थी वगैरे दिवस निवडून उपवास करता येतो. साधारणतः उपवासात तपस्या अंतर्भूत असल्यामुळे स्वतःचे आवडीचे पदार्थ न खाता साधे, पचायला सोपे असलेले अन्न खाण्याचा नेम केला जातो. या सगळ्याने मन शांत होऊन शरीरशक्‍ती, मन व आत्मा यांना एकत्र करण्यासाठी वापरता येईल अशी योजना असते. म्हणून साधारणतः एकभुक्‍त राहून उपवास केला जातो म्हणजे एक वेळ जेवण करून बाकी वेळ लंघन केले जाते; एखाद्या दिवशी नुसत्या फळांवर, दुधावर वा पाण्यावर राहणे, पचायला सोपा असा एकच कुठला तरी पदार्थ खाणे अशा अनेक प्रकारे उपवास केला जाऊ शकतो.
चातुर्मासातील उपवास विशेष महत्त्वाचे असले तरी विशिष्ट दिवशी, विशिष्ट कारणाने बारा महिने उपवास केले जातात. गुरुकृपा लाभण्याच्या हेतूने गुरुवारी, शनीची बाधा होऊ नये या हेतूने शनिवारी, श्रीविष्णूंच्या कृपेसाठी एकादशी वा प्रदोष, शंकरासाठी सोमवारी उपवास करणारी मंडळी असतात.
विष्णू, शंकर ही विशिष्ट शक्‍तींची नावे असून त्या शक्‍तीच्या देवतांना प्रसन्न करणे म्हणजे ती शक्‍ती मिळविणे किंवा त्या शक्‍तीच्या अभावाने होणारे त्रास टाळणे हा उपवासामागचा हेतू असू शकतो. ग्रहणकाळात प्रकाशशक्ती मंद झाल्यामुळे वातावरण दुषित होते व पचनक्रिया मंदावते म्हणून आजारी माणसाशिवाय इतरांनी अन्नपान करू नये असे समजतात, हाही एक प्रकारचा उपवासच समजायला हरकत नाही.
कायाकल्पातील पंचकर्म हा विधी करून घेत असताना रात्रीच्या जेवणात जवळजवळ काही खायला न देता पंचकर्म करून घेणाऱ्याचे समाधान व्हावे या दृष्टीने २-३ वाट्या नुसते सूप दिले जाते, जे दात न वापरता नुसते गिळता येते. पंचकर्मादरम्यान असा आहार दिल्याने संपूर्ण शरीराची शुद्धी होऊन चेहऱ्यावर तेज येते.
परदेशात अनेक ठिकाणी उपवास ही संकल्पनाच माहिती नाही. तरीही युरोपीय देशात काही ठिकाणी वर्षातील चाळीस दिवस उपवास करण्याची प्रथा आहे. येशू ख्रिस्तांना क्रूसावर चढविण्याची घटना दुःखद असल्यामुळे या दिवसापासून ४० दिवस उपवास केला जातो. परंतु ही दुःखद घटना असल्यामुळे आपण आनंदात राहू नये असा सीमित अर्थ घेऊन मद्य व मांसाहार टाळला जातो असे दिसते. यावेळी बाकी सर्व गोष्टी सेवन केल्या जातात; मासे खाणे हा मांसाहार नाही असे समजून या उपवासादरम्यान मत्स्याहारही केला जातो.
काही ठिकाणी उपवासाच्या वेगळ्या पद्धती आढळतात. दिवसभर पाणी न पिता रात्री उपवास सोडणे अशा प्रकारच्याही उपवासाच्या पद्धती दिसतात. त्यामागे देशपरत्वे काही कारण असू शकते.
भारतीय परंपरेने व भारतीय शास्त्राने सुचविलेला उपवास अत्यंत वैज्ञानिक, शास्त्रशुद्ध व अलौकिक आहे असेच म्हणावा लागेल. अर्थात उपवासाचा अतिरेक करू नये. उपवास करणे हा एक निर्णय असतो. साधारणतः उपवासाच्या दिवशी परमेश्‍वराची उपासना व आत्मचिंतन अपेक्षित असते. अधिक सावधानता ठेवणे अपेक्षित असते. तेव्हा चुकून काही तरी तोंडात टाकले व उपवास मोडला असे घडू नये. कधीतरी लहान मुलाने एखादा उपवासाला न चालणारा पदार्थ उपवास करणाऱ्याच्या तोंडात घातला तर उपवास मोडला असे समजून मनःस्ताप करून घेण्यात काही अर्थ नसतो.
प्रत्येकाने स्वतःची प्रकृती पाहून, स्वतःचे वजन पाहून, वात-पित्त-कफदोषांचा विचार करून केव्हा, कधी व कसा उपवास करायचा हे ठरविणे आवश्‍यक असते. मित्र उपवास करतो आहे म्हणून वा परमेश्‍वराकडून वर मिळण्याच्या लोभाने उपवास करणे काही खरे नव्हे. उपवास करणे याचा अर्थ काही न खाता उलट अधिक काम करणे व असावधातनेने इकडे-तिकडे भटकणे ही गोष्ट निंद्य समजली पाहिजे. सावधानता, सजगता, आत्मचिंतन, नामजप, भक्ती, सेवा असे सर्व करून नंतर अन्न बनविण्यात, जेवण्यात व नंतर पचविण्यात वेळ जाऊ नये म्हणूनही उपवासाच्या दिवशी खाण्या-पिण्यावर निर्बंध असावा. खाण्या-पिण्यावर निर्बंध पाळत असताना उपवासाचे निरनिराळे पदार्थ सेवन करून जिभेचे चोचले पुरवायचे असे उपवास बरोबर नाही.
कितीही शपथ घेऊन उपवासाचे व्रत घेतलेले असले तरी वृद्ध वा आजारी व्यक्‍तींनी उपवास न करणेच श्रेयस्कर असते. अशांनी डॉक्‍टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा.
धार्मिक संकल्पनेवर आधारित हरतालिका, वटपौर्णिमा, ऋषिपंचमी वगैरे उपवासही स्त्रिया करतात. धार्मिकता हा सर्व अंधविश्‍वास आहे, त्यात काही अर्थ नाही असा विचार करून काहीच न करण्यापेक्षा अशा दिवशी उपवास करून फायदा करून घ्यायला हरकत नसावी. एकूणच उपवासाचे महत्त्व खूप आहे. कारण त्याची फलश्रुती आहे आत्मदर्शन, आत्मवास व परमशांती. उपवासामुळे आत्मयोग साध्य होतो आणि शरीर, मन व आत्म्याचे संतुलन होते. एकूण, उपवासाचे महत्त्व अवर्णनीय आहे.
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405

उपवासातून आरोग्य

प्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा.
उपवास, व्रतवैकल्ये वगैरे गोष्टी धार्मिक, आध्यात्मिक समजल्या जातात; पण उपवास हा एक उपचार प्रकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. उपवास हा लंघनाचा एक प्रकार असतो.
लघुभोजनं उपवासो वा लंघनम्‌।।
...चरक चिकित्सास्थान
(हलका आहार किंवा उपवास म्हणजे काही न खाणे हे लंघन होय.)
आयुर्वेदात लंघनाची व्याप्ती बरीच मोठी आहे. उपवास हा लंघनाचा एक भाग झाला; पण शरीरशुद्धी, व्यायाम, सूर्यस्नान, वायुसेवन, पाचन हे सुद्धा लंघनाचेच प्रकार होत. म्हणूनच लंघनाचे जे काही फायदे आहेत ते योग्य प्रकारे केलेल्या उपवासाने मिळू शकतात.
"लाघवकरं कर्मं लंघनम्‌' म्हणजे हलकेपणा आणणारे ते लंघन अशी लंघनाची व्याख्या असल्याने उपवास केल्यास शरीर हलके होणे अपेक्षित आहे हे समजते. उपवासातून आरोग्य हवे असेल, तर हा उपवास आयुर्वेदातील लंघन संकल्पनेला धरून असायला हवा.
लघुभोजनं उपवासो वा।।
...चरक विमानस्थान
हलके भोजन किंवा उपवास म्हणजे काही न खाणे, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय आहेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणजेच उपवासातून आरोग्य मिळवायचे असणाऱ्याने आपल्या प्रकृतीनुसार उपवासाचे स्वरूप ठरवणे अपेक्षित आहे.

महाभूतांचे संतुलन
उपवासामुळे किंवा लंघनामुळे शरीरात आकाश, वायू व अग्नी महाभूतांचे संतुलन होते व यातून पुढील गोष्टी साध्य होतात -
शरीराचे जडत्व दूर होते.
अतिरिक्‍त कफदोष कमी होतो.
प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषाचे पचन होते.
अग्नी प्रदीप्त होतो.
आयुर्वेदात "आमदोष' अशी एक संकल्पना मांडली आहे. जठराग्नीची ताकद कमी पडल्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊ शकले नाही, की त्यापासून जो अर्धवट कच्चा रस तयार होतो तोच आमदोष होय. हा आम मुख्यत्वे आमाशयाच्या आश्रयाने राहतो; पण जर त्याचे वेळेवर पचन केले नाही, तर तो सर्व शरीरात पसरून अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करतो. आमदोषाचे रोगकारित्व इतके जबरदस्त असते, की "आमय' हा रोगाला पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो, तर जेथे आम नाही ती निरामय, निरोगी अवस्था समजली जाते. शरीरात आमदोष तयार झाला, की मलमूत्राचा अवरोध तयार होतो, ताकद कमी होते, शरीराला जडपणा येतो, आळस प्रतीत होतो, तोंडाची चव नष्ट होते, मळमळते, पोटात दुखते, चक्कर येते, अधोवायूला- शौचाला दुर्गंधी येते, आंबट ढेकर येतात.
अशा प्रकारे अनेक प्रकारची त्रासदायक लक्षणे निर्माण करणारा आमदोष वाढला असता, काहीही न खाता उपवास करणे अपेक्षित असते. यामुळे आम पचायला मदत मिळते. विशेषतः आमामुळे ताप आला असता किंवा आमामुळे अजीर्ण झाले असता काहीही न खाता उपवास करणे उत्तम असते.
अर्थात, आमदोष वाढून त्रास होण्यापर्यंत थांबण्याची आवश्‍यकता असते असे नाही. आठवड्यातून एकदा संध्याकाळचे जेवण न घेण्याची सवय लावून घेतली, तर त्यामुळे आमदोष तयार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अग्निसंस्कार केलेले म्हणजे उकळलेले पाणी पिणे हेही आमदोष तयार न होण्यासाठी उत्तम असते.
प्रकृतीला हितावह उपवास
काही न खाता उपवास हा आमदोष पचविण्यासाठी उपयुक्‍त असला, तरी सरसकट सगळ्या प्रकृतीसाठी असा कडक उपवास हितावह ठरेलच असे नाही. विशेषतः दिवसभर किंवा अनेक दिवस फक्‍त फळे खाणे, नुसते दूध पिणे किंवा नुसते पाणीच पिणे अशा प्रकारचा उपवास सर्वांना मानवणारा नसतो. विशेषतः पित्त वा वातप्रधान प्रकृतीमध्ये पचण्यास हलके अन्न खाऊन उपवास करणेच अधिक योग्य असते.
योग्य पद्धतीने उपवास करण्याने लाभणारे काही फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत -
विमलेंद्रियता, मलानां प्रवृत्तिः, गात्रलघुता, रुचिः, क्षुत्तृषोरेककालमुदयः, हृदयोद्गारकण्ठानां शुद्धिः, रोगामार्दवमुत्साहः तन्द्रानाशश्‍च।
सर्व इंद्रिये शुद्ध होतात.
मल-मूत्र-स्वेद आदी मलांचे प्रवर्तन यथायोग्य होते.
शरीरावयवात हलकेपणा प्रतीत होतो.
तोंडाला रुची येते.
तहान व भूक हे एकाच वेळी अनुभूत होतात.
शुद्ध ढेकर येतात.
घसा मोकळा वाटतो.
हृदयात हलकेपणा प्रतीत होतो.
रोग असल्यास रोगाचा जोर कमी होतो.
उत्साह उत्पन्न होतो.
झापड नाहीशी होते.
साळीच्या लाह्या, मुगाची डाळ, भाजलेले तांदूळ, ज्वारी-बाजरीची भाकरी, दुधी भोपळा, घोसावळी, दोडके, पडवळ, कारले वगैरेंपैकी साधी भाजी, ताक या गोष्टींचा हलक्‍या अन्नात समावेश होतो.
"एकादशी, दुप्पट खाशी' नको
उपवासाच्या गोष्टी खाऊन उपवास करायचा असल्यास राजगिऱ्याच्या लाह्या, वरईचा तांदूळ, शिंगाडा, दूध, प्रकृतिनुरूप फळे, थोड्या प्रमाणात साबूदाण्याची खिचडी, थोड्या प्रमाणात उकडलेला बटाटा वगैरे पदार्थ खाता येतात; पण उद्या उपवास करायचा आहे या कारणास्तव आज अधिक खाऊन घेणे योग्य नव्हे; तसेच उपवासाचे पदार्थ चवीला आवडले म्हणून अगदी पोटभर खाणे, पोट जड होईपर्यंत खाणे अयोग्य होय. या प्रकारच्या उपवासातून अनारोग्यास आमंत्रणच मिळू शकते.
एखादी गोष्ट कितीही उत्कृष्ट असली, तरी ती कुणी व कधी करू नये हे माहिती असणे सर्वांत आवश्‍यक असते. उपवास करण्याचे खूप फायदे असले, तरी तो पुढील अवस्थेत न करणे अधिक आरोग्यदायक असते.
क्षयरोग झाला असता.
वातरोग झाला असता.
वातामुळे ताप आला असता.
काम-क्रोध वगैरे मानसिक कारणांमुळे ताप आला असता.
गर्भावस्था असताना.
बाळंतपणाची परिचर्या सांभाळत असताना.
आजारपणात किंवा आजारपणानंतर ताकद कमी झाली असता.
पंचकर्मासारखा शरीरशुद्धीकर उपचार चालू असता.
व्यवहारात बऱ्याच वेळा प्रकृतीला सोसवत नसतानाही मोठमोठे उपवास करण्याचा अट्टहास अनेकांनी धरलेला दिसतो; पण अनारोग्य वाढविणारी कोणतीच गोष्ट सरतेशेवटी स्वहिताची असू शकत नाही. सहन होत नसतानाही नियम म्हणून वर्षानुवर्षे उपवास करत राहणे आणि पोटाला-पचनाला जराही विश्रांती न देता सतत खात राहणे ही दोन्ही टोके टाळून प्रकृतिनुरूप उपवास करण्याचा सुवर्णमध्य साधला तर उपवासातून आरोग्य निश्‍चित मिळू शकेल.
डॉ. श्री बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405

ad