Showing posts with label ताणतणाव. Show all posts
Showing posts with label ताणतणाव. Show all posts

Thursday, March 3, 2016

नातं हृदयाशी – अति रक्तदाब : कारणे, लक्षणे व उपचार

रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे शहाणपणाचे आहे.

दिवसेंदिवस हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे. त्याचा महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे अति रक्तदाब (Hypertension). दिवसेंदिवस अति रक्तदाबाचे प्रमाणसुद्धा वाढते आहे. तो फक्त वयस्कर व्यक्तींचा आजार राहिला नसून त्यांची पाळेमुळे तरुण पिढीमध्ये रुजली आहेत.

आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तरुण पिढीमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणाम होऊ शकतात.

विविध देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून येते की एकंदर लोकसंख्येच्या १० ते २५ टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण आढळते. त्यामुळे या रोगाबद्दल माहिती करून घेणे, तो न व्हावा, किंवा झाल्यास आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे ठरते.

रक्तदाब म्हणजे काय?

हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (Systole) आणि प्रसरण पावणे (Diastole) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ (Blood Pressure) असे म्हणतात.

सर्व अवयवांना त्यांच्या त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. तो निर्माण होण्यासाठी हृदयाची लयबद्ध हालचाल, रक्तवाहिन्यांची लवचीकता, रक्ताचे प्रमाण, हृदयाची गती आणि शरीरातील इतर स्रावांचे परिणाम (Hormones) या गोष्टी जबाबदार असतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्त जोराने रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते त्याचा रक्तवाहिन्यांच्या अंतर-स्तरावर दाब अधिक असतो, त्या दाबाला सिस्टोलिक रक्तदाब (Systolic Blood Pressure) असे म्हणतात. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत (Relaxation Stage) येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला ‘डायास्टोलिक रक्तदाब (Diastolic Blood Pressure) असे म्हणतात.

दोन्ही प्रकारचे रक्तदाब ‘स्फिग्मोमॅनोमीटर’ या यंत्राच्या साहाय्याने मोजता येते. वयाच्या ५० वर्षांपर्यंत सिस्टोलिक रक्तदाब हा ११० ते १४० (मी. मी. पारा.. mm of Hg) असायला हवा आणि डायास्टोलिक रक्तदाब हा ९०च्या पेक्षा कमी असायला हवा. सिस्टोलिक रक्तदाब हा १४० च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना उच्च रक्तदाब किंवा अति रक्तदाब (Hypertension)आहे असे समजावे.

एखाद्या वेळी रक्तदाब अधिक असेल तर त्याला लागलीच औषधोपचार चालू करण्याची आवश्यकता नाही. पण अशा व्यक्तींनी नियमितपणे रक्तदाबाचे मोजमाप ठेवणे आवश्यक आहे. सर्व मोजमापे अधिक असतील तर त्यांनी हृदयरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्यानुसार तपासण्या आणि औषधोपचार सुरू करावा.

रक्तदाबाचे प्रकार

अति रक्तदाब दोन प्रकारचा असतो.

१. साधा अतिरक्तदाब (Essential of Primary Hypertension) : या अतिरक्तदाबाच्या प्रकारात कुठलेही कारण सापडत नाही. त्याला मनुष्याचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, मानसिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, आनुवंशिकता, राहणीमान, व्यवसाय आणि जीवनशैली या गोष्टी कदाचित कारणीभूत असतात. जवळजवळ ९०-९५ टक्के लोकांमध्ये साधा अति रक्तदाब असतो.

२. अनुषंगिक अति रक्तदाब : (Secondary Hypertension) या प्रकारात उच्च रक्तदाब हा इतर शारीरिक दोषांच्या अनुषंगाने निर्माण होतो. पाच ते दहा टक्के लोकांना अनुषंगिक अति रक्तदाब असतो. त्यात मुख्यत्वेकरून खालील आजारांचा समावेश होतो.

अ. किडनीचे आजार : किडनीद्वारे लघवीवाटे शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात. जर मूत्रपिंडामध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाल्यास हे टाकाऊ पदार्थ शरीरात जमा होतात, त्याचाच एक दुष्परिणाम म्हणजे ‘वाढलेला रक्तदाब’ याला Renal Hypertension असे म्हणतात. किडनीची मुख्य रक्तवाहिनी आकुंचित पावली असेल तर रक्तदाब वाढू शकतो. (Renal Artery Stenosis)

ब. शरीरातील ग्रंथींचे आजार :

कुशिंग सिन्ड्रॉन, फिओ-क्रोमोसायटोमा, हायपो-थायसॉडियम, पिटय़ूटरी ग्रंथीचे टय़ुमर या आजारात रक्तदाब वाढलेला असतो.

क. गर्भारपणात काही वेळा रक्तदाब वाढलेला असतो, त्याला ‘टॉक्झिमिया ऑफ प्रेग्नन्सी’ Toxaemia of Pregnancy असे म्हणतात.

ड. रक्तातील लाल पेशींचे प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त वाढले की रक्तदाब वाढू शकतो.

ई. जर महारोहिणी (Aorta) कुठे आकुंचित पावली असेल (Coarctation) तर रक्तदाब वाढलेला असतो.

इतर बरीच कारणे रक्तदाब वाढवतात, पण त्याबाबत येथे सविस्तरपणे लिहिणे जागेअभावी शक्य नाही. पण मुख्यत्वे करून ‘अनुषंगिक अति रक्तदबा’चे ९० टक्के कारण किडनीचे आजार हे होय. अति रक्तदाबाचे प्रमाण स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक असते. पण स्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर ते प्रमाण पुरुषांइतकेच असू शकते. तरुण पिढीमध्ये वाढीव रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. लहान मुलांमध्ये अति रक्तदाबाचे प्रमाण हे दोन टक्के इतके असते. उच्च रक्तदाबाचा विकार असणारे ७० टक्के लोक ४५ ते ६० वयोमर्यादेतील असतात.

रक्तदाबाची कारणे :

१. आनुवंशिकता : उच्च रक्तदाब असलेल्या आई-वडिलांच्या मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चार पट अधिक असू शकते. तसेच आई-वडिलांच्या जीवनपद्धती, राहणीमान, खाणे पिणे यांचे अनुकरण मुले करीत असल्यामुळेही या मुलांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असू शकते.

२. स्वभाव व मानसिकता : कित्येक लोकांचा स्वभाव मुळात असमाधानी व अति महत्त्वाकांक्षी असतो. ते थोडय़ा वेळात खूप काही करून दाखवण्याचा प्रयत्न करतात व वेळेशी स्पर्धा करू पाहतात. अशा लोकांना जीवनात सतत मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. त्यांच्या मानसिक संघर्षांमुळे शरीरातील कित्येत ग्रंथी विशेषत: अ‍ॅड्रिनल ग्रंथी उत्तेजित होतात त्यामुळे रक्तदाब वाढतो.

मानसिक ताणामुळे कॉटिकोलामाइन्स, अ‍ॅड्रिनालीन व नॉरेअ‍ॅड्रिनालीन या शरीरातील स्रावात वाढ होते. त्यामुळे रक्तदाब वाढतो.

‘अ’ व्यक्तिमत्त्व (Type A-Personality) असलेल्या व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे.

३. धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत ‘निकोटिन’ व ‘कार्बन मोनोक्साइड’ ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे नॉरेअ‍ॅड्रिनालीन या स्स्रावाचे प्रमाण वाढते आणि रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात.

४. मद्यपान : मद्यपान करणाऱ्यांत उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते.

५. मिठाचा अतिरेक : जे लोक मिठाचा अल्प प्रमाणात उपयोग करतात त्याचा रक्तदाब हा कमी किंवा नॉर्मल असतो. त्याच्याविरुद्ध ज्या व्यक्ती मिठाचा अतिरेक करतात, त्यांना अति रक्तदाब असण्याचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनक्षील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने जर आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केले तर अशा रुग्णाचा रक्तदाब नॉर्मल होऊ शकतो, किंवा नक्कीच कमी होण्यास मदत होईल.

६) रक्तवाहिन्यांचा कठीणपणा (ATHEROSCLEROSIS)

जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांच्या आंतरस्तरावरील दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो. रक्तवाहिन्या कठीण होण्याची अनेक कारणं आहेत. त्यात आनुवंशिकता, वाढणारे वय, रक्तातील चरबीचे अतिप्रमाण, मधुमेह, धूम्रपान, लठ्ठपणा व बैठे जीवन आणि ताण-तणावाचे जीवन या गोष्टींचा समावेश होतो.

७) लठ्ठपणा, अतिरक्त वजन :

स्थूलपणा, लठ्ठपणा आणि वाढलेले वजन यांचा उच्च रक्तदाबाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ज्याचे वजन जितके जास्त, त्याचा रक्तदाबही जास्त असतो. लठ्ठ व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब हा लहान वयातच सुरू होऊ शकतो. तसेच जर अशा लोकांनी वजन कमी केल्यास त्यांचा अति रक्तदाब थोडय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.

अति रक्तदाबाची लक्षणे :

अतिरक्तदाब हा मुनुष्याचा ‘छुपा शत्रू’ (Silent Killer) आहे, असे म्हटले जाते. कारण बऱ्याचदा मनुष्याला अति रक्तदाब असूनही काहीही लक्षणे किंवा त्रास दिसून येत नाही. बऱ्याच वेळा इतर काही आजारांसाठी मनुष्य डॉक्टरकडे जातो आणि तपासणीचा एक भाग म्हणून डॉक्टर रक्तदाब तपासतात, तेव्हा तो वाढलेला आढळतो, अशा वेळी अति रक्तदाबाचे निदान होते.

अति रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.

* सतत डोके दुखणे, जड वाटणे.

* चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, आकडेमोड चुकणे, घटनाक्रम विसरणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.

* छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.

* लैंगिक सामथ्र्य कमी होणे.

रक्तदाब फारच वाढला असेल तर खालील लक्षणे दिसून येऊ शकतात.

* दृष्टिदोष, कमी दिसणे, अंधूक दिसणे

* नाकातून रक्तस्राव होणे.

* हातापायावर सूज येणे.

* किंवा कधी कधी मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, किडनी निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे इत्यादी त्रास होऊ शकतो.

उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम

१) हृदयाची अकार्यक्षमता :

उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ (HEART FAILURE) असे म्हणतात.

उच्च रक्तदाबाच्या रोग्यांत हृदयाच्या विकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण सामान्य लोकांपेक्षा चारपट अधिक आहे. उच्च रक्दाबाच्या रुग्णांना हृदयशूळ (ANGINA) आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.

२) मूत्रपिंडावर परिणाम :

उच्च रक्तदाब जर अधिक काळापासून असेल तर अशा रुग्णांचे मूत्रपिंड हळूहळू निकामी होऊ शकते. मूत्रपिंडातील रक्तशुद्धीचे काम व्यवस्थित होत नाही. परिणामत: शरीरात मीठ आणि इतर व्यर्जित पदार्थाचा भरणा होतो. त्यामुळे हातापायाला सूज, चेहऱ्यावर सूज येते.

३) इतर दुष्परिणाम :

अति उच्च रक्तदाबामुळे डोक्यातील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. तसेच डोळ्याच्या पडद्यावर रक्तस्राव होऊन दृष्टिदोष होऊ शकतो.

उच्च रक्तदाबामुळे काही रोग्यांच्या महारोहिणीचा (AORTA) काही भाग अति पातळ होतो. हा पातळ भाग आतल्या किंवा बाहेरील बाजूस फुगू शकतो किंवा फुटूपण शकतो. (DISSECTING ANEURYSM), ही अत्यंत भयावह अवस्था असून कधी कधी यात मृत्यूही येऊ शकतो. रक्तदाब उच्च झाला आणि तो नीटपणे आटोक्यात राहिला नाही तर जीवनमर्यादापण कमी होऊ शकते.

अति रक्तदाबाचे निदान (DIAGNOSIS)

अति रक्तदाबाचे निदान करण्यासाठी व्यवस्थित मोजणे आवश्यक असते. रक्तदाब मोजण्याच्या आधी एक तास रुग्णाने कॉफी-चहासारखी उत्तेजके घेऊ नयेत, धूम्रपान करू नये किंवा अशा प्रकारची औषधे टाळावीत ज्यांनी रक्तदाब वाढतो.

रक्तदाब मोजताना रुग्ण हा पूर्णपणे रिलॅक्स (निश्चिंत) असावा. रक्तदाब एका डॉक्टरच्या भेटीमध्ये दोनदा मोजावा, म्हणजे तपासणीच्या सुरुवातीला आणि शेवटी असे प्रत्येक आठवडय़ात एकदा किंवा दोनदा याप्रमाणे तीन आठवडे करावे. तीन आठवडय़ांतील सर्व मोजमापे जर नॉर्मलपेक्षा जास्त असतील किंवा जर अध्र्यापेक्षा अधिक मोजमापे अधिक असेल तर अशा व्यक्तींना अति रक्तदाब आहे असे निदान करण्यात येते. रक्तदाब हा फारच जास्त असेल उदा. १८०/ १२० तर अशा रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात भरती करून त्यावर औषधोपचार करावा लागतो.

* याच्या सोबतीला इसीजीमध्येसुद्धा दीर्घकालीन अति रक्तदाबाचे ठरावीक बदल होतात. त्यामुळे सर्व अशा रुग्णांना इसीजी काढणे आवश्यक असते.

* इकोकार्डियोग्राफी (ECHOCARDIOGRAPHY) या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे हृदयावरील परिणामाची नोंद घेतली जाते. यात हृदयाचा वाढलेला आकार, स्नायूंची वाढलेली जाडी, हृदयाच्या झडपांवर झालेला विपरीत परिणाम, हृदयाची कार्यक्षमता याचा समावेश होतो.

* डोळ्यांच्या तपासणीमध्ये अति रक्तदाबाचे डोळ्यावर आणि डोळ्यांच्या पटलावर (RETINA) झालेल्या परिणामांची नोंद घेतली जाते. याला FUNDOSCOPY  असे म्हणतात.

* रक्ताच्या तपासणीमध्ये किडणीवर झालेले विपरीत परिणाम याची कल्पना येते. जर अनुषंगिक अति रक्तदाब असेल तर त्या त्या अवयवाशी निगडित रक्त तपासण्या किंवा इतर अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. त्यामध्ये पोटाची सोनोग्राफी, सीटीस्कॅन, आयव्हीपी, अँजिओग्राफी, अ‍ॅवोटरेग्राफी, किडनीच्या रक्तवाहिनीच्या तपासण्या इत्यादीचा समावेश होतो. या तपासण्यांची निवड हृदयरोगतज्ज्ञ करतात.

अति रक्तदाबाचे उपचार

अति रक्तदाबाचा औषधोपचार हा तज्ज्ञ डॉक्टराकडूनच घ्यावा. एकदा का हा रक्तदाब नॉर्मल (योग्य) पातळीवर आला की मग वाटले तर रक्तदाबाचे मोजमाप करण्यासाठी नियमितपणे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाण्यास काही हरकत नाही. मध्ये मध्ये हृदयतज्ज्ञ डॉक्टरकडे जाणे योग्य आहे.

वैद्यकीय औषधोपचाराबद्दल मी इथे विशेष काही लिहीत नाही, कारण हा व्यक्तिसापेक्ष असतो. प्रत्येक रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारची औषधे वेगवेगळ्या प्रमाणात द्यावे लागतात. दहापेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधांचे ग्रुप आहेत. त्यातून योग्य व्यक्तीसाठी योग्य औषधे योग्य प्रमाणात निवडणे हे तज्ज्ञ डॉक्टरचे काम आहे.

रक्तदाब कमी करण्यासाठी ज्या औषधाव्यतिरिक्त गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्या खालीलप्रमाणे आहेत.

१) मिठाचा उपयोग कमी प्रमाणात करावा- मिठाचा अतिरेक टाळावा. बऱ्याच लोकांना जेवणात वरून मीठ घेण्याची सवय असते. ही सवय अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी फार धोकादायक आहे. दररोज जेवणात फक्त तीन ते पाच ग्रॅम मिठाचाच वापर करावा. लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे या पदार्थाचे सेवन केल्यास मिठाची उणीव भासणार नाही.

२) धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन टाळा- अतिरक्तदाबाचे हृदयावर होणारे दुष्परिणाम हे धूम्रपानामुळे वाढतात. ते लवकर व अधिक प्रमाणात होतात. धूम्रपान करणाऱ्या रुग्णांना औषधांचा सुद्धा जास्त डोस (मात्रा) लागतो. त्यामुळे धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे.

३) वजन कमी करणे- वजन कमी केल्याने थोडय़ा फार प्रमाणात रक्तदाब कमी होतो. अतिरिक्त वजन म्हणजे हृदयाला अतिरिक्त काम करावे लागते. चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. हा अतिरिक्त बोजा हृदयाला हानीकारक होऊ शकतो.

स्थूल व्यक्तींच्या रक्तामध्ये कॉलेस्टेरॉल (रक्तातील एक चरबी)चे प्रमाण जास्त असते. ते कालाप्रमाणे रक्तवाहिन्यांत जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व टणक बनतात. तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. या कारणांमुळे हृदयविकार व अतिरक्तदाब होतो. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारात पालेभाज्या, भाज्यांची कोशिंबीर, गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो, कच्च्या भाज्यांची सॅलाड भरपूर प्रमाणात खावीत. ताजी फळे खावीत. भात, वरण, भाजी, पोळय़ा असा सात्त्विक आहार योग्य प्रमाणात दोन वेळा योग्य वेळी घ्यावा.

* पोळय़ांना तूप किंवा तेल लावू नये. तळलेल्या पदार्थाचे सेवन टाळावे.

* दुधाचा, मलाईचा अतिरेक टाळावा. चहा-कॉफी व इतर उत्तेजक टाळावे.

* केक, आईक्रीम, चॉकलेट, मिठाई, जाम, बटर, चीज, सुकामेवा, दारू टाळावी.

* मांसाहार कमीत कमी करावा. जास्त मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत.

* कॅल्शियम व पोटॅशियम क्षार यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करावा.

४) व्यायाम आणि योगासने :

* वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे. व्यायाम आणि योगासने केल्याने वाढलेला रक्तदाब हा कमी करता येतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.

* भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे हे व्यायामाचे प्रकार अतिरक्तदाबाच्या व्यक्तीला अत्यंत फायदेशीर आहेत (या सर्व प्रकारांना आयसोटोनिक ISOTONIC EXERCISE असे म्हणतात). यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावून रक्तवाहिन्यांची RIGIDITY (कठिणीकरणाची प्रक्रिया) सुद्धा कमी होते.

* अतिरक्तदाबाच्या रुग्णांनी वजन उचलण्याचे व्यायाम, दंडबैठका, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम करू नयेत.

* योगासने करणे लाभदायक असते. विशेषत: शवासन, पद्मासन, योगमुद्रा, धनुरासन, कोनासन करावे. यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षकाची मदत घ्यावी. ज्यात मस्तक खाली राहते व पाय वर असतात, अशी आसने (शीर्षांसन) उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी करू नये.

‘योगा’ या जीवनशैलीचा फायदा रक्तदाबाच्या रुग्णांना होतो. त्यातील प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या गोष्टींमुळे अतिरक्तदाब आणि हृदयविकार होण्याचे प्रमाण कमी होते. यांना ‘मेडिटेशन’ असे म्हणतात.

ताण-तणाव कमी करणे

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मानसिक ताण-तणाव कमी करणे आवश्यक आहे. अवाजवी काळजी (TENSION) किंवा तणाव घेणे म्हणजे रक्तदाब वाढवणे.

नेहमी हसतमुख राहणे, मन कुठे ना कुठे रमवणे, आपल्याला आवडेल आणि परवडेल असा काही छंद करावा. अतिमहत्त्वाकांक्षी, असमाधानी, नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींचा रक्तदाब सहसा जास्तच असतो. त्यामुळे आपल्या कर्तृत्वाची जाणीव ठेवून कर्मयोगी व्हावे. म्हणजेच फळाची इच्छा-अपेक्षा न राखता नियतकार्य करणे. त्याच्या परिणामाची दखल योग्य प्रमाणातच घ्यावी. पुन्हा प्रयत्न करावे. कारण प्रत्येक काळय़ा ढगाला रूपेरी किनार असते. प्रयत्न करणाऱ्यांना यश हे मिळतेच. म्हणजेच प्रयत्नवादी आणि आशावादी व्हावे.

क्रोधाची-संतापाची हकालपट्टी करावी. राग-लोभ-मत्सर यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. स्वत:ची जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. चांगली पुस्तके, चांगली व्याख्याने, चांगली संगत ठेवावी.

मनावरील ताण हलका करण्यासाठी श्वसनाचे काही व्यायाम आहेत. ते केल्यास मन स्थिर व शांत राहण्यास मदत होते. ते विचलित होत नाही. खंबीर राहते.

दररोज सात ते आठ तास रात्री शांत झोप घ्यावी. त्यासाठी झोपेच्या गोळय़ा घेऊ नयेत. आठवडय़ाच्या सहा दिवसांचा ताण घालवण्यासाठी रविवारच्या सुट्टीचा भरपूर उपयोग घ्यावा. मन रमेल आणि नेहमीच्या कामाचा विसर पडेल असे काही करण्यात भर द्यावा. परिवारासोबत बाहेर फिरायला जाणे, पर्यटन करणे म्हणजे मनातील मरगळ झटकून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुढच्या आयुष्याची सुरुवात करावी.

‘आहार-विहार-विचार-आचार’ यांच्यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनांना दूर ठेवावे. मद्यपान, धूम्रपान टाळावे. ‘HURRY, WORRY, CURRYX’ या गोष्टी आजाराला निमंत्रण देतात. या टाळण्याचा प्रयत्न करावा. या सर्व गोष्टींकडे व्यवस्थितपणे लक्ष दिल्यास आपण सर्व दीर्घायुषी व्हाल यात शंकाच नाही. डॉ. गजानन रत्नपारखी

रक्‍तदाब


 डॉ. श्री बालाजी तांबे


वाढलेला रक्तदाब गोळ्या घेऊन कमी केला म्हणजे झाले, 
असा हिशेब मांडणे एखादे गणित सोडवावे इतके सोपे नाही. 
रक्‍तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. 
पण तरीही रक्‍तदाब झालाच तर रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून 
बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत. योग्य उपचारांना संतुलित आहार, 
निर्व्यसनी जीवनपद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक स्वास्थ्य यांची जोड द्यावी. 

काही वर्षांपूर्वी रक्‍तदाब म्हणजे चाळिशीनंतर होणारा आजार, अशी सर्वसामान्य धारणा होती.
सध्या मात्र तिशीच्या आसपासही अनेकदा रक्‍तदाबाचा त्रास सुरू झाल्याचे दिसते.
सरासरीपेक्षा (80-120) वाढलेला किंवा कमी झालेला रक्‍तदाब हा "रक्‍तदाब विकार‘ म्हणून ओळखला जातो. वाढलेला रक्‍तदाब
गोळ्यांच्या साह्याने कमी केला म्हणजे झाले, इतका साधा हिशेब अनेकांच्या मनात असतो; पण एखादे गणित सोडवावे तसा हा
 हिशेब सुटत नाही.

रक्तदाब म्हणजे काय? 

सर्वप्रथम रक्‍तदाब म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ.
रक्‍त जरी सर्व शरीराला व्यापून असले व रात्रंदिवस गतिशील असले, तरी ते रक्‍तवाहिन्यांमध्ये बंदिस्त असते.
 मेंदू, हृदय, मूत्रपिंड वगैरे मोठे अवयव असोत किंवा करंगळीचे टोक असो, सर्व दूर रक्‍तवाहिन्यांमधून रक्‍त
फिरत असते. यालाच "रक्‍ताभिसरण क्रिया‘ म्हणतात व त्यातूनच रक्‍तदाब तयार होत असतो. अर्थातच
रक्‍तावर सरासरी दाब प्रत्येक व्यक्‍तीला असतोच, कारण त्याखेरीज रक्‍ताभिसरण होऊच शकणार नाही.

निरोगी अवस्थेतही रक्‍तदाब प्रसंगानुरूप थोडा फार कमी जास्ती होत असतो. भरभर चालण्याने, पळण्याने,
जशी श्‍वासाची गती वाढते, तसेच श्रम झाल्यास रक्‍तदाब थोडा वाढतो. पण विश्रांती घेतल्यावर आपला
आपण प्राकृतावस्थेत येतो.

आयुर्वेदात "रक्‍तदाब‘ या नावाने वेगळा असा व्याधी सांगितलेला आढळत नाही. मात्र शरीरातील रस, रक्‍त
धातूंच्या गतीतील विकृतीमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य विकारांपैकी हा एक विकार होय. ही गती विकृती
रक्‍ताभिसरणास कारणीभूत असणाऱ्या हृदय किंवा रक्‍तवाहिन्यातील बिघाडामुळे होऊ शकते, शरीरातील
अतिरिक्‍त क्‍लेदांश मूत्रामार्फत वाहून नेणाऱ्या किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्याने उद्‌भवू शकते किंवा
"चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌‘ न्यायानुसार अति मानसिक ताणामुळे, अति विचार करण्यामुळे अर्थातच
मेंदूच्या अति श्रमानेही होऊ शकते.

तसेच रक्‍तदाब वाढला असता किंवा कमी झाला असताही शरीर, मनावर दिसणारी लक्षणे वात, पित्त दोष
वाढल्याची असतात. म्हणून आयुर्वेदानुसार रक्‍तदाबावर उपचार करताना त्रिदोष संतुलनाबरोबरच, रक्‍तदाबाचा
त्रास होण्याचे मूळ कारण काय आहे याचा विचार केला जातो व त्यानुसार केलेल्या उपचारांनी रक्‍तदाबावर
यशस्वी चिकित्सा करता येऊ शकते.

रक्तदाबाची कारणे 
रक्‍तदाबाची सामान्य कारणे अशी सांगता येतील -
  • पचायला जड अशा मेदस्वी पदार्थांचे अतिसेवन उदा. तेल, चीज, मांसाहार
  • खाण्यापिण्यातील व वागण्यातील अनियमितता, एकंदर जीवनशैलीतील अनिर्बंधता व बेशिस्तपणा
  • व्यायामाचा अभाव
  • अतिस्थूलता
  • अतिरिक्‍त धूम्रपान व मद्यपान
  • अतिचिंता तसेच कामामध्ये अतिव्यस्तता
याखेरीज किडनीचे कार्य नीट न होणे, अनेक वर्षांचा मधुमेह, रक्‍तवाहिन्या कठीण व जाड होणे, स्त्रियांच्या
बाबतीत गर्भारपणात रक्‍तदाब वाढल्याचा इतिहास असणे, तसेच गर्भाशय काढून टाकणे इत्यादींमुळे रक्‍तदाब
 वाढू शकतो.

मुळात रक्‍तदाबाचा विकार मागे लागूच नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी. हा विकार ओळखणे खरे पाहता
अतिशय सोपे आहे. रक्‍तदाब मोजणे हे अक्षरशः दोन मिनिटांचे काम असते. आजकाल तर घरच्या घरीसुद्धा
साध्या यंत्राच्या साह्याने रक्‍तदाब मोजता येणे शक्‍य आहे. या विकाराची अगदी सुरवातीला फार काही लक्षणे
 दिसत नाहीत. पण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या चांगल्या प्रकारे उपाययोजना करता येत असल्याने
 वयाच्या पस्तिशीनंतर वर्ष-सहा महिन्यांनी एकदा तरी रक्‍तदाब मोजून घ्यावा. घरी रक्‍तदाबाची किंवा
 हृद्ररोगाची आनुवंशिकता असणाऱ्यांनी तर अधिकच दक्ष राहावे. वर सांगितलेली कारणे लागू होत
असणाऱ्यांनीही अधिक काळजी घ्यावी.

रक्तदाब वाढण्याची लक्षणे 
  • रक्‍तदाब वाढण्याची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
  • डोके दुखणे, चक्कर येणे, डोके जड वाटणे.
  • अशक्‍तपणा वाटणे, गळून गेल्यासारखे वाटणे.
  • अवेळी डोळ्यांवर झापड येणे पण योग्य वेळी झोप न येणे.
  • छातीत धडधडणे.
  • भरभर चालताना किंवा जिने चढताना दम लागणे.
  • छातीत दुखणे.
  • अकारण चिडचिड होणे.
सुरवातीला ही लक्षणे सतत दिसत नाहीत, काही वेळाने आपोआप नाहीशी होतात. अशा वेळेला लक्षणे दिसत
असताना आवर्जून तपासणी करून घेतली तरच उच्च रक्‍तदाबाचे निदान होऊ शकते.

कैक वेळेला रक्‍तदाब वाढला तरी व्यक्तीला काहीही लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत बहुधा त्रास होत
नाही म्हणून तपासणी केली जात नाही किंवा औषधांची नियमितता राखली जात नाही.
या दोन्ही गोष्टी आरोग्यास घातक होत.

रक्‍तदाबाचा त्रास सुरू झाला की तो शेवटपर्यंत राहणार, आयुष्यभर औषधे घ्यावी लागणार हे मात्र
प्रत्येक केस मध्ये लागू होत नाही. वेळीच निदान होणे, मूळ कारण लक्षात घेऊन ते टाळायची तयारी असणे
 व रस-रक्‍ताच्या गती-विकृतीवर योग्य उपचार सुरू करणे या गोष्टींनी रक्‍तदाब बराही होऊ शकतो. अर्थातच
जितक्‍या लवकर, नियमित व योग्य उपचार केले जातील तितका लवकर व चांगला उपयोग होताना दिसतो.

रक्तदाब असेल तर... 
  • रक्‍तदाब असणाऱ्यांनी पुढील गोष्टींवर लक्ष ठेवावे.
  • तळलेले, तेलकट पदार्थ शक्‍यतो टाळावेत.
  • चीज, श्रीखंड, मांसाहार, अंडी, वाटाणा, पावटा, चवळी, हरभरा वगैरे पचायला जड असणाऱ्या व 
  • वातवर्धक गोष्टी टाळाव्यात.
  • कच्चे मीठ किंवा वरून मीठ घ्यायची सवय सोडावी.
  • वजन प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले असल्यास योग्य उपायांनी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा.
  • रात्री उशिरा जेवण्याची सवय मोडावी.
  • रोज 30-35 मिनिटे चालायला जावे, योगासने करावीत. मात्र शरीराला थकवणारे व्यायामप्रकार टाळावेत.
  • रात्री लवकर झोपावे व प्रकृतिनुरूप किमान सहा ते सात तास शांत झोप लागेल याकडे लक्ष ठेवावे.
दिवसभराच्या कामाचा ताण किंवा नातेसंबंधातील तणावाचा स्वतःवर कमीत कमी परिणाम होईल यासाठी
 प्रयत्नरत राहावे, झोपण्यापूर्वी दहा मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे, आपल्या आवडत्या छंदात मन गुंतवणे,
 मनःशांती देणारे स्वास्थ्यसंगीत ऐकणे, ध्यान करणे अशा सारखा जमेल तो उपाय करावा.
काम करताना थकवा जाणवावयास सुरवात झाल्यास वेळीच विश्रांती घ्यावी. शरीर व मन दोहोंवर जबरदस्ती
करू नये.

रक्‍तदाब वात-पित्त असंतुलनातून तयार होत असल्याने दूध, घरी बनवलेले साजूक तूप, साधा, सात्त्विक
 पण चौरस आहार ठेवावा. वजन वा कोलेस्टेरॉल वाढण्याच्या भीतीने हृदय, मेंदूला पोषक व वात-पित्तशामक
 आहार पदार्थ अकारण बंद करू नयेत. मात्र चुकीच्या पद्धतीने बनवलेले तूप, बाजारातील लोणी वगैरे गोष्टी
 निश्‍चितच टाळाव्यात.

रक्‍ताभिसरण वाढवण्यासाठी, रसरक्‍तधातूंच्या गतीचे नियमन करण्यासाठी व शरीरातील रक्‍तवाहिन्यांतील
काठिण्य नष्ट होण्यासाठी "अभ्यंग‘ करणे हा एक श्रेष्ठ व सहज करता येण्यासारखा उपाय आहे.
अभ्यंगासाठी वापरलेले तेल आयुर्वेदिक पद्धतीने शास्त्रशुद्धरीत्या तयार केलेले असावे. अशा शास्त्रशुद्ध अभ्यंगाची
 विशेषता अशी की याने कमी झालेला रक्‍तदाब पुन्हा पूर्ववत होऊ शकतो तसेच वाढलेला रक्‍तदाब कमी होऊ
शकतो.

आयुर्वेदशास्त्राने सांगितलेले त्रिदोष संतुलन करणारे स्नेहन स्वेदनपूर्वक पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावे. विशेषतः विरेचन, बस्ती या उपक्रमांचा रक्‍तदाबात उत्कृष्ट फायदा होताना दिसतो. बरोबरीने मूळ कारणानुरूप शिरोधारा, शिरोबस्ती, कर्णपूरण,
पिंडस्वेदन वगैरे उपचार उत्तम फायदा करणारे आहेत.

शवासन, योगनिद्रा या योगातल्या क्रियांचा वाढलेला रक्‍तदाब कमी करण्यासाठी खूप उपयोग होतो.
आत्मसंतुलन केंद्रात असंख्य रुग्णांनी अनुभव घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी संलग्न संशोधनातून योगनिद्रा
संगीताचा उपयोग सिद्ध झालेला आहे. तेव्हा अशा योगनिद्रा संगीताचाही रक्‍तदाब नियंत्रणासाठी उपयोग
करता येईल.

रक्‍तदाब कमी करणाऱ्या इतर औषधांच्या बरोबरीने मुळापासूनच रक्‍तदाब बरा करू शकणारी आयुर्वेदिक
औषधेही सुरू करावीत म्हणजे हळूहळू त्रिदोषसंतुलन प्रस्थापित झाले, रस-रक्‍तधातूतील गती विकृती
नाहीशी झाली व बरोबरीने आहार-विहारातील अनुशासन कायम ठेवले की रक्‍तदाबापासून मुक्‍ती मिळू शकते.

योग्य औषधाची निवड 
रक्‍तदाबाचे एक विशिष्ट असे औषध नसते, तर प्रकृती, वय, रक्‍तदाबाचा त्रास होण्याचे कारण वगैरे गोष्टींचा
विचार करून योग्य औषध निवडावे लागते.किडनीचे काम व्यवस्थित होत नसल्यास गोमूत्र, पुनर्नवासव,
गोक्षुरादि चूर्ण, चंद्रप्रभा वगैरे औषधांचा वापर करावा लागतो. हृदयामुळे, रक्‍तवाहिन्यांमधील काठिण्यामुळे
 रक्‍तदाबाचा त्रास होत असल्यास बृहत्वातचिंतामणी, सुवर्णभस्म, अभ्रकभस्म, अर्जुनारिष्ट, सुवर्णसूतशेखर,
 वगैरे औषधे प्रकृतीनुरूप योजावी लागतात. तर रक्‍तदाबाचे मूळ कारण मेंदूशी संबंधित असल्यास जटामांसी,
 ब्राह्मी, ब्राह्मीघृत, वगैरे औषधांचा उत्तम उपयोग होताना दिसतो.

थोडक्‍यात सांगायचे झाले तर, रक्‍तदाबाचा विकार मुळात होऊ नये यासाठी अगोदरच काळजी घ्यावी. पण
तरीही रक्‍तदाब झालाच तर रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्याबरोबरच मुळातून बरा होण्यासाठी योग्य उपचार करावेत.
 योग्य उपचारांना संतुलित आहार, निर्व्यसनी जीवन पद्धती, व्यायाम, चालणे, योग, संगीत व मानसिक
स्वास्थ्य यांची जोड द्यावी. 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India,

तरुणांमधील उच्च रक्तदाब

- डॉ. श्रीपाद खेडेकर
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात तरुणांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. त्यातूनच मग आरोग्याचे प्रश्न सुरू होतात. उच्च रक्तदाब हा त्यातूनच उद्‌भवतो. नंतर हा आजार धोकादायक बनतो. अकाली वृद्धत्वाकडे झुकणे, तसेच हृदयविकाराच्या समस्या निर्माण होणे, हे प्रकार सुरू होतात. वयस्कर व्यक्तींना हृदयविकाराच्या समस्या जाणवतात, हे आपण जाणतोच. पण आता तरुणांमध्येही या समस्या सर्रासपणे दिसून येऊ लागल्या आहेत. 
त  रुणांमधील उच्च रक्तदाबाची काही प्रकरणं अभ्यासल्यानंतर असे लक्षात आले आहे की, हा आजार त्यांना नंतर हृदयविकाराकडे नेतो. प्रसंगी हृदयविकाराचा तीव्र झटकादेखील येतो. उच्च रक्तदाब ही समस्या अगदी १८ वर्षांच्या मुलांमध्येदेखील दिसून आली आहे. २० वर्षांच्या मुलांमध्ये असे आजार आढळल्यानंतर त्याचे परावर्तन हे नंतर हृदयविकाराच्या गंभीर समस्येमध्ये झाल्याचेही दिसून आले आहे. ही मुलं जेव्हा ३५ ते ५० वयोगटात जातात, तेव्हा हृदयविकाराची समस्या त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. रक्तदाब सामान्य असला तरी त्यांना ही समस्या भेडसावते.
तरुणांमध्ये उच्च रक्तदाब आढळण्याची काही ठराविक कारणे आहेत. ती अशी -  

-  वेगाने बदलणारी जीवनशैली, गतिमान व तणावग्रस्त आयुष्य.
-  व्यायामाचा अभाव, अतिव्यग्र जीवनशैलीमुळे व्यायाम करण्यासाठी वेळ नसल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या जाणवते.
-  आनुवंशिकता हेही एक महत्त्वाचे कारण आहे. कुटुंबातील कुणा व्यक्तीला अशी समस्या असल्यास ती पुढच्या पिढीत दिसून येते.
-  चुकीचा आणि अपायकारक आहार. मेदयुक्त व अतिक्षार असलेल्या पदार्थांचे सेवन करणे हे वाढत आहे.
-  पुरेशी झोप नसणे, हा या तरुण पिढीला शाप म्हणता येईल. प्रत्येक रात्री किमान सहा तास झोप आवश्‍यक असून, ती नसेल तर ही समस्या अधिकांश प्रमाणात जाणवते.
-  मद्यपान हे उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरणारे महत्त्वाच्या कारणांपैकी एक आहे.
  धूम्रपान.
-  लठ्ठपणा व वजनवाढीवर नियंत्रण नसणे. हा लठ्ठपणा हा पुन्हा अयोग्य जीवनशैलीशी निगडित आहे.  
उच्च रक्तदाबांची लक्षणे उच्च रक्तदाबाची जाणीव होताच स्वतःच्या पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने हा आजार अधिकच बळावू शकतो. ताबडतोब तज्ज्ञ डॉक्‍टरांना भेटून त्यांच्याशी सल्लामसलत करून उपचाराला सुरवात करावी. उच्च रक्तदाबाची अनेक लक्षणे आहेत, ती ध्यानात घेऊन त्यानुसार आपण आपली काळजी घ्यावी.

-  डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसू लागतात. डोळ्यात रक्तासारखे ठिपके दिसणे हे या आजारात आढळणारे सर्वसामान्य लक्षण आहे.
-  मधुमेह असलेल्या किंवा रक्तदाब असलेल्यांमध्ये रक्ताचे स्पॉट्‌स ही सामान्य बाब आहे.
-  चेहऱ्याचा उजळपणा काहीवेळा चिंताजनक असू शकतो. कारण रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन चेहरा लालसर दिसू लागतो. त्याचबरोबर चेहऱ्याला जळजळ जाणवते. सूर्यप्रकाश, थंड हवामान, मसालेदार पदार्थ, गार वारा, गरम पेय, मद्यपान, व्यायामाचा अभाव अशा बाबीदेखील हा परिणाम घडवून आणतात. त्यामुळे त्वचेची काळजीदेखील घ्यावी लागते. चेहऱ्यातील हा फरक भावनिक बदलदेखील घडवतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाचा रक्तदाबदेखील वाढतो. वाढता रक्तदाब हा चेहऱ्याच्या उजळपणाशी संबंधित असतो. जर आपला रक्तदाब सामान्य असेल तर चेहऱ्यावर फरक जाणवणार नाही.
-  उच्च रक्तदाबामुळे चक्कर येत नाही, तर त्यासाठी आपण घेत असलेल्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे हा त्रास जाणवतो. चक्कर येत असल्याचे ध्यानात येताच त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराचा तोल जाणे तसेच चालताना त्रास होणे ही हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे आहेत. उच्च रक्तदाब हा असे झटका येण्याचे कारण असतो.

उच्च रक्तदाबाचे निदान तपासा  आरोग्यदायी वाटत असले तरी तरुणांनी दोन वर्षांनी एकदा तरी त्यांच्या रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. ज्यांच्या घरी, कुटुंबात, अगोदरच्या पिढींमध्ये किंवा आई-वडिलांना रक्तदाबाचा आजार आहे, त्यांनी तर ही काळजी विशेषत्वाने घेतली पाहिजे. अशा घरातील तरुण मुलांना लहानवयातच ही समस्या होऊ शकते. त्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे वेळीच तपासणी केली तर जोखीम कमी करता येते. पान
अठरापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीने आपले रक्तदाबाचे प्रमाण कितपत आहे, याची माहिती व मोजमाप वर्षातून एकदा तरी करून घेतले पाहिजे. रक्तदाब नसेल तर ठीक किंवा त्याचे प्रमाण कितपत आहे आणि ते कितपत होऊ शकते, याचा अंदाज घेऊन त्यानुसार पथ्ये पाळणे सोपे होते. तरुणपणातील तपासणी व उपचारांमुळे त्याचे भविष्यातील प्रमाण कमी-जास्त राहते. तपासणी केली नाही, तर वयोमानानुसार तो वाढत असल्याने नंतरच्या काळात त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. उच्च रक्तदाबामुळे आपल्या हृदयाचे तसेच रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याचे वेळीच निदान व्हायला हवे. तसे झाले तर तो नियंत्रणात ठेवण्यास व आपल्या शरीराचे नुकसान थांबवण्यास मदत होऊ शकते.

उपयुक्त उपचारपद्धती-  सुदैवाने, रक्तदाब कमी असेल तर उपचार घेणे सोपे होते आणि उत्तम आरोग्यदेखील राखता येते. आपल्या जीवनशैलीत त्यानुसार आपण बदल करू शकतो. तसेच होणारा अधिक त्रास कमी करू शकतो.
-  वजन नियंत्रित ठेवले तर उच्च रक्तदाबाचा धोका कमी आणि शरीर निरोगी राहते.
-  दररोज व्यायाम करा - उच्च रक्तदाबाची जोखीम कमी करण्यासाठी दररोज व्यायाम आवश्‍यक आहे.  दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातील सर्व दिवस आपला व्यायाम होईल, यानुसार आपल्या कामाचे नियोजन करा.
-  पोषक आहार घ्या -  फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, आणि कमी चरबी असलेली उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ असा सकस आहार रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतो.
-  मीठ कमी खा. अन्न बनवण्याच्या प्रक्रियेत मिठाचा वापर होतो. हे मीठ सूप तसेच भाजलेल्या-शिजवलेल्या पदार्थांतून मिळते. पण त्याचे प्रमाण कमी अथवा संतुलित असेल, तर रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
-  धूम्रपान करू नका - धूम्रपानामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, झटका आणि अन्य आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते टाळा.
-  रात्री चांगली झोप घ्या. रात्री मिळणारी चांगली झोप ही रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
--------------------------------
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Thursday, February 4, 2016

आरोग्यासाठी प्रसन्न मन -2

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर, असा विचार करत ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. 

जग हे जडापासून बनलेले आहे. या विश्वातील मायेच्या चमक-दमककडे आकर्षित होऊन किंवा चुकीच्या आवाहनामुळे मनुष्य चुकीच्या मार्गाला जातो. यामुळे मन प्रसन्नता हा सोम्यागोम्यासाठीचा मार्ग नव्हे असे म्हणून आपण मोकळे होतो. पण प्रत्येक माणसाला आज ना उद्या स्वतःचे आरोग्य, समृद्धी, आत्मसमाधान व तेजाचा विचार करावाच लागेल. कारण सरतेशेवटी शांती त्या ठिकाणीच मिळणार असते. 

मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व थोड्या थोड्या फरकाने एकमेकांपासून वेगळे असले, तरी ते सर्व एकच आहेत. यातील बुद्धी आहे महत्त्वाची. अहंकार हा अंधकारच होय. तेथे सगळ्याचाच अभाव असतो. तेथे असतो फक्‍त स्वार्थीपणा व लंपटपणा. चित्त हे बुद्धीचे आदेश मनापर्यंत पोचविण्याचे माध्यम. बुद्धीचे व्यवस्थित मार्गदर्शन मनाला मिळाले तर मन शांत होऊ शकते, प्रसन्न होऊ शकते. एखादा मनुष्य नशीबवान आहे असे आपण म्हणतो. तो नशीबवान होतो, कारण त्याला योग्य वेळी योग्य गोष्टी सुचतात. त्याला खरोखर भगवंतांचा कृपाशीर्वाद मिळत असणार, जेणेकरून त्याला जीव, आत्मा व परमात्म्याच्या श्रेयस गोष्टी सुचतात. बुद्धीने अशा प्रकारे ऐनवेळेला सु-विचार सुचविण्यासाठी, चांगली कल्पना सुचविण्यासाठी, चांगल्या अनुभवाचा साक्षीदार करून देण्यासाठी खूप पूर्वतयारी असण्याची गरज असते. म्हणून ज्ञान हे अनुभवावर आधारित असते.

एक गृहस्थ मोठे कवी होते. त्यांनी गंगेवर एक छान काव्य रचले होते. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. पुरस्कार घेण्यासाठी एवढ्या लांब आलेलो आहोत, तेव्हा गंगास्नान करून जावे अशा हेतूने ते गंगेवर पोचले. ते पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करत होते. काठावर असलेल्या एकाने सांगितले येथे उतरू नका, कारण येथे खूप मगरी, सुसरी आहेत. त्यावर कवी म्हणाले की, मगरी-सुसरी या तर गंगेचे वाहनच आहेत. मी तळापर्यंत जाणारच नाही, कारण वाहनावर गंगा आरूढ झालेली आहे. मी फक्‍त वर वरच्या पाण्यात स्नान करणार आहे. पाण्यात उतरल्यावर मगरीने पाय धरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या वाहनाचा अनुभव आधी घ्यायला पाहिजे होता असे लक्षात आले. गंगेचे वाहन मगर आहे म्हणत असताना मगर गंगेच्या पाण्यावर विहरत असतात, गंगा मगरावर आरूढ झालेली नसते. हा अनुभव नसल्याने नुसत्या शब्दाच्या माध्यमातून लिहिलेल्या काव्याला पुरस्कार मिळू शकतो, पण व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. शंकरांनी विषप्राशन केल्यानंतर त्यांच्या कंठाची आग होऊ लागली, तेव्हा त्यांनी सर्प थंड असतो म्हणून सर्पाला कंठाभोवती लपेटून घेतले. परंतु प्रत्यक्ष सर्पाचा थंडपणा अनुभवल्यावर मिळणारे ज्ञान वेगळे असते. असे अनेक प्रसंग आठवतील की, ज्यात बुद्धी व बुद्धीवर बसविलेले तर्क यांनाच ज्ञान समजून आचरण केल्याने आयुष्यात चांगल्या संधीला मुकावे लागले. 

अनुभव घेत असताना किंवा कार्य करत असताना त्या कार्याचा अनुभव काल्पनिक तर घेतला जात नाही ना, यावरही लक्ष ठेवून मनाला तशी सूचना देण्याकडेही लक्ष ठेवावे लागेल. विषयापासून निवृत्ती साधता आली, तर काही मदत होऊ शकेल. मन प्रसन्न होत नाही, पण आपण याची जबाबदारी याच्यावर की त्याच्यावर असा विचार करत आपण ‘विषया’पर्यंत आलो. सर्व जबाबदारी विषयाची असल्यामुळे विषयामुळे मन प्रसन्न राहू शकत नाही. कारण विषय हे इंद्रियांना स्वतःच्या बाजूला वळवितात. इंद्रियांना वेगवेगळी लालूच दिल्यामुळे त्यांच्यावर निर्बंध टाकले, तरी काल्पनिक अनुभव किंवा विचार मनात येत राहतात. त्यामुळेही मन प्रसन्न व्हायला अडचण येते. विषयांवर जबाबदारी टाकणे म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूचे पॅकिंग फारच आकर्षक असल्यामुळे ती वस्तू आपण वापरतो, एखादा मनुष्य दिसायला अतिशय स्मार्ट व रुबाबदार किंवा स्त्री सौंदर्यवान दिसत असल्यामुळे त्यांच्याकडे आमचे मन आकर्षित होते अशा प्रकारे विषयावर जबाबदारी टाकली जाते. विषय मनाला विचलित करतात हे एका दृष्टीने बरोबर आहे. 

प्रत्येक इंद्रिय वेगवेगळ्या गुणांनी बांधलेले असते. विषयांचे पण स्वतःचे गुण ठरलेले असतात. त्यामुळे इंद्रिये विषयाकडे आकर्षित होतात. सृष्टीने सृजनासाठीचे आणि जीवन व्यवस्थित चालण्यासाठी काही नियम केलेले आहेत. त्यातही अशी आकर्षणे निसर्गतःच टाकून ठेवलेली आहेत, उदा. प्रजोत्पादनासाठी उपयोगी पडणारे पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षण. पुरुष व स्त्री यांच्यातील आकर्षणामुळे जीवनात शृंगाररस उत्पन्न होतो व एकूण जीवनाचे सौंदर्य कळून जीवनाविषयी आकर्षण उत्पन्न होते. विषयांना समजून घेणे खूप आवश्‍यक आहे. विषय कशासाठी आहे हे पाहणे आवश्‍यक असते. शिडी ही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी साधन आहे. शिडी कितीही उत्तम दर्जाची बनवायची असे ठरविले, तरी ती सोन्याची बनवता येत नाही, कारण सोने मऊ असल्याने सोन्याच्या पायऱ्या वाकू शकतात. शिडीच्या पायऱ्या सुंदर दिसणाऱ्या चकचकीत धातूच्याही करता येत नाहीत, कारण शिडीच्या पायऱ्यांवर पाय द्यायचाच असतो. शिडीवरून चढून गेल्यावर आपल्या परमप्रिय व्यक्‍तीची भेट झाली, तर शिडीची कोणी पूजा करत नाही आणि कायम शिडी बरोबर घेऊनही कोणी फिरत नाही. 

अशा प्रकारे प्रत्येक बाह्यवस्तूचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे प्रत्येकाने नक्की केले, तर विषयांपासून सुटका होण्याचे नक्की होऊ शकते. जेवल्याशिवाय राहता येत नाही. पाण्याला जीवन म्हटले जाते, ते प्रत्येकाला आवश्‍यक असतेच. परंतु ज्या वेळी जिवावर बेतण्याची वेळ येते तेव्हा पाण्यावर भागत नाही. अन्नावाचून चालत नसले, तरी त्यावाचून महिनाभर राहता येऊ शकते. आवडीच्या वस्तू जेवणात असल्या, तर जेवण जाते; अन्यथा तोंडात घास गोल फिरतो असे म्हणणारी व्यक्‍ती उपासमार झाली की गणपतीला वाहिलेल्या दूर्वा खायलाही मागे-पुढे पाहत नाही. 

प्रत्येक विषयाचे चिंतन करून आपले जीवन चालविण्यासाठी, जीवनात हाती घेतलेले कार्य तडीस नेण्यासाठी मुळात कुठले विषय अगदी निकडीचे आहेत ते ठरविणे, त्या विषयांची वर्गवारी लावून, त्यांचे आपल्या आयुष्यात असलेले प्राधान्य ठरवून नंतर त्या विषयांचे आपल्या आयुष्यातील स्थान नक्की करावे. विवाहिताला पत्नी व तिच्यापासून मिळणारे सुख हा विषय महत्त्वाचा असणे साहजिक आहे. परंतु लग्न न झालेल्या अनेक व्यक्‍ती असतात. आपल्याला जीवनाच्या लक्ष्याप्रत पोचण्यासाठी काय अत्यावश्‍यक आहे हेही ठरवावे लागते. श्रीमद्‌ आदि शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम्‌’ या स्तोत्रात ‘एतद्‌ मांसवसादिविकारम्‌’ असे म्हटलेले आहे. म्हणजे ज्या वस्तूंची डोळ्यांना भुरळ पडते ते आयुर्वेदातील मज्जा व मांस यांचे खेळ असतात. तेव्हा त्यांना अवास्तव महत्त्व न देता हे मज्जा व मांस ज्या जिवाशी संबंध ठेवून असतात त्या जिवाचा, त्या व्यक्‍तीचा विचार करणे अधिक आवश्‍यक असते.
असे करत गेल्याने सरतेशेवटी अणूरेणूत असलेल्या परमात्म्यापर्यंत पोचल्यानंतर विषयनिवृत्ती सोपी होऊ शकेल. अशी विषयनिवृत्ती झाली, तर इंद्रियांवर अनुशासन करणे सोपे होईल. 
Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, February 3, 2016

ताणतणाव

- डाॅ. ह. वि. सरदेसाई
कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.

परिस्थितीत होणारा बदल कमी जास्त प्रमाणात ताण निर्माण करतो. या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता महत्त्वाची असते. या क्षमतेतील त्रुटी तणाव निर्माण करते. हा बदल कधी कधी तुलनेने नगण्यही असू शकतो. कधी तर झालेला किंवा होऊ घातलेला बदल किफायतशीरदेखील असू शकतो (जसे बढती मिळणे व बदली होणे), अशा कोणत्याही बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असण्याने माणसाच्या मनोशारीरिक अस्तित्वात विकार होऊ शकतात. कशामुळे ताण-तणावातून विकार होईल, हे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकते. माणसाच्या मनोशारीरिक घटनेवर (जडण-घडणीवर) ते अवलंबून राहते. नेमक्‍या कोण-कोणत्या घटनांनी ताणतणाव निर्माण होईल, याबद्दल विविध मते असणे स्वाभाविक आहे.

तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाचा प्रकार वयोमानानुसार बदलू शकतो. पौगंडावस्थेत आपल्या पालकांच्या अपेक्षा, तारुण्यात वैवाहिक साथीदारांसंबंधीची मिलनोत्सुकता, पुढे कामातील वरिष्ठांशी संबंध, आर्थिक स्वास्थ्य-सुबत्ता मिळण्याची आणि ती कमावण्याकरिता करावी लागणारी धडपड, पुढे वैवाहिक जोडीदाराबरोबर सलोख्याचे स्नेह-संबंध टिकणे, वयस्कर वाड-वडिलांच्या प्रकृतीच्या समस्यांना सांभाळणे, लहान मुलांचे बेशिस्त वागणे, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होताना पाहणे, वार्धक्‍याबरोबर येणारी शारीरिक आणि आर्थिक तूट, याबरोबर घसरणारी कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा आणि नेहमीच असणारी, परंतु वार्धक्‍यात विशेषतः जाणीव होत राहणारी मृत्यूची भीती, ही सारी कमी-जास्त प्रमाणात तणाव निर्माण करणारी कारणे प्रत्येक व्यक्तीत असू शकतात. या कारणांना वास्तवात जाणणे, वास्तव स्वीकारणे आणि वास्तवाचा उपभोग घेण्याची क्षमता जोपासणे, हे खऱ्या समृद्ध मनाचे लक्षण होय.
तणावामुळे व्यक्ती चिंतातुर अथवा खिन्न होऊ शकते. अनेकांना शारीरिक लक्षणे उद्‌भवतात. काही जणांची वृत्ती समस्यांपासून पलायन करण्याची असते. अशा व्यक्ती मद्यपाशात स्वतःला झुगारून देतात किंवा अतिरेकी खातात व स्थूल बनतात किंवा जुगार, रेस अथवा पत्ते खेळणे, अशा वास्तवातून पलायनाच्या मार्गाला लागतात. बहुतेकांना तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगांच्या पुनरावृत्तीचे भय वाटत राहते. (जसे परीक्षा, सभेत भाषण करणे, मुलाखत देणे) काहींना क्रोध येत राहतो (अपेक्षा भंग होणे) काहींना अपराधीपणाची भावना येत राहणे (आपल्या हातून चूक घडली याचा पश्‍चात्ताप, ‘पाप’ घडल्याची टोचणी) काहींना घडून गेलेल्या घटनेबद्दल शरम वाटत राहते, (आपल्या कृत्यांबद्दल अथवा इतरांनी केलेल्या आपल्या ‘अपमाना’बद्दल) अशी भीती, राग, अपराधीपणाची भावना, लाज वाटणे इत्यादी भावना ज्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रसंग घडताना 

निर्माण होतात, त्याचप्रमाणे त्या त्या प्रसंगाच्या आठवणीनेदेखील जशाच्या तशाच निर्माण होतात. या भावनांमुळे व्यक्ती अस्वस्थ होते. माणसाची चिडचिड होते, स्वभाव रागीट किंवा चिडका बनतो, अकारण थकवा येतो, लहान सहान गोष्टींनी (आवाजामुळे) दचकावयाला होते आणि आपण तणावाखाली असण्याची जाणीव होते. या तणावामुळे एकाग्रता शक्‍य होत नाही, मनात विचारांचे वारू बेलगाम संचार करू लागतात, झोपेत व्यत्यय येऊ लागतो (झोप लागण्यास वेळ लागतो, जाग लवकर येते, सारखी जाग येते) अस्वस्थ करणारी स्वप्ने पडू लागतात. आपण आजारी आहोत, या भावनेने व्यक्ती पछाडली जाते, स्वतःला योग्य वाटेल ती औषधे (विनाकारण) घेण्याकडे कल होऊ लागतो. व्यसनाधीनता बळावते. प्रत्यक्ष त्रास होत असल्याने विविध तपासण्यांत फारसा दोष सापडत नाही, याचे नवल वाटू लागते.

बदलांना स्वीकारताना होणारे त्रास हे ‘चिंतातुर’तेपेक्षा वेगळे असतात, याचे ध्यान ठेवावे. शिवाय, इतर मानसिक आजार किंवा स्वभाव-दोष यांपासूनदेखील या परिस्थितीशी ‘जुळवून घेण्यातील त्रुटी’ने होणारे दोष वेगळे असतात. काही शारीरिक आजारांबरोबर आलेल्या मानसिक आजारांचीदेखील दखल घेणे आवश्‍यक असते. परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेतील त्रुटीमुळे होणारे त्रास ती परिस्थिती बदलली (परीक्षा किंवा मुलाखत होऊन गेली) की आपोआप शमतात, तसे मानसिक विकारांचे होत नाही. परिस्थिती स्वीकारली म्हणजे जुळवून घेण्याचा प्रश्‍न मागे राहात नाही. परिस्थितीत बदल झाल्यावर येणारे विकार होण्यास जबाबदार असणारा परिस्थितीतील बदल न्यायालयांचे समन्स येणे, मिलनोत्सुक प्रेमसंबंधात विधान होणे) ओळखता येतो. साधारणपणे अशा घटनेचे परिणाम जेव्हा सहा महिने होतात, तेव्हा या तणावांना तीव्र प्रकारचे म्हटले जाते आणि जेव्हा जास्त काळ (अथवा कायम) होत राहणारा त्रास हा दीर्घकाळ चालणारा त्रास मानला जातो.

अशा बदलामुळे आलेल्या घटनांच्या उपचारात विविध प्रकारचे उपाय करणे उपयोगी पडते. सुरवात काही क्रियांपासून करणे इष्ट असते. बरीच माणसे श्‍वास भरभर घेऊ लागतात; परिणामी, रक्तीतील कार्बन-डाय-ऑक्‍साइडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हातापायांच्या बोटांना मुंग्या येतात, नाक व चेहरा किंवा कान येथेही अशा संवेदना जाणवतात. या संवेदनामुळे व्यक्ती आणखीनच भयभीत होते. शरीरक्रियांच्या अज्ञानातून उद्‌भवलेल्या भीतीचे निराकरण करून तक्रार लगेच दूर करण्यासाठी अशा व्यक्तीला एखाद्या (बंद) कागदाच्या पिशवीत श्‍वासोच्छवास करावयास सूचना द्याव्यात. थोड्याच श्‍वसनानंतर मुंग्या येणे थांबेल, भीती जाईल, मग कागदी पिशवी काढावी.
कोणत्याही कारणाने माणसाने श्‍वास भराभर घेतला तरी त्याच्या रक्तातील कार्बन-डाय ऑक्‍साइडचा निचरा होतो. असा निचरा प्रमाणाबाहेर झाल्याने हातापायांना मुंग्या येतात. शिवाय, काही रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणेही संभवते. आपल्या मेंदूतील टेंपोरल लोब या भागात अशा प्रकारे रक्तवाहिन्यांच्या आकुंचनामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी पडणे शक्‍य होते. परिणामी, त्या व्यक्तीलाकाही प्रकारचे ‘भास’ होणे शक्‍य आहे. याची माहिती प्राणायामातील ‘भास्त्रिका’ हा प्रकार करणाऱ्या साधकांना असावी.ज्या व्यक्तींना विशिष्ट बदलांमुळे तणाव येतो याची कल्पना असते किंवा देता आली तर अशा प्रसंगांना कसे तोंड द्यावे, याचे समुपदेशन उपयोगी पडते. तणावांची जाणीव होऊ लागताच शवासनासारखे शरीर सैल करणे व श्‍वासावर पूर्ण लक्ष केंद्रित करून इतर सर्व विचार करण्याकरिता मन मोकळे न ठेवणे याचाही उपयोग होतो. हा एका प्रकारे जागृत मन विचाररहित ठेवण्याचा (ध्यानाचा) प्रयत्न होय.

काही सामाजिक परिस्थितीचा परिणाम तणाव निर्मितीत होणे शक्‍य असते. काहींना गर्दीत जाणे नको वाटते, काहींना नव्या ओळखी करून घ्याव्याशा वाटत नाहीत, व्यासपीठावर जाण्याची अकारण भीती काहींना असते, अशा सामाजिक प्रसंगांना ओळखणे महत्त्वाचे ठरते. या प्रसंगांतून बाहेर पडताना सुरवात अगदी माफक (दोन-तीन माणसे) आकड्यापासून सुरवात करून (किंवा तशी कल्पना करून) त्या प्रसंगांना तोंड देण्याची मनाची तयारी केली जाते. काही वेळा मोठे बदल करावे लागतात. (उदा. नोकरी बदलणे) परंतु, हे निर्णय पूर्ण विचारांच्या नंतरच घ्यावेत.

मानसोपचार क्वचितच लागतो; परंतु समुपदेशन उपयोगी पडते. मनाला भविष्यकाळ किंवा भूतकाळांतील घटनांच्या विचारांत गुंतण्याची सवय लागलेली असते. त्याऐवजी मनाला वर्तमानकाळात आणि आताच्या परिस्थितीत राहण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते. चिंता ही नेहमीच भवितव्याशी संबंधित तर अपराधीपणा हा नेहमीच भूतकाळात घडलेल्या घटनांबद्दल असतो, याची जाणीव ठेवावी.

काही औषधांचा वापरदेखील उपयोगी ठरतो. अर्थात, कोणत्याही औषधांचा वापर त्या संबंधात ज्ञान आणि वापरण्याचा अनुभव असणाऱ्या (डॉक्‍टर) व्यक्तीनेच करावा. पूर्वी आपल्याला बरे वाटले होते, हा अनुभव किंवा केवळ सद्‌हेतूने सुचविलेले औषध घेणे केवळ निरुपयोगीच नव्हे, तर अपायकारकही ठरू शकते, याचीदेखील जाणीव असावी. अनेक औषधांना नको असणारे परिणाम असतात, कधी कधी हे नको असणारे परिणाम गंभीर परिणाम करू शकतात, घातकही ठरू शकतात. यासंबंधात अमेरिकेतील जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्‌स जनरल हॉस्पिटलमधून प्रसिद्ध झालेल्या एका शोध-निबंधातील माहिती दखलपात्र आहे. सलग दाखल झालेल्या सहाशे रुग्णांना ‘उपचाराचा’ झालेला त्रास अभ्यासला गेला तेव्हा असे आढळले की, या ६०० पैकी २९० रुग्णांना उपचारांचा काहींना काही त्रास झाला. यापैकी ७७ रुग्णांना गंभीर दुखणे झाले, तर १५ रुग्ण त्यांच्या आजारांनी नव्हे, तर उपचारांच्या दुष्परिणामांनी दगावले! लोरॅझिपॅम ०.५ ते १.० मिलीग्रॅम दिवसातून दोन वेळा असे उपयोगी पडणारे औषध डॉक्‍टरांच्या नजरेखाली मर्यादित काळापुरते फायदेशीर ठरू शकते.

सहसा योग्य समुपदेशन व रुग्णाला आजाराच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन भीती घालविण्याने बरेच रुग्ण बरे होतात. उशिरा केलेले किंवा चुकीचे उपचार, आजार रेंगाळवतात व दीर्घकाळ चालू राहिलेले आजार एकदा जुनाट झाले की बरे होणे कठीण होते.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

खिन्नता

- डॉ. ह. वि. सरदेसाई

एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

आपल्या ‘फॅमिली डॉक्‍टर’कडे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांपैकी तीस टक्के रुग्णांच्या तक्रारींचा उगम ‘खिन्नते’तून येतो. आपल्या जनुकीय रचनेवर मेंदूच्या पेशींच्या दळणवळणाचे कार्य अहोरात्र चालू असते. हे दळणवळण ज्या रासायनिक रेणूंमार्फत घडते, त्या रेणूंना न्यूरो-ट्रान्समिटर्स म्हणतात. हे रेणू विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळेला, विशिष्ट प्रमाणात निर्माण होणे आणि विशिष्ट वेळांत त्यांचा निचरा होणे आवश्‍यक असते. तसे झाले तरच मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालू शकते. भावना, विचार आणि अनुभवांची स्मृती योग्य प्रकारे होण्याकरता या कार्याची योग्य प्रकारे कार्यवाही आवश्‍यक असते. या व्यवस्थेवर आपल्या जनुकीय रचनेचा मोठा ताबा असतो. कोणती भावना, कोणत्या वेळी, कोणत्या प्रमाणात निर्माण व्हावी हे या कार्यावर ठरत राहते.

जनुकीय रचनेप्रमाणे, वाढीच्या वयातील अनुभव आणि समस्या यांचादेखील या रसायनांच्या निर्मितीवर परिणाम होत राहतो. काही व्यक्तिमत्त्वातील दोष (समाजाचे स्थैर्य विसकटण्यास जबाबदार असे वागणे ः कायदे न पालणे, इतरांना शारीरिक इजा करण्याकडे प्रवृत्ती असणे, जबाबदारीची जाणीव नसणे) प्रकट होऊ लागतात. या पेक्षाही आई-वडिलांचा विवाह-विच्छेद किंवा वडिलांचे अर्थाजन बंद पडणे या अनुभवांचे दुष्परिणाम होतात. अशा मुलांमध्ये अनेक शारीरिक तक्रारी येतात; परंतु कोणताही आजार आढळून येत नाही. एखाद्या न आवडणाऱ्या घटनेनंतर वाईट वाटणे स्वाभाविक असते; परंतु खिन्नता टिकून राहणे ही विकृती होय. एखाद्या व्यक्तीला वाईट वाटले तर त्या व्यक्तीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सहानुभूती अवश्‍य वाटते. खिन्नता निर्माण झाल्यास काळजी घेणाऱ्या (आई-वडिलांना) व्यक्तींच्या मनात अपेक्षाभंग निर्माण होतो. त्यातून अशी काळजी घेणाऱ्या व्यक्तीला चिडचिड येऊ शकते. ज्या व्यक्तीला वाईट वाटत असते, त्या व्यक्तीचा आत्मसन्मान टिकलेला असतो. उलटपक्षी खिन्न झालेल्या व्यक्तीला अपराधीपणा आणि स्वतःबद्दल किंमतशून्यतेची भावना बळावलेली असते.

खिन्नतेने ग्रासलेल्या व्यक्तीला किमान चार प्रकारचे त्रास जाणवू लागतात. १) खिन्नतेची, बरे वाटत नसल्याची भावना आणि परिस्थितीला जुळवून घेण्यातील क्षमतेची त्रुटी, २) खिन्नतेमुळे होणारे आजार, ३) खिन्नता आणि उन्माद यांच्या परिक्रमा आणि ४) आजार आणि उपचार यांच्यातून निर्माण झालेले त्रास, नको असणारे दुष्परिणाम, आजाराला होणारे प्रतिसाद.

१) परिस्थितीत घडलेल्या घटनेला प्रतिसाद म्हणून येणारी खिन्नता. प्रिय व्यक्तीचा विरह अथवा मृत्यू, विवाहविच्छेद, आर्थिक नुकसान, सामाजिक (अथवा कौटुंबिक) आदर गमावणे. अशा घटना घटताना राग येतो, नंतर अपराधीपणाची भावना बळावते. घटना घडल्यावर तीन महिन्यांच्या आंत त्रास होतो. आपले दैनंदिन कार्य करताना अडचणी जाणवू लागतात. थोडेफार वाईट वाटत राहते. चिंता येत राहते. स्वभाव चिडका बनतो. एकाग्रता जमत नाही. काहीही कार्य करण्याबद्दल आत्मविश्‍वास डळमळू लागतो आणि खिन्नतेच्या भावनेच्या जोडीला विविध शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. (पुढे पहावे).
२) मोठ्या प्रमाणात खिन्नतेचे परिणाम ः कोणत्याही बाबीत रस घ्यावासा वाटेनासा होतो. कशाचाही आनंद होत नाही. सगळ्या गोष्टींतून निवृत्त व्हावे ही भावना बळावते. आपले सगळे निर्णय चुकले आहेत, अशी अपराधीभावना येत राहते. मन एकाग्र होऊ शकत नाही. सतत थकवा वाटत राहतो. आता आपली काही किंमत राहिलेली नाही, असे वाटते. ज्या तक्रारींची कारणे सापडू शकत नाहीत, अशा विविध शारीरिक तक्रारी सतत येत राहतात. लैंगिक विषयात आणि संबंधातील रस लोपतो. मृत्यूचे विचार थैमान घालतात. कधी कधी या विचारांचे रूपांतर आचारात (आत्महत्या करण्यात) होऊ शकते. (परीक्षेत किंवा प्रेमात अपयश, आर्थिक नुकसान, प्रिय व्यक्तीचा मृत्यू) यातील बऱ्याच तक्रारी, विशेषतः थकवा, दिवसाच्या सुरवातीला (सकाळी) अधिक जाणवतात. झोपेत व्यत्यय येतो, सहसा भल्या पहाटेच जाग येते व तेव्हा मन खिन्न असते. भूक लागेनाशी होते. वजन कमी होऊ लागते, मलावरोध (शौच्याला घट्ट होणे, मल बाहेर पडण्यात अडचण जाणवणे) बळावतो. एखाद्या रुग्णाला खूप अस्वास्थ्य जाणवते व वास्तवाला अनुरूप नसणारे विचार आणि आजार होऊ लागताच. असा प्रकार वयस्कर रुग्णात अधिक प्रमाणात आढळतो. शंकेखोर प्रवृत्ती वाढते. ‘आपल्याबद्दल माणसे बोलतात, आपल्यामागे आपल्याला नावे ठेवतात’ असे विचार येतात. ‘आपल्याला कॅन्सरसारखा एखादा मोठा आजार झाला आहे’ हा विचार पिच्छा सोडत नाही. काही रुग्णात खूप झोप येऊ लागते, खादाडपणा वाढतो, थकवा असतो; परंतु एखादी बातमी ऐकून खूप उत्साहित होतात. काही रुग्णांना ऋतुमानानुसार आजार दिसू लागतात. या प्रकाराला SAD (Seasonal Affeclive Disorder) म्हणतात. ज्या देशात (अथवा प्रदेशात) हिवाळ्यात दिवस खूपच लहान असतो, तेथे हे आजार अधिक प्रमाणात आढळतात. या रुग्णांना कर्बोदके (साखर, भात, बटाटा) खाण्याची इच्छा बळावते. उत्साह वाटेनासा होतो. खा खा सुटते व झोप पुरेनाशी होते. काही गर्भवती स्त्रियांना बाळंतपणानंतर तीन आठवडे ते सहा महिन्यांनी खिन्नतेचा मोठा विकार जडतो. माफक प्रमाणात थकवा आणि खिन्नता अनेक स्त्रियांना (८० टक्के) बाळंतपणानंतर जाणवू शकतो. दहा ते पंधरा टक्के या नव-मातांना मोठ्या प्रमाणात खिन्नतेचा आजार होऊ शकतो. आपल्या बाळाच्या सुरक्षेबद्दल अतिरेकी चिंता निर्माण होते. या माताना झोप लागत नाही. वागण्यात अतिरेकी चिंता किंवा अविश्‍वास दाखविला जाऊ लागतो. वेळीच उपचार आवश्‍यक असतात.
काही खिन्न व्यक्ती सतत थकलेल्या, निरुत्साही, सर्व कार्यांतून अंग काढून घेणाऱ्या असतात. असा आजार एक-दोन वर्षे चालतो. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी खिन्नतेने पछाडले जाते, तर काहींना मासिक पाळी येण्यापूर्वीचे दोन आठवडे खिन्नतेचे त्रास होऊ शकतात.

३) उन्माद आणि खिन्नता यांच्या परिक्रमा येणे हा एक स्वतंत्र आजारच मानला जातो. आजाराच्या नावाप्रमाणे रुग्णाला उन्मादाचे आणि खिन्नतेचे आलटून-पालटून झटके येतात. उन्मादाच्या स्थितीत रुग्ण अस्वस्थ आणि बेचैन असतो, त्याला स्वस्थ बसवत नाही. जे डोक्‍यात विचार येतात, त्यांत अतिरेकी उत्साहाने भाग घेतला जातो, चटकन राग येतो. कल्पनांच्या भराऱ्या सुरू होतात. कोणत्याही एका विचारावर किंवा कामांत दीर्घकाळ रस राहत नाही, थोडीच झोप पुरते. या वैचारिक आणि भावनात्मक भराऱ्यांचे ऐकणाऱ्याला सुरवातीला कौतुक वाटते, पण काही वेळातच सारखे बदलणारे विचार, इतरांचा दृष्टिकोन स्वीकारण्यातील त्रुटी, मधून-अधून येणारा थकवा आणि स्वभावातील स्वतःच्या विचारांबद्दलचा भंपक मोठेपणा या अवगुणांची ओळख पटल्यावर ‘नको यांची संगती’ असा विचार मित्रांत फैलावू लागतो. स्वभाव अतिरेकी खर्चिक बनतो. ‘नोकरीवर लाथ मारीन’ अशा विचाराने वारंवार त्यागपत्र देऊन मागून पश्‍चात्तापाची पाळी येते. लग्न घाईत ठरविणे, उरकणे, विवाहबाह्य लैंगिक संबंध जोपासणे, मोठेपणाच्या फुशारक्‍या मारणे अशा वागण्याने कुटुंबीय व स्नेही कंटाळून जातात. दीर्घकाळ मैत्री जोपासणे किंवा स्थिर, सुखी संसार करणे क्वचितच जमते. सामान्यपणे उन्मादाचा काळ हा खिन्नतेच्या काळापेक्षा कमी लांबीचा असतो.

याच प्रकारात ‘सायक्‍लो थायमिक डिसॉर्डर्स’ नावाने ओळखला जाणारा एक भाग असतो. या व्यक्ती सतत काही वेळा खिन्नता तर काही वेळा थोड्या प्रमाणात उन्माद अशा आलटून-पालटून असतात. या व्यक्तींचे वर्णन पुढील श्‍लोकात चांगले आहे - ‘‘क्षणे तुष्ट - क्षणे रुष्टा - तुष्टा रुष्टा - क्षणे क्षणे। अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोऽपि भयंकर  (लोकोक्ती) (अर्थ - क्षणात समाधान पावणारा तर क्षणात रागावणारा. क्षणाक्षणात रागावणारा तर कधी हसणारा अशा अस्थिर चित्ताच्या माणसाची कृपी ही भयंकर हानिकारक असते. अर्थात्‌ क्षणा-क्षणाला हा अतिशयोक्तीचा भाग आहे. सायक्‍लो थायमिक डिसऑर्डरमध्ये प्रत्येक भावना साधारण दोन वर्षे राहते!

४) आजारांना प्रतिसाद अथवा रासायनिक रेणूंना (औषधांना) प्रतिसाद म्हणून घेणारी खिन्नता बहुतेक सर्व. सौम्य अथवा गंभीर विकारांना आपले अस्तित्व ‘खिन्नता’ अथवा ‘चिंता’ या स्वरूपात प्रतिसाद देतेच. हृदयविकार, पक्षाघात, दीर्घकाळ चालणारे संधिवातासारखे आजार आले म्हणजे खिन्नता येतेच. कॅन्सर झाला आहे, ही बातमी धक्कादायक, चिंताजनक आणि खिन्नता निर्माण करणारी असते. रजोनिवृत्ती संबंधात वर उल्लेख आलेला आहेच. मद्यपान हे खिन्नतेचे आणि आत्मघाताचे महत्त्वाचे कारण असते. ब्लडप्रेशर ताब्यात ठेवण्याकरता एकेकाळी रेसर्पित नावाचे औषध वापरले जाई, त्याने अनेकांना खिन्नता येई. कॉर्टिकोस्टेरॉईडस्‌ आणि गर्भ-प्रतिबंधक गोळ्यांच्या वापराने देखील खिन्नता येते. सध्या ब्लडप्रेशर ताब्यात आणण्याकरता वापरत असणाऱ्या मिथाईल डोपा आणि क्‍लोनिडीन या औषधांच्या वापरात खिन्नता येणे हा एक नको असणारा आहे.

हृदयविकारात वापरले जाणारे डिजिटॅलिस हे जगत्‌विख्यात औषध आणि पार्किन्सन्स डिसीनमध्ये वापरले जाणारे लिव्हीडोपा हे औषध घेणाऱ्यांना डिप्रेशन येते. नेहमीच्या वापरातील औषधांपैकी बीटा ब्लॉकर्स प्रकारची औषधे दीर्घकाळ घेतली तर खिन्नता येऊ शकते. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी रुग्णाला खिन्नता येण्याचा पूर्व-इतिहास असला तर खात्री करून घेणेच इष्ट असते.

खिन्नता हा विकार अनेकांना असतो व त्याचे परिणाम अनेक प्रकारचे असतात, याची कल्पना समाजाला, रुग्णांना आणि डॉक्‍टरांना असणे आवश्‍यक आहे. विशेषतः थकवा, निरुत्साह, निद्रानाश, भूक न लागणे, वजन कमी होणे, मलावरोध असे वरपांगी शारीरिक दुखणे खिन्नतेमुळे असण्याची शक्‍यता कधीही नजरेआड होऊ देता कामा नये.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, December 28, 2011

मानसोपचाराने ठेवा हृदय शाबूत


डॉ. विद्याधर बापट, मानसोपचारतज्ज्ञ, पुणे
हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाची संकल्पना मान्यता पावू लागली आहे, ती म्हणजे सायकोन्युरोइम्युनॉलोजी (पीएनआय). शरीर व मन एकमेकांवर कसे परिणाम करतात याचा तो अभ्यास आहे. भारतीयांसाठी खरं तर ही संकल्पना वेद काळापासून आहे. या संकल्पनेवर आधारित एक परिणामकारक तंत्र म्हणजे गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायझेशन.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन हे कल्पनाशक्तीचा शरीरस्वास्थ्यासाठी अतिशय सहज आणि परिणामकारकरीत्या वापर करण्याचे तंत्र आहे.

हे तंत्र इतर वैद्यकीय उपचारांना पूरक असेच आहे. मन आणि शरीर यांचा परस्परसंबंध वैद्यकशास्त्राने मान्य केला आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण शरीर, भावना आणि सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर केला जातो आणि मानसोपचाराद्वारा शारीरिक आजारांवर उपचार केला जातो. हृदयरोग व मधुमेह बरा करण्यासाठी औषधं, व्यायाम व पथ्यं याबरोबरच मनःस्वास्थ्यासाठीची वेगवेगळी तंत्रं, तसंच गायडेड इमेजरी यांचा मानसिक-शारीरिक दोन्ही दृष्टींनी चांगला उपयोग होऊ शकतो. ताणतणाव, क्रोध, दुःख, अपराधगंड, भीती आणि इतर नकारात्मक भावना हृदयरोग तसंच मधुमेहासाठी अतिशय घातक आहेत. संशोधनाअंती सिद्ध झालंय, की गायडेड इमेजरी, तसंच इतर स्वास्थ्य तंत्राद्वारा निर्माण होणारी स्वस्थ अवस्था या भावनांचा निचरा करते. रक्तदाब व नाडीची गती, तसंच रक्तातील शर्करा नियंत्रणात आणायला मदत करते. हृदयरोग संशोधनामधील मैलाचा दगड मानल्या गेलेल्या डॉ. डीन ओर्निश यांनी सिद्ध केलं होतं, की आहार, व्यायाम तसंच स्वस्थतेची तंत्रं यांनी सीएचडी (कोरोनरी हार्ट डिसीज) वर मात करता येते. याच स्वस्थतेच्या तंत्रांमध्ये गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन फार मोलाचं योगदान देऊ शकते.

अशा पद्धतीची स्वस्थतेची तंत्रं अनेक प्रगत देशांतील क्‍लिनिकमध्ये व इस्पितळात वापरली जातात. त्यानं हॉस्पिटलमध्ये कमी काळ राहावं लागणं, वेदना कमी होणं व काही केसेसमध्ये औषधांचा परिणाम लवकर होणं, ती कमी लागणं, हेही घडलंय.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन -
मन व शरीराचं एकमेकांशी असलेलं नातं व मनाचा शरीरावर होणारा परिणाम या तत्त्वावर हे तंत्र आधारित आहे.

गायडेड इमेजरी ही एक प्रणाली आहे- ज्यामध्ये तुम्ही कल्पनेचा वापर करून स्वस्थता व शांततेच्या निवांत प्रदेशात जाता. निसर्गातील प्रतिमा व दृश्‍यांचा परिणामकारक उपयोग केला जातो. त्यासाठी तज्ज्ञ थेरपिस्टची गरज असते. निवांत व तरल अवस्थेत गेल्यावर तुम्ही तज्ज्ञांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण लक्ष शरीरातील आजारी अवयवावर किंवा विशिष्ट सिस्टिमवर केंद्रित करता. उदा. हृदयरोगात, कोरोनरी हार्ट डिसीज (सीएचडी) मध्ये रोहिणीकाठीण्य म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रोहिण्यांमध्ये मेद जमा होतो. रोहिण्या अरुंद होतात. या अवस्थेतील व्यक्तीला हृदयाची आजारी स्थिती डोळ्यांसमोर आणायला सांगितली जाते. त्या स्थितीवर फोकस करून रोहिण्यांमधील मेद विरघळत आहे, रोहिण्या रुंद होत आहेत, हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत आहे व प्राणवायू मिळत आहे, हे चित्र तीव्रपणे उभे केले जाते. हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं.

मधुमेहासाठी -
आपला कोमट श्‍वास डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतोय. तिथं विरघळतोय. तेथील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या उघडल्या जातात. त्यांच्यात आवश्‍यक ते बदल, दुरुस्ती होतेय. त्या सक्षम होतात. काही काळ तिथं थांबून हा श्‍वास मेंदूच्या अफलातून अशा जाळ्यांमध्ये शिरतोय. तेथील नाजूक मज्जातंतू व अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांची जाळी उघडली जातात, स्वस्थ होतात. निर्माण झालेले व होऊ शकणारे अवरोध, अडथळे दूर होतात. माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक विलक्षण तेजस्वी, शीतल आणि सुखद असा प्रकाश जादू करतोय. शरीरातील सर्व सिस्टिम स्वस्थ होत जातात. हाच प्रकाश स्वादुपिंडामध्ये प्रवेश करतोय. तिथं अस्तित्वात असलेल्या पेशींच्या समूहाला उत्तेजित करतोय- ज्यायोगे त्या शरीराला आवश्‍यक तेवढं व शरीर वापरू शकेल एवढंच इन्शुलिन तयार होतंय, ते शरीरातील पेशींपर्यंत व्यवस्थित पोचतं आहे, हे इन्शुलिन एखाद्या किल्लीप्रमाणे काम करत आहे- ज्यायोगे जणू काही अन्नासाठी भुकेल्या पेशींचे दरवाजे उघडत आहेत आणि पेशींना व्यवस्थित अन्नरस मिळत आहे, हा अनुभव सुखद भासण्यासाठी, एकाग्रता होण्यासाठी संगीताचाही वापर केला जाऊ शकतो. नंतर सकारात्मक सूचनांद्वारा सर्व नकारात्मक भावनांचा निचरा केला जातो. शेवटी पुन्हा कल्पनेद्वारा, प्रतिमांद्वारा स्वस्थ, शांत वातावरणात व्यक्तीला नेलं जातं व सेशन समाप्त होतं. वारंवार व प्रभावीपणे उभ्या केलेल्या कल्पनाचित्रांचा, अंतर्मनाच्या शक्तीचा हा विलक्षण आविष्कार असतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशनदरम्यान मेंदूतील भावना नियंत्रण केंद्रांकडे सकारात्मक सूचना पाठवल्या जातात, ज्या पुढे ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम व इम्यून सिस्टिमकडे जातात, ज्याचा चांगला परिणाम हार्ट रेट, रक्तदाब, रक्तशर्करा यावर होतो. चांगली संप्रेरकं स्त्रवली जातात. आजार लवकर बरा होण्याच्या दृष्टीनं, शरीर अनुकूल व तत्काळ प्रतिसाद देऊ लागतं. सेशननंतर व्यक्तीला अतिशय शांत, उत्साही व टवटवीत वाटतं. याप्रमाणे प्रकृतीनुसार अनेक सेशन्स केली जातात. त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. रक्तशर्करा व लिपीड प्रोफाईलवर अनुकूल परिणाम होतो, आत्मविश्‍वास वाढतो, ताण नाहीसा होतो.
ही उदाहरणं फक्त कल्पना येण्यासाठी दिली आहेत. प्रत्यक्षात आजारी व्यक्तीची भावनिक जडणघडण, एकूण मानसिक स्थिती वगैरे लक्षात घेऊन तज्ज्ञ संहिता तयार करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी संहिता असू शकते व सेशन्सची संख्या वेगळी वेगळी असू शकते. होऊन गेलेला आजार पुन्हा उद्‌भवू नये यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो.

गायडेड इमेजरी व व्हिज्युअलायजेशन तंत्राचा उपयोग पुढील आजारातही होऊ शकतो ः 1) कर्करोग, केमोथेरपी सुसह्य करण्यासाठी, 2) वेगवेगळे ट्यूमर्स, 3) गरोदरपणात, 4) शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत सुधारणा होण्यासाठी, 5) शरीरातील प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, 6) नैराश्‍य व मानसिक अस्वस्थतेचे आजार, 7) निद्रानाश व झोपेचे विकार, 8) वजन कमी करणे, 9) मायग्रेन, 10) होऊन गेलेले विकार पुन्हा होण्यापासून प्रतिबंध होणे इत्यादी. डॉक्‍टरांनी दिलेल्या औषधे, व्यायाम, पथ्ये यांच्या जोडीला या तंत्राचा, तज्ज्ञांच्या साह्यानं अतिशय परिणामकारक असा उपयोग होऊ शकतो.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, December 21, 2011

हिवाळ्यातील उबेसाठी व्यायाम


डॉ. श्री बालाजी तांबे
व्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात. 

थंडीच्या दिवसात ऊब मिळविण्यासाठी अनेक उपाय योजावे लागतात. लोकर विणून तयार केलेले स्वेटर्स, पायमोजे, शाल, कानटोपी किंवा स्कार्फ, रात्री झोपताना ऊबदार रजई वगैरे साधनसामग्री हिवाळ्यात हाताशी असावी लागते. थंड प्रदेशात तर उबदार हवेचा झोत सोडणाऱ्या हीटर्सची किंवा पायाखालची फरशी ऊबदार राहावी यासाठी विशेष योजना करावी लागते. थंडीपासून संरक्षण होण्याच्या दृष्टीतून या सर्व गोष्टी आवश्‍यक असतातच, पण याशिवाय ऊब मिळविण्यासाठी आपल्या हातात असणारा, सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम. वास्तविक व्यायाम हा आपल्या दिनक्रमातील अविभाज्य भाग असायला हवा; मात्र हिवाळ्यात तरी व्यायाम करायलाच पाहिजे. शरीराबरोबरच मनालाही प्रफुल्ल करणारा, शरीरातील अग्नी प्रदीप्त करून आतून ऊब देणारा आणि एकंदर शरीरसामर्थ्य वाढवण्यास मदत करणारा व्यायाम नेमका कोणता करायचा, किती करायचा, कधी करायचा या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात.

व्यायामाचे साध्य
व्यायामाचे अनेक प्रकार आहेत. चालणे, पळणे, जॉगिंग करणे, पोहणे, योगासने करणे, सायकल चालवणे, जोर काढणे, दंड बैठका काढणे वगैरे. सध्या मल्लखांब, कुस्तीसारखे व्यायाम जास्त प्रचारात दिसत नाहीत, त्याऐवजी ऍरोबिक्‍स, जिममध्ये जाऊन व्यायाम करणे, पुल-अप्स करणे वगैरे आधुनिक प्रकार अधिक रूढ होत आहेत. व्यायामाच्या प्रकारानुरूप त्याचे फायदे निरनिराळे असतात. त्यामुळे व्यायामातून आपल्याला काय साध्य करायचे आहे, याचा विचार करून कोणता व्यायाम करायचा हे ठरवायला लागते.

शरीरयष्टी पिळदार करण्याच्या दृष्टीने व्यायाम करायचा असल्यास वेटलिफ्टिंग, दंडबैठका, जोर काढणे वगैरे प्रकार उपयुक्‍त ठरू शकतात. "बॉडी बिल्डिंग" हा जो प्रकार सध्या तरुण पुरुष वर्गाचा आवडता विषय आहे, त्यासाठी असे प्रकार उपयुक्‍त असतात. मात्र त्याचा अतिरेक होणार नाही, व्यायाम करताना दमछाक होऊन फायद्याऐवजी नुकसान होणार नाही, याकडे लक्ष ठेवायला लागते. धावणे, पोहणे, सायकल चालवणे, ऍरोबिक्‍स यांसारख्या व्यायामाने रक्‍ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते, स्नायू लवचिक राहतात, हृदय व फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळते. योगासने, चालणे या प्रकारच्या व्यायामाने शरीर लवचिक राहते; शरीरासह मनाचाही ताण नाहीसा होण्यास मदत मिळते; रक्‍ताभिसरण संस्थेसह, मज्जासंस्थेचे कार्य सुधारते आणि प्राणायाम, भस्रिकासारख्या श्‍वसनक्रियांमुळे शरीरात प्राणशक्‍तीचा संचार अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते; शरीर, मन, इंद्रिये सर्वच गोष्टी प्रफुल्लित होण्यास मदत मिळते. प्राणायामामुळे वाताला प्रेरणा मिळाली की अग्नी सुधारण्यास, पर्यायाने शरीराला आवश्‍यक ऊब मिळणसही मदत मिळते.

व्यायाम किती व कोणता?
वय, प्रकृती आणि व्यायामाचा उद्देश ध्यानात घेऊन व्यायामाचा प्रकार निवडायला हवा. उदा. प्राणायाम, योगासने, चालणे, पोहणे यासारखे व्यायामप्रकार बहुधा कोठल्याही प्रकृतीला मानवणारे असतात. मात्र बॉडी बिल्डिंगचे व्यायामप्रकार आपल्या प्रकृतीसाठी जड नाहीत ना, याचा विचार करूनच सुरू करावेत.

व्यायाम किती प्रमाणात करावा याविषयी आयुर्वेदात सांगितलेले आहे,
अर्धशक्‍त्या निषेव्यस्तु ।....अष्टांगहृदय 
म्हणजेच स्वतःच्या शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणातच व्यायाम करावा. थकून जायला होईल एवढ्या प्रमाणात व्यायाम करणे आरोग्यासाठी हितावह नाही. शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला हे कसे ओळखायचे, हेही आयुर्वेदशास्त्र सांगते.

हृदिस्थानस्थितो वायुः यदा वक्‍त्रं प्रपद्यते ।
व्यायामं कुर्वतो जन्तोस्तद्बलार्धस्य लक्षणम्‌ ।।.....सुश्रुतसंहिता


म्हणजे तोंडाने श्‍वास घ्यायची आवश्‍यकता भासू लागली व कपाळावर घाम येण्यास सुरवात झाली, की शक्‍तीच्या निम्म्या प्रमाणात व्यायाम झाला असे समजावे व व्यायाम थांबवावा. व्यायाम करण्यास सुरवात केली, की कदाचित सुरवातीच्या 10-15 मिनिटांतच ही लक्षणे दिसावयास सुरवात होऊ शकते; मात्र व्यायामाची नियमितता जसजशी राखली जाईल तसतसा हा कालावधी वाढत जातो. व्यायामाचे फायदे मिळण्यासाठी किमान 30-35 मिनिटे तरी व्यायाम करणे आवश्‍यक आहे. त्यातही कफप्रकृतीच्या व्यक्‍तींना, वजन जास्ती असणाऱ्या व्यक्‍तींना किंवा दिवसभर बैठे काम करणाऱ्यांना, वजन वाढण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांना याहीपेक्षा थोडा अधिक व्यायाम करणे चांगले असते.

व्यायामाचे फायदे
व्यायाम करण्याचे फायदे काय असतात, हेही आयुर्वेदाच्या ग्रंथात अतिशय समर्पकपणे सांगितलेले आहे.

लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्‍तघनगात्रत्वं व्यायामाद्‌ उपजायते ।।
.....अष्टांगहृदय सूत्रस्थान


- शरीर व मनाला हलकेपणा येतो.
- ताजेतवाने होते.
- शरीरशक्‍ती वाढते, एकंदर स्टॅमिना वाढतो.
- अग्नी प्रदीप्त होतो, त्यामुळे पचनशक्‍ती सुधारते.
- शरीर रेखीव, पिळदार व घट्ट होते.
- शरीरबांधा व शरीरयष्टी व्यवस्थित राखायला मदत मिळते.

शरीरोपचयः कान्तिर्गात्राणां सुविभक्‍तता ।
स्थिरो भवति मांसं च व्यायामाभिरतस्य च ।।
...सुश्रुत सूत्रस्थान 

योग्य व्यायामाने शरीरउपचय उत्तम होतो, म्हणजे शरीराला सौष्ठव, सुडौलत्व प्राप्त होते. बाह्यतः मांसपेशी, स्नायू संविभक्‍त दिसू लागतात व मुख्य म्हणजे मांसधातू स्थिर राहतो. अर्थातच स्थिर मांसधातूमुळे शक्‍ती-स्फूर्ती वाढतात, वय वाढले तरी तारुण्याचा अनुभव घेता येतो. अर्थात हे सगळे फायदे मिळण्यासाठी व्यायाम करण्यात नियमितता नक्की हवी. दोन दिवस उत्साहाने व्यायाम केला व नंतर आठवडाभर काहीच केले नाही, तर व्यायामाचा फारसा उपयोग होत नाही.

खेळा आणि ताण घालवा
व्यायामामध्ये खेळाचाही समावेश करता येतो. खेळाने व्यायामाबरोबरच मनावरचा ताणही नाहीसा होतो. मनाची एकाग्रता, अचूकता, चतुरता, त्वरित निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची क्षमता वाढते. क्रिकेट, बॅडमिंटन, लॉन टेनिस, फूटबॉलसारख्या मैदानी खेळांमुळे शारीरिक ताकद वाढते, स्टॅमिना वाढतो. रक्‍ताभिसरणाला मदत मिळाली, की शरीराला आपोआप ऊबही मिळते.

अति प्रमाणात व्यायाम सर्वांसाठीच वर्ज्य आहे. मात्र त्यातही आयुर्वेदाने विशेषतः पुढील परिस्थितीत विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे.

वातपित्तामयी बालो वृद्धोऽजीर्णो च तं त्यजेत्‌ ।
......अष्टांगहृदय सूत्रस्थान


वात वा पित्त प्रकृती असणाऱ्यांनी किंवा वातदोष-पित्तदोषाचे असंतुलन असणाऱ्यांनी, लहान वयात म्हणजे साधारणतः 15-16 व्या वर्षांपर्यंत, तसेच वृद्धांनी म्हणजे 70-75 वर्षांनंतर व्यायाम जपून करावा. व्यायाम करण्याचा सर्वांत चांगला ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळ्यात शरीरशक्‍ती सर्वाधिक असल्याने मनसोक्‍त व्यायाम करून स्टॅमिना वाढवणे या ऋतूत शक्‍य असते. व्यायाम सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीही हा ऋतू उत्तम आहे. हिवाळ्यात यथाशक्‍ती, पण सर्वाधिक प्रमाणात व्यायाम करता येतो. उन्हाळ्यात मध्यम प्रमाणात, तर पावसाळ्यात कमीत कमी व्यायाम केलेला चांगला असतो. ऋतूनुसार व्यायामाचे प्रमाण कमी-अधिक केले तरी व्यायाम करण्यात नियमितता हवी.

थोडक्‍यात, आरोग्य टिकवण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. कामाचा कितीही ताण असला, वेळेची कितीही कमतरता असली तरी व्यायामासाठी काढलेला अर्धा-पाऊण तास शरीर-मनाला बरेच काही देऊन जाईल. शारीरिक आरोग्य, मानसिक उत्साह आणि उत्तम व्यक्‍तिमत्त्व या सगळ्या गोष्टी एकत्रित साध्य करायच्या असतील, जीवनात संतुलन हवे असेल तर दिनक्रमात व्यायामाला अंतर्भूत करायला हवे.

स्निग्धतेसाठी आहार व्यायाम करताना एक महत्त्वाची गोष्ट आयुर्वेदशास्त्र सांगते, ती म्हणजे व्यायाम करून शरीर पिळदार बनवण्याची इच्छा असणाऱ्यांनी बरोबरीने आहारात स्निग्ध आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असू द्यावा.

अर्धशक्‍त्या निषेव्यस्तु बलिभिः स्निग्धभोजिभिः ।
.....अष्टांगहृदय सूत्रस्थान 

या ठिकाणी स्निग्ध पदार्थांचा अर्थ तेलकट तळकट असा नसून दूध, तूप, लोणी, बदाम, खजूर, खारीक इत्यादी शरीरोपयोगी पदार्थ असा आहे. गूळ-तूप, सुंठ-खारीक टाकून उकळलेले दूध वगैरेंचा आहारात समावेश केला, तर शरीराला स्निग्धता मिळते, तसेच आवश्‍यक असणारी ऊबही मिळते.






---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Monday, December 12, 2011

ताणतणाव


अश्‍विनी लाटकर, समुपदेशक, पुणे.
या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, असे वाटत असते. मात्र सर्वच ठिकाणी सतत फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो.

"ताणतणाव' हल्लीच्या जगात अगदी लहान मूल ते वयस्क व्यक्ती, प्रत्येकाच्याच आयुष्यात सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द. प्रत्येकाचेच आयुष्य त्याने भरून गेले आहे.

गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, वेगाने बदलत जाणारी जीवनशैली व कुटुंबपद्धती, प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव या सगळ्यांचा वाढत्या ताणतणावामध्ये मोठाच वाटा आहे.

हल्ली ताणतणावाची सुरवात ही मूल लहान असल्यापासून होते. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, सर्वच क्षेत्रांत यशस्वी असावे, शक्‍य झाल्यास इतरांच्या पुढे असावे, असे वाटत असते. त्यासाठी मूल दोन-तीन वर्षांचे झाले की पालकांचे प्रयत्न सुरू होतात. शाळा, क्‍लास, खेळ, छंद वर्ग वगैरे ठिकाणी त्यांना घातले जाते. या सर्वत्र क्षेत्रांत मुलांना परफेक्‍ट करण्यासाठीची ही धडपड असते, पण या सगळ्यात ज्याच्यासाठी हा सारा खटाटोप केला जातो त्या मुलाच्या मनाचा विचार मात्र राहूनच जातो. अर्थातच या सगळ्यामुळे मूल खरेच परफेक्‍ट किंवा ऑलराऊंडर वगैरे होते का, हा प्रश्‍नच आहे. का त्यातून काही मानसिक समस्याच निर्माण होतात, हा विचार पालकांनीच करायला हवा. यातील सर्वच ठिकाणी सतत फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो.

सकाळी उठल्यापासून धावपळ सुरू होते ते रात्री झोपेपर्यंत. संध्याकाळी घरी परत आल्यावरसुद्धा कोणालाच शांत बसायला, बोलायला वेळ नसतो. घरात पाऊल ठेवल्यापासून टीव्ही चालू होतो. तो बघता बघताच होमवर्क, जेवण, खेळ, भांडणे, दप्तर भरणे, तर कधी कधी गप्पा या सर्वच गोष्टी होत असतात. यात अनडिव्हायडेड अटेन्शन कशालाच दिले जात नाही. एवढे करून रात्री 11 पर्यंत कसेबसे झोपले, की पुन्हा पहाटेपासून धावपळ सुरू. झोपण्यापूर्वी शांत बसून एकमेकांशी गप्पा नाहीत, की राजाराणीच्या, परीच्या गोष्टी नाहीत. दिवसभरात काय काय झाले त्या बऱ्या-वाईट अनुभवांचे देणे-घेणे नाही, की भविष्यात काय करायचे आहे, याचा विचार नाही.

आपले अनुभव, भावना दुसऱ्यांबरोबर वाटून घेणे, व्यक्त करणे ही मनुष्यस्वभावाची इतर मूलभूत गरजांप्रमाणेच महत्त्वाची गरज आहे. ती जर योग्य प्रकारे पूर्ण केली गेली नाही तर त्यातून शारीरिक किंवा मानसिक समस्या वा ताण निर्माण होऊ शकतात.

हल्ली बहुतेक पालकांची तक्रार असते, की मुलगा ऐकत नाही, खूप हट्टी झालाय. उलटून बोलतो, सतत लोळून टीव्ही पाहत राहतो, त्यामुळे आम्हाला ताण येतो, पण त्याला त्याचे काहीही वाटत नाही.

पालकांची ही तक्रार वरवर पाहता जरी खरी वाटली, तरी ती तितकीशी खरी नाही. खरे तर मुलांना काही ताणतणाव नसतो म्हणून ती टीव्ही पाहतात हे नेहमीच बरोबर असते असे नाही, तर मुलांना बरेचदा ताणतणाव असतो, त्याच्याशी कसा सामना करायचा, हे त्यांना माहीत नसते. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी, तो घालवण्यासाठी मुले जास्त टीव्ही पाहतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या ताणतणावाचा विसर पडतो. असे असले तरी ताण (डीींशीी) हा प्रत्येक वेळेस वाईटच असतो असे नाही, तर काही वेळेस त्याचे फायदेसुद्धा होतात. उदा.- त्यामुळे आपल्याला समस्या लक्षात येण्यास मदत होते व त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात किंवा त्यावर मात करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे कोणतेही तंतुवाद्य सुरात वाजण्यासाठी जसा ठराविक ताण आवश्‍यक असतो, तसाच प्रत्येकाचे आयुष्य सुरात चालण्यासाठी थोडासा ताणसुद्धा आवश्‍यक असतो. पण ताण चांगला आहे का वाईट, हे ओळखायचे कसे? त्याची लक्षणे कोणती?

ताणतणावाची असंख्य लक्षणे असू शकतात व प्रत्येक व्यक्तीमध्ये ती वेगळी असतात. कोणाला कोणत्या प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक समस्या उद्‌भवतील हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर व आनुवंशिकतेवर अवलंबून असते. उदा.- परीक्षेचा ताण दोन मुलांवर सारखाच असणार नाही. एखाद्याचे डोके दुखेल, पोट दुखेल तर दुसऱ्याला झोप लागणार नाही, भूक लागणार नाही, तर आणि कोणी भांडेल, चिडचिड करेल.

बऱ्याचदा पालक- शिक्षक या सगळ्याकडे या वयात असे होतेच, असे म्हणून दुर्लक्ष करतात. ही मुलांवरच्या ताणतणावची लक्षणे आहेत. यावर त्यांचा विश्‍वासच बसत नाही. पण जेव्हा समस्येची तीव्रता वाढते त्या वेळेस ती लक्षात येते, पण अजूनसुद्धा मुलांच्या वर्तनसमस्या वाढल्या तरी व्यावसायिक मदत (समुपदेशन) घेण्याचे टाळण्याकडेच जास्त कल दिसून येतो. कोण काय म्हणेल या विचारालाच महत्त्व दिले जाते.

ताणतणावांची लक्षणे
लक्षणांची व्याप्ती व तीव्रता विकासाच्या टप्प्यानुसार वाढते वा कमी होते. अगदी लहान मुलांमध्ये हट्टीपणा, अंगठा चोखणे, नखे खाणे, गादी ओली करणे, उलटी, जुलाब होणे ही लक्षणे दिसून येतात, तर मोठ्या मुलांमध्ये नाडीचे ठोके वाढणे, आम्लपित्त, त्वचाविकार, नैराश्‍य, भीती, एकलकोंडेपणा, विचारांचा गोंधळ, मारामारी, शाळा बुडवणे, खोटे बोलणे, चोरी करणे, व्यसनाधीनता अशी लक्षणे असतात.

कुमार वयातील मुलांमध्ये मुख्य करून जलद शारीरिक बदलांमुळे, वाढीमुळे व हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे मानसिक अस्वस्थता, अवघडलेपणा, बंडखोरी व बेजबाबदार वर्तन जास्त प्रमाणात दिसून येते. ताणतणावाची पातळी या वयात अत्युच्च असते. त्याचा परिणाम एकाग्रतेचा अभाव व अभ्यासात लक्ष न लागणे, अशा गोष्टींवर होतो.

पालक किंवा शिक्षक मुलांना अशा वर्तनाबद्दल ओरडतात किंवा शिक्षा करतात. त्यामुळे लक्षणे कमी झालेली दिसत तर नाहीतच, पण त्यांची तीव्रता मात्र बऱ्याचदा वाढलेलीच दिसून येते. अशा वेळी मुलांना त्या लक्षणांसाठी (उदा.- रडणे, ओरडणे, हट्ट करणे, शाळा बुडवणे वगैरे.) शिक्षा न करता त्यामागचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. एकदा ही ताणतणावांची कारणे व लक्षणे लक्षात आली, की त्यावर उपाययोजना करणे खूपच सोपे जाते.

ताणतणावांची कारणे व त्याचे परिणाम - तणावांच्या कारणांचा विचार करताना त्याचे मुख्य दोन प्रकार सांगता येतील.
1) बाह्य लक्षणे - जेव्हा ताणतणावांची कारणे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिकतेशी संबंधित नसून, बाहेरची असतात.
परिस्थिती- घरातील, घराबाहेरची, प्रसारमाध्यमे इ.
पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. शाळा, परीक्षा, अभ्यास, स्पर्धा वगैरे. रोजचे दमवणारे दैनंदिन वेळापत्रक.
2) अंतर्गत - जेव्हा कारणे बाह्य नसून व्यक्तीच्या शरीराशी, मनाशी संबंधित असतात; ती बऱ्याचदा जन्मजात किंवा आनुवंशिक असतात.
नकारात्मक/ निराशावादी विचार.
आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे अति विश्‍लेषण/ अतिविचार.
स्वतःकडून अवाजवी/ चुकीच्या अपेक्षा.

विचारांमधला ताठरपणा - परिस्थितीशी जुळवून घेता न येणे, दुसऱ्यांचे विचार, वागणे पटवून न घेणे, याव्यतिरिक्त आयुष्यातली अनिश्‍चितता, परिस्थितीचे आकलन, दृष्टिकोन, पालकांशी सुसंवादाचा अभाव, रॅगिंग, व्यसने, प्रेम, लैंगिक आकर्षण, अपयश, मित्रांशी किंवा भावंडांशी भांडण, इतरांशी तुलना, भ्रमनिरास इत्यादी अनेक कारणे मुलांमध्ये ताणतणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. वेळेवरच ही कारणं ओळखून त्यावर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर शारीरिक किंवा मानसिक व्याधी, शाळेतून/ घरातून पळून जाणे, व्यसनाधीनता, आत्महत्या यासारखे गंभीर परिणाम दिसून येतात.

ताणतणावांचे व्यवस्थापन
हल्ली पालकत्व ही एक तारेवरची कसरत झाली आहे. वेगाने बदलत जाणारी जीवनशैली, कुटुंबपद्धती, वाढती महागाई, वाढता खर्च, त्यासाठी आई-वडील, दोघांनी नोकरी करण्याची आवश्‍यकता, वेळेची कमतरता, याच बरोबर मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा, क्‍लास, स्पर्धा ही एक न संपणारी दमवणारी यादी या सगळ्याचा ताण मुलांबरोबरच पालकांनासुद्धा निश्‍चितच येत असतो. आता पालक स्वतःच जर तणावग्रस्त असतील तर ते मुलांना कसे मदत करू शकतील? त्यामुळे जेव्हा आपण ताणतणावाच्या व्यवस्थापनाविषयी बोलतो त्या वेळेस पालकांच्या तणाव व्यवस्थापनापासून सुरवात करून मगच मुलांच्यासाठी उपाययोजना केल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. खरे तर ताणतणावांवर उपाययोजना करण्यापेक्षा तो न येईल यासाठी खबरदारी घेणेच चांगले.

पालकांसाठी काही सूचना
- खरी, आवाक्‍यातील उद्दिष्टे ठरवा, स्वतःमधील गुण-दोषांची माहिती करून घ्या.
- आयुष्यातले स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवा.
- कोणत्याही अर्थशून्य किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टींमुळे त्रास करून घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीबाबत योग्य दृष्टिकोन ठेवावा.
- रोज झोपण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसून आत्मपरीक्षण करा.
- वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
- वेळ पडेल त्या वेळेस न लाजता व्यावसायिक मदत जरूर घ्या.
- मुलांना वस्तूंपेक्षा वेळ द्या. त्यांना बोलते करा.
- टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करा.

मुलांसाठी सूचना -
- जेव्हा ताण जाणवेल त्या वेळेस कोणाशी तरी बोलावे.
- मित्र, पालक, शिक्षक यांच्याकडे मदत मागायला लाजू नका.
- स्वतःची ध्येये ठरवून त्याच दिशेने वाटचाल करा.
- नकारात्मक विचार टाळा.
- वेळेचे व्यवस्थापन शिका/ करा.
- स्वतःच्या शारीरिक/ मानसिक क्षमतांचा विचार करूनच आपली उद्दिष्टे ठरवा.
- परिस्थितीमध्ये जरुरीप्रमाणे छोटे छोटे बदल करा. परिस्थितीशी / लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.
- आहार, विहार, झोप यात योग्य संतुलन राखा.
- कोणतातरी छंद जोपासा.                        

ad