Showing posts with label जीवनशैली. Show all posts
Showing posts with label जीवनशैली. Show all posts

Saturday, December 31, 2011

हिवाळ्यातील ऊब - आहार 2

डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेदिक अन्नयोगाचा विचार करून पदार्थ तयार केले तर थंडीला तोंड देणे सोपे होऊ शकते. त्याउलट चव व नावीन्य या नावाखाली कुठल्यातरी चार-पाच वस्तू एकत्र करून तयार केलेली पाककृती वाढताना आकर्षक दिसण्यासाठी त्यावर विशेष मेहनत घेण्यावर भर दिल्यास त्या वस्तू अन्नयोग संकल्पनेपासून दूर जाऊ शकतात.

ऋतुनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात.


आहार हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ऋतूनुसार आहारात बदल केले तर तो आरोग्यरक्षणास हातभार लावणारा असतो. हिवाळ्यातल्या थंडीचा त्रास होऊ नये यासाठी शरीर उबदार राहणे आवश्‍यक असते. याला मदत करण्यासाठी, तसेच वर्षभरासाठी शरीरशक्‍ती कमवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात आहारात विशेष पदार्थ समाविष्ट करता येतात. मागच्या अंकात या पदार्थांचा उल्लेख केला होताच. आज आपण त्यांच्यापासून बनवलेल्या काही पाककृतींची माहिती घेणार आहोत.

ओली हळद व आंबेहळद यांचे लोणचे
हळद उष्ण वीर्याची असते, कफदोष, वातदोष कमी करणारी, रक्‍त शुद्ध करणारी असते. आंबेहळद गुणाने हळदीसारखीच असते. ओली हळद, ओली आंबेहळद आणि आले यांचे मीठ व लिंबाच्या रसाबरोबर लोणचे करून ठेवता येते. हिवाळ्यात हे लोणचे खाल्ले असता पचन नीट राहते, शरीराला आवश्‍यक ती ऊबही मिळते.

आलेपाक
रक्‍ताभिसरण वाढवून शरीर उबदार राहण्यास मदत करणारे घरगुती औषध म्हणजे आले. आले पचनास मदत करते, अग्नीस प्रदीप्त करते, खोकला, सर्दी, दमा वगैरे त्रासात उपयोगी असते. आल्यापासून आलेपाक बनवून ठेवता येतो. हिवाळ्यात रोज सकाळी किंवा जेवणाअगोदर आलेपाक खाल्ला तर त्याने पचन सुधारण्यास आणि ऊब मिळण्यास चांगली मदत मिळते.
आल्याचा रस काढावा, त्यात दोन किंवा तीन पट साखर घालावी, थोडे पाणी मिसळून पाक करावा. पाक तयार झाला की त्यात वरून केशर, वेलची, जायफळ, जायपत्री, लवंग यांचे चूर्ण घालावा. ताटात तापून त्याच्या वड्या पाडाव्यात व भरून ठेवाव्यात.

अहळीव लाडू
अहळीव वीर्याने उष्ण व शरीरपोषक असतात. वातदोषाचे संतुलन व्हावे आणि कंबरेत ताकद यावी म्हणून हिवाळ्यात अहळिवाचे लाडू किंवा खीर खाणे चांगले असते. यातील इतर घटकद्रव्येही शक्‍तिवर्धक असतात.
घटकद्रव्ये
  • अहळीव 25 ग्रॅम
  • गूळ 300 ग्रॅम
  • बदाम 50 ग्रॅम
  • काजू 50 ग्रॅम
  • पिस्ते 50 ग्रॅम
  • जायफळ पूड छोटा सपाट चमचा
  • नारळाचा चव 100 ग्रॅम
  • नारळाचे पाणी/दूध आवश्‍यकतेप्रमाणे
1. अहळीव पुरेशा नारळाच्या पाण्यात किंवा दुधात तीन-चार तास भिजवावे.
2. बदाम, पिस्ते, काजू यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
3. फुगलेले अहळीव, नारळाचा चव व किसलेला गूळ जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून मंद आचेवर ठेवून शिजवावे.
4. शिजत आल्यावर सुक्‍या मेव्याची भरड व जायफळ चूर्ण टाकून एकत्र करून, थोडे गार झाल्यावर लाडू वळावेत.

डिंकाचे लाडू
उत्तम प्रतीच्या डिंकाची तुपात तळून तयार केलेली लाही हाडे, पर्यायाने सांधे व पाठीची मजबुती वाढवणारी आहे. खारीकसुद्धा वात-पित्त-कफ या तिन्ही दोषांना संतुलित करणारी तसेच स्नायू व हाडांचे पोषण करणारी आहे. यातील बाकीच्या बदाम, काजू, पिस्ते वगैरे गोष्टीही वीर्य-शक्‍तिवर्धक व जीवनशक्‍तिपोषक आहेत. या सगळ्या गोष्टी शरीरात सहज पचण्यासाठी व शरीराकडून स्वीकारल्या जाण्यासाठी सुंठ, पिंपळी, केशरासारखी द्रव्येही यात घातलेली आहेत.

कॅल्शियम व लोह पुरेशा प्रमाणात मिळावे, एकंदर स्टॅमिना टिकून राहावा व शरीरबांधा उत्तम राहावा यासाठी हे लाडू हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो.
घटकद्रव्ये
  • डिंक 200 ग्रॅम
  • खारीक पूड 200 ग्रॅम
  • खोबरे 100 ग्रॅम
  • खसखस 100 ग्रॅम
  • काजू 50 ग्रॅम
  • बदाम 50 ग्रॅम
  • पिस्ता 50 ग्रॅम
  • चारोळी 50 ग्रॅम
  • गूळ 300 ग्रॅम
  • साखर 200 ग्रॅम
  • सुंठ चूर्ण 25 ग्रॅम
  • पिंपळी चूर्ण 25 ग्रॅम
  • जायफळ चूर्ण 6 ग्रॅम (दोन चमचे)
  • केशर चूर्णअर्धा ग्रॅम (पाव चमचा)
  • दूध25-30 मि.लि. (अंदाजे पाव कप)
तळण्यासाठी तूप आवश्‍यकतेप्रमाणे
  1. डिंकाचे फार मोठे खडे असल्यास, हलक्‍या हाताने कुटून डिंक थोडा बारीक करून घ्यावा. डिंकाचे खडे फार मोठे असल्यास तळताना आतमध्ये कच्चट राहतात व फार बारीक असल्यास जळून जातात.
  2. काजू, बदाम, पिस्ते, चारोळी यांची मिक्‍सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
  3. लोखंडाच्या कढईत खसखस भाजून घ्यावी, गार झाल्यावर मिक्‍सरमध्ये वा खलबत्त्यात जाडसर कुटून घ्यावी.
  4. खोबरे किसून मंद आचेवर भाजूून घ्यावे. गार झाल्यावर हातानेच थोडेसे कुस्करून घ्यावे.
  5. लोखंडाच्या कढईत तूप गरम करून थोडा थोडा डिंक तळून घ्यावा व गार झाल्यावर हातानेच जरासा कुस्करून घ्यावा.
  6. त्याच कढईत उरलेल्या तुपावर खारीक पूड भाजून घ्यावी.
  7. मोठ्या परातीत किंवा पातेल्यात तळलेला डिंक, खारीक, खोबरे, काजू-बदाम-चारोळी-पिस्त्याची भरड, खसखस, सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण, जायफळ चूर्ण एकत्र मिसळावे.
  8. जाड बुडाच्या पातेल्यात गूळ, साखर व दूध टाकावे व मंद आचेवर ठेवावे. गूळ विरघळल्यानंतर पाकाला बुडबुडे यायला लागले की आचेवरून खाली उतरवून त्यात केशराची पूड टाकावी व केशर नीट मिसळल्याची खात्री करून घ्यावी.
  9. याप्रमाणे तयार झालेल्या पाकात वरील सर्व मिश्रण हळूहळू टाकून कलथ्याने एकत्र करून, गरम असतानाच लाडू बांधावेत.

जवसाची चटणी
जवस प्रकृतीला उत्तम असतात. जवसाची चटणी करून आहारात समाविष्ट करता येते.

घटकद्रव्ये
जवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे (साधारण 5-2-2-2 प्रमाणात).
जवस, तीळ, शेंगदाणे, किसलेले कोरडे खोबरे व लाल सुक्‍या मिरच्या कढईत वेगवेगळे भाजून घ्यावे. शेंगदाण्याची साले काढून टाकावी. गार झाल्यावर त्यात चवीनुसार मिरची, मीठ, साखर घालून मिक्‍सरमध्ये चटणी बनवून भरून ठेवावी व आवश्‍यकतेनुसार वापरावी.

विडा
नागवेलीच्या पानांचा विडा बनवला जातो. विड्याची पाने उष्ण, पाचक, मुखशुद्धीकर, स्वर सुधारणारी असतात. त्यांचा त्रयोदशगुणी विडा बनवला तर तो पचनास मदत करतो, हिवाळ्यात ऊब देण्यास उत्कृष्ट असतो. चुना, सुपारी, काथ, लवंग, जायपत्री, जायफळ, बदाम, वेलची, कापूर, केशर, कस्तुरी, कंकोळ, ओल्या नारळाचा कीस ही द्रव्ये टाकून बनवलेला त्रयोदशगुणी विडा जेवणानंतर खाण्यास उत्तम असतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Tuesday, December 27, 2011

हिवाळ्यातील ऊब आहार -1


डॉ. श्री बालाजी तांबे
आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्‍ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. हिवाळ्यात शरीरात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा. 

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा होत. यामध्ये अन्नाचा उल्लेख पहिला केला जातो. कारण प्राण टिकून राहण्यासाठी अन्न सर्वांत महत्त्वाचे असते.

न ह्याहारादृते प्राणिनां प्राणाधिष्ठानं किञ्चिदप्युपलभामहे ।
...काश्‍यप खिलस्थान 

आहाराशिवाय प्राणिमात्रांचे प्राण अजिबात स्थिर राहत नाहीत. आहाराची योग्य योजना केली तर जीवनाचा खरा आनंद घेता येतो, सर्व इंद्रिये आपापली कामे प्रसन्नपणे करतात, सर्व धातू संपन्न होतात, बुद्धी, स्मृती, ओज, शक्‍ती वाढतात, तसेच वर्ण उजळतो. याउलट आहारयोजना व्यवस्थित केली नाही, तर अनेक प्रकारची दुःखे, अनारोग्य सहन करावे लागते.

ऋतूनुसार आहार हवा
"आहारयोजना' हा खूप विस्तृत विषय आहे. यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऋतूनुसार आहार घेणे. ऋतू बदलतात म्हणजे हवामानात बदल होतो. बदलत्या हवामानानुसार जीवनशैलीत बदल होणे स्वाभाविक असते.

उदा. - उन्हाळ्यात पंखा, एसीची गरज असते; पावसाळ्यात छत्री, रेनकोट बाहेर येतात; हिवाळ्यात स्वेटर, शाल, मफलर वापरावे लागतात. मात्र, बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे आवश्‍यक असते, ही संकल्पना फारशी पाळली जात नाही. हिवाळ्यात शरीराला ऊबदार ठेवण्यासाठी आहार कसा असावा याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.

आयुर्वेदात प्रत्येक द्रव्याचे "वीर्य' सांगितलेले आहे. वीर्य शब्दाचे संदर्भानुसार अनेक अर्थ होत असले तरी द्रव्याचे वीर्य म्हणजे द्रव्याचा स्वभाव. हा स्वभाव दोन प्रकारचा असू शकतो. उष्ण किंवा थंड. अर्थातच हिवाळ्यात ऊब राखायची असेल तर आहारात उष्ण वीर्याच्या द्रव्यांचा समावेश करायला हवा.

उष्ण वीर्याचे अन्न सेवावे
हिवाळ्यामध्ये बाह्य वातावरण थंड होते, ज्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. म्हणूनच हिवाळ्यात पचन चांगले होते, भूक जास्ती लागते, असा अनुभव येतो. प्रदीप्त झालेल्या अग्नीमुळे शरीर ऊबदार राहण्यास मदत मिळतेच, पण हिवाळ्यात उष्ण स्वभावाचे अन्न सेवन करणे अधिक फायदेशीर असते. उष्ण वीर्याचे अन्न सेवन करण्याचे आणखीही फायदे असतात.

- शरीरातील वात-कफ दोषांचे संतुलन होते.
- आहाराचे पचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते.
- शरीर ऊबदार राहिल्याने हात-पाय आखडणे, गोळा येणे, दुखणे, मुंग्या येणे वगैरे त्रासांना प्रतिबंध होतो.
- अग्नी प्रदीप्त झाल्याने आमद्रव्ये, विषद्रव्ये पचायला मदत मिळते. शरीरातील अभिसरण सुधारले, की ही द्रव्ये शरीराबाहेर निघून जाण्यासही मदत मिळते.

गरम - ताजे अन्न
ऊब देणाऱ्या, अग्नीला मदत करणाऱ्या आहारात उष्ण वीर्याच्या अन्नाचा समावेश होतो, तसेच अन्न गरम व ताजे असताना सेवन करणेही महत्त्वाचे असते.

उष्णं हि भुक्‍तं स्वदते श्‍लेष्माणं च जयत्यपि ।
वातानुलोम्यं कुरुते क्षिप्रमेव च जीर्यते ।।
अन्नाभिलाषं लघुताम्‌ अग्निदीप्तिं च देहिनाम्‌ ।।
...काश्‍यप खिलस्थान 


अन्न गरम असतानाच खाण्याने,
- अधिक रुचकर लागते.
- कफदोषाला जिंकते.
- वाताचे अनुलोमन करते.
- लवकर पचते.
- शरीराला हलकेपणा देते.
- अग्नी प्रदीप्त करते.
आणि अर्थातच शरीराला ऊबदार ठेवण्यास मदत करते.

वास्तविक सर्वच ऋतूंत गरम अन्न खाणेच सयुक्‍तिक असते; पण हिवाळ्यात व पावसाळ्यात आवर्जून ताजे व गरम अन्न खाण्यावर भर द्यायला हवा.


हिवाळ्यात काय खावे?
- ऊब देणारी, उष्ण वीर्याची आहारद्रव्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. धान्यामध्ये बाजरी उष्ण वीर्याची असते, त्यामुळे आहारात बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी यांचा अंतर्भाव करता येतो. मात्र, बाजरीतील उष्णता बाधू नये म्हणून बरोबरीने तूप, लोणी घेणे आवश्‍यक असते.
- नेहमीच्या धान्यांपैकी गहू, तांदूळ, ज्वारी यांचे सेवन करता येतेच; मात्र, हिवाळ्यात साध्या भाताऐवजी मसालेभात, फोडणीची खिचडी यांचे प्रमाण वाढवता येते. गव्हाच्या पिठात तिखट, मीठ, हळद वगैरे मसाल्याचे पदार्थ टाकून ठेपले बनवता येतात. ज्वारी-बाजरीची मिश्र भाकरी रुचकर लागते व अधिक चांगल्या प्रकारे पचते.
- दूध, लोणी, ताक, तूप हे रोजच्या खाण्यात असावेत, असे पदार्थ हिवाळ्यातही खाण्यास उत्तम असतात. हिवाळ्यात ऊब मिळावी म्हणून दुधात सुंठ, केशर वगैरे घालता येते. लोण्यामध्ये काळी मिरी, आले, थोडासा लसूण, कोथिंबीर घातली तर ते अतिशय रुचकर लागते आणि शरीराला स्निग्धता व ऊब दोन्ही देऊ शकते. ताकातही आले-पुदिन्याचा रस टाकला, कधी तरी तूप-जिरे-हिंगाची फोडणी दिली तर हिवाळ्यात ऊब टिकण्यास मदत मिळते.
- कडधान्यांमध्ये मटकी, तूर, उडीद, कुळीथ, वाल हे इतर कडधान्यांच्या मानाने उष्ण असतात. प्रकृती आणि पचनशक्‍तीचा विचार करून यांचाही आहारात समावेश करता येतो.
- ऊब टिकवण्यासाठी, ऊब देण्यासाठी मसाल्याचे पदार्थ उत्तम असतात. हळद, आले, हिंग, लसूण, मोहरी, मिरची, कोथिंबीर, मेथ्या, पुदिना, ओवा, मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी, जायफळ, तीळ वगैरे मासाल्याचे पदार्थ हिवाळ्यात वापरणे उत्तम असते. भाज्या बनवताना या द्रव्यांची व्यवस्थित योजना केली, तर त्या रुचकर होतात, सहज पचतात आणि ऊब देतात.
- भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, परवर, कर्टोली, गाजर, मुळा वगैरे भाज्या उष्ण गुणाच्या असतात; मात्र इतर पथ्याच्या भाज्याही मसाल्याचे पदार्थ टाकून रुचकर बनवल्या तर ऊब टिकविण्यास मदत करतात.
- बदाम, काजू, चारोळी, पिस्ता, अक्रोड हा सुका मेवाही ऊब देण्यास उत्तम असतो. हिवाळ्यामध्ये पचनशक्‍ती उत्तम असताना हे पदार्थ खाताही येतात. प्रकृतीचा विचार करून यांचे प्रमाण ठरवावे लागते.
- ज्वारी-बाजरीच्या भाकरीबरोबर गूळ-तूप खाणे, जेवणात तिळाची चटणी, लसणाची चटणी, ओली हळद-आंबेहळद यांच्यापासून बनविलेले लोणचे यांचा समावेश असणे, तिळाची चिक्की खाणे, सकाळी सुंठ-गूळ-तुपाची गोळी खाणे, रोज डिंकाचा लाडू, मेथीचा लाडू वा अहळिवाचा लाडू खाणे, जेवणानंतर ओवा-तीळ-बाळंतशोपा वगैरे द्रव्यांपासून बनवलेली सुपारी खाणे, भोजनानंतर त्रयोदशगुणी विडा खाणे वगैरे साध्या उपायांनीही हिवाळ्यात ऊब मिळण्यास खूप चांगली मदत मिळते.
- हिवाळ्यात प्यायचे पाणी गरम वा कोमट असणे उत्तम होय. जेवताना गरम पाणी पिण्याने अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत मिळते. तसेच एरवीसुद्धा गरम पाणी पिण्याने ऊब मिळण्यास मदत मिळते.

सेवावी रसायने
ऊब ही शक्‍तिसापेक्ष असते. रक्‍ताभिसरण नीट होत असले, प्राणशक्‍ती पुरेशा प्रमाणात मिळत असली की शरीरावश्‍यक ऊब टिकून राहते. हिवाळ्यात पचनशक्‍ती सुधारत असल्याने शक्‍ती कमावण्याची मोठी संधी निसर्ग देत असतो. म्हणूनच आयुर्वेदाने हिवाळ्यात "रसायन सेवन' सुचवले आहे. च्यवनप्राश, धात्री रसायन, मॅरोसॅन, आत्मप्राश, ब्राह्मरसायन, अमृतप्राश वगैरे उत्तमोत्तम रसायने सेवन करावीत. ही रसायने शास्त्रोक्‍त पद्धतीने व्यवस्थित बनवली असली, त्यात टाकायची केशर, वेलची, कस्तुरी, सोन्या-चांदीचा वर्ख वगैरे द्रव्ये खरी, शुद्ध, उत्तम प्रतीची असली तर त्यामुळे शक्‍ती वाढते, प्राणशक्‍ती व जीवनशक्‍तीची पूर्ती होते, अर्थातच शरीराला आतून ऊब मिळते.






---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Monday, December 12, 2011

ताणतणाव


अश्‍विनी लाटकर, समुपदेशक, पुणे.
या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, असे वाटत असते. मात्र सर्वच ठिकाणी सतत फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो.

"ताणतणाव' हल्लीच्या जगात अगदी लहान मूल ते वयस्क व्यक्ती, प्रत्येकाच्याच आयुष्यात सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द. प्रत्येकाचेच आयुष्य त्याने भरून गेले आहे.

गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, वेगाने बदलत जाणारी जीवनशैली व कुटुंबपद्धती, प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव या सगळ्यांचा वाढत्या ताणतणावामध्ये मोठाच वाटा आहे.

हल्ली ताणतणावाची सुरवात ही मूल लहान असल्यापासून होते. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकांना आपले मूल सर्वगुणसंपन्न असावे, सर्वच क्षेत्रांत यशस्वी असावे, शक्‍य झाल्यास इतरांच्या पुढे असावे, असे वाटत असते. त्यासाठी मूल दोन-तीन वर्षांचे झाले की पालकांचे प्रयत्न सुरू होतात. शाळा, क्‍लास, खेळ, छंद वर्ग वगैरे ठिकाणी त्यांना घातले जाते. या सर्वत्र क्षेत्रांत मुलांना परफेक्‍ट करण्यासाठीची ही धडपड असते, पण या सगळ्यात ज्याच्यासाठी हा सारा खटाटोप केला जातो त्या मुलाच्या मनाचा विचार मात्र राहूनच जातो. अर्थातच या सगळ्यामुळे मूल खरेच परफेक्‍ट किंवा ऑलराऊंडर वगैरे होते का, हा प्रश्‍नच आहे. का त्यातून काही मानसिक समस्याच निर्माण होतात, हा विचार पालकांनीच करायला हवा. यातील सर्वच ठिकाणी सतत फक्त स्पर्धाच असते. मनाला निखळ आनंद मिळेल असे एकही ठिकाण नाही. (अगदी घरसुद्धा!) या सगळ्यामुळे मुलांवरील ताणतणाव लहान वयापासूनच वाढत जातो.

सकाळी उठल्यापासून धावपळ सुरू होते ते रात्री झोपेपर्यंत. संध्याकाळी घरी परत आल्यावरसुद्धा कोणालाच शांत बसायला, बोलायला वेळ नसतो. घरात पाऊल ठेवल्यापासून टीव्ही चालू होतो. तो बघता बघताच होमवर्क, जेवण, खेळ, भांडणे, दप्तर भरणे, तर कधी कधी गप्पा या सर्वच गोष्टी होत असतात. यात अनडिव्हायडेड अटेन्शन कशालाच दिले जात नाही. एवढे करून रात्री 11 पर्यंत कसेबसे झोपले, की पुन्हा पहाटेपासून धावपळ सुरू. झोपण्यापूर्वी शांत बसून एकमेकांशी गप्पा नाहीत, की राजाराणीच्या, परीच्या गोष्टी नाहीत. दिवसभरात काय काय झाले त्या बऱ्या-वाईट अनुभवांचे देणे-घेणे नाही, की भविष्यात काय करायचे आहे, याचा विचार नाही.

आपले अनुभव, भावना दुसऱ्यांबरोबर वाटून घेणे, व्यक्त करणे ही मनुष्यस्वभावाची इतर मूलभूत गरजांप्रमाणेच महत्त्वाची गरज आहे. ती जर योग्य प्रकारे पूर्ण केली गेली नाही तर त्यातून शारीरिक किंवा मानसिक समस्या वा ताण निर्माण होऊ शकतात.

हल्ली बहुतेक पालकांची तक्रार असते, की मुलगा ऐकत नाही, खूप हट्टी झालाय. उलटून बोलतो, सतत लोळून टीव्ही पाहत राहतो, त्यामुळे आम्हाला ताण येतो, पण त्याला त्याचे काहीही वाटत नाही.

पालकांची ही तक्रार वरवर पाहता जरी खरी वाटली, तरी ती तितकीशी खरी नाही. खरे तर मुलांना काही ताणतणाव नसतो म्हणून ती टीव्ही पाहतात हे नेहमीच बरोबर असते असे नाही, तर मुलांना बरेचदा ताणतणाव असतो, त्याच्याशी कसा सामना करायचा, हे त्यांना माहीत नसते. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी, तो घालवण्यासाठी मुले जास्त टीव्ही पाहतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या ताणतणावाचा विसर पडतो. असे असले तरी ताण (डीींशीी) हा प्रत्येक वेळेस वाईटच असतो असे नाही, तर काही वेळेस त्याचे फायदेसुद्धा होतात. उदा.- त्यामुळे आपल्याला समस्या लक्षात येण्यास मदत होते व त्यावर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात किंवा त्यावर मात करण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न केले जातात. ज्याप्रमाणे कोणतेही तंतुवाद्य सुरात वाजण्यासाठी जसा ठराविक ताण आवश्‍यक असतो, तसाच प्रत्येकाचे आयुष्य सुरात चालण्यासाठी थोडासा ताणसुद्धा आवश्‍यक असतो. पण ताण चांगला आहे का वाईट, हे ओळखायचे कसे? त्याची लक्षणे कोणती?

ताणतणावाची असंख्य लक्षणे असू शकतात व प्रत्येक व्यक्तीमध्ये ती वेगळी असतात. कोणाला कोणत्या प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक समस्या उद्‌भवतील हे प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावर व आनुवंशिकतेवर अवलंबून असते. उदा.- परीक्षेचा ताण दोन मुलांवर सारखाच असणार नाही. एखाद्याचे डोके दुखेल, पोट दुखेल तर दुसऱ्याला झोप लागणार नाही, भूक लागणार नाही, तर आणि कोणी भांडेल, चिडचिड करेल.

बऱ्याचदा पालक- शिक्षक या सगळ्याकडे या वयात असे होतेच, असे म्हणून दुर्लक्ष करतात. ही मुलांवरच्या ताणतणावची लक्षणे आहेत. यावर त्यांचा विश्‍वासच बसत नाही. पण जेव्हा समस्येची तीव्रता वाढते त्या वेळेस ती लक्षात येते, पण अजूनसुद्धा मुलांच्या वर्तनसमस्या वाढल्या तरी व्यावसायिक मदत (समुपदेशन) घेण्याचे टाळण्याकडेच जास्त कल दिसून येतो. कोण काय म्हणेल या विचारालाच महत्त्व दिले जाते.

ताणतणावांची लक्षणे
लक्षणांची व्याप्ती व तीव्रता विकासाच्या टप्प्यानुसार वाढते वा कमी होते. अगदी लहान मुलांमध्ये हट्टीपणा, अंगठा चोखणे, नखे खाणे, गादी ओली करणे, उलटी, जुलाब होणे ही लक्षणे दिसून येतात, तर मोठ्या मुलांमध्ये नाडीचे ठोके वाढणे, आम्लपित्त, त्वचाविकार, नैराश्‍य, भीती, एकलकोंडेपणा, विचारांचा गोंधळ, मारामारी, शाळा बुडवणे, खोटे बोलणे, चोरी करणे, व्यसनाधीनता अशी लक्षणे असतात.

कुमार वयातील मुलांमध्ये मुख्य करून जलद शारीरिक बदलांमुळे, वाढीमुळे व हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे मानसिक अस्वस्थता, अवघडलेपणा, बंडखोरी व बेजबाबदार वर्तन जास्त प्रमाणात दिसून येते. ताणतणावाची पातळी या वयात अत्युच्च असते. त्याचा परिणाम एकाग्रतेचा अभाव व अभ्यासात लक्ष न लागणे, अशा गोष्टींवर होतो.

पालक किंवा शिक्षक मुलांना अशा वर्तनाबद्दल ओरडतात किंवा शिक्षा करतात. त्यामुळे लक्षणे कमी झालेली दिसत तर नाहीतच, पण त्यांची तीव्रता मात्र बऱ्याचदा वाढलेलीच दिसून येते. अशा वेळी मुलांना त्या लक्षणांसाठी (उदा.- रडणे, ओरडणे, हट्ट करणे, शाळा बुडवणे वगैरे.) शिक्षा न करता त्यामागचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करणे महत्त्वाचे असते. एकदा ही ताणतणावांची कारणे व लक्षणे लक्षात आली, की त्यावर उपाययोजना करणे खूपच सोपे जाते.

ताणतणावांची कारणे व त्याचे परिणाम - तणावांच्या कारणांचा विचार करताना त्याचे मुख्य दोन प्रकार सांगता येतील.
1) बाह्य लक्षणे - जेव्हा ताणतणावांची कारणे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिकतेशी संबंधित नसून, बाहेरची असतात.
परिस्थिती- घरातील, घराबाहेरची, प्रसारमाध्यमे इ.
पालकांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे. शाळा, परीक्षा, अभ्यास, स्पर्धा वगैरे. रोजचे दमवणारे दैनंदिन वेळापत्रक.
2) अंतर्गत - जेव्हा कारणे बाह्य नसून व्यक्तीच्या शरीराशी, मनाशी संबंधित असतात; ती बऱ्याचदा जन्मजात किंवा आनुवंशिक असतात.
नकारात्मक/ निराशावादी विचार.
आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे अति विश्‍लेषण/ अतिविचार.
स्वतःकडून अवाजवी/ चुकीच्या अपेक्षा.

विचारांमधला ताठरपणा - परिस्थितीशी जुळवून घेता न येणे, दुसऱ्यांचे विचार, वागणे पटवून न घेणे, याव्यतिरिक्त आयुष्यातली अनिश्‍चितता, परिस्थितीचे आकलन, दृष्टिकोन, पालकांशी सुसंवादाचा अभाव, रॅगिंग, व्यसने, प्रेम, लैंगिक आकर्षण, अपयश, मित्रांशी किंवा भावंडांशी भांडण, इतरांशी तुलना, भ्रमनिरास इत्यादी अनेक कारणे मुलांमध्ये ताणतणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. वेळेवरच ही कारणं ओळखून त्यावर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर शारीरिक किंवा मानसिक व्याधी, शाळेतून/ घरातून पळून जाणे, व्यसनाधीनता, आत्महत्या यासारखे गंभीर परिणाम दिसून येतात.

ताणतणावांचे व्यवस्थापन
हल्ली पालकत्व ही एक तारेवरची कसरत झाली आहे. वेगाने बदलत जाणारी जीवनशैली, कुटुंबपद्धती, वाढती महागाई, वाढता खर्च, त्यासाठी आई-वडील, दोघांनी नोकरी करण्याची आवश्‍यकता, वेळेची कमतरता, याच बरोबर मुलांच्या शाळा, अभ्यास, परीक्षा, क्‍लास, स्पर्धा ही एक न संपणारी दमवणारी यादी या सगळ्याचा ताण मुलांबरोबरच पालकांनासुद्धा निश्‍चितच येत असतो. आता पालक स्वतःच जर तणावग्रस्त असतील तर ते मुलांना कसे मदत करू शकतील? त्यामुळे जेव्हा आपण ताणतणावाच्या व्यवस्थापनाविषयी बोलतो त्या वेळेस पालकांच्या तणाव व्यवस्थापनापासून सुरवात करून मगच मुलांच्यासाठी उपाययोजना केल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. खरे तर ताणतणावांवर उपाययोजना करण्यापेक्षा तो न येईल यासाठी खबरदारी घेणेच चांगले.

पालकांसाठी काही सूचना
- खरी, आवाक्‍यातील उद्दिष्टे ठरवा, स्वतःमधील गुण-दोषांची माहिती करून घ्या.
- आयुष्यातले स्वतःचे प्राधान्यक्रम ठरवा.
- कोणत्याही अर्थशून्य किंवा कमी महत्त्वाच्या गोष्टींमुळे त्रास करून घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीबाबत योग्य दृष्टिकोन ठेवावा.
- रोज झोपण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसून आत्मपरीक्षण करा.
- वेळेचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
- वेळ पडेल त्या वेळेस न लाजता व्यावसायिक मदत जरूर घ्या.
- मुलांना वस्तूंपेक्षा वेळ द्या. त्यांना बोलते करा.
- टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करा.

मुलांसाठी सूचना -
- जेव्हा ताण जाणवेल त्या वेळेस कोणाशी तरी बोलावे.
- मित्र, पालक, शिक्षक यांच्याकडे मदत मागायला लाजू नका.
- स्वतःची ध्येये ठरवून त्याच दिशेने वाटचाल करा.
- नकारात्मक विचार टाळा.
- वेळेचे व्यवस्थापन शिका/ करा.
- स्वतःच्या शारीरिक/ मानसिक क्षमतांचा विचार करूनच आपली उद्दिष्टे ठरवा.
- परिस्थितीमध्ये जरुरीप्रमाणे छोटे छोटे बदल करा. परिस्थितीशी / लोकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.
- आहार, विहार, झोप यात योग्य संतुलन राखा.
- कोणतातरी छंद जोपासा.                        

Sunday, October 30, 2011

आरोग्य दृष्टी

डॉ. श्री बालाजी तांबे
दृष्टी म्हणजे नजर. दृष्टी म्हणजे जिच्या योगे पाहिले जाते ती पण दृष्टी. दृष्टी हा शब्द दूरदृष्टी, चौफेर दृष्टी असाही वापरला जातो. यात दृष्टीचा अर्थ लक्ष असणे, जाणीव असणे असा असतो. उत्तम नियोजनासाठी जशी दूरदृष्टीची आवश्‍यकता असते, उत्तम प्रसंगावधानासाठी चौफेर दृष्टीची आवश्‍यकता असते, तसेच आरोग्यासाठी, संपन्न दीर्घायुष्यासाठी "आरोग्य दृष्टी' असायला हवी.

आरोग्य ही आपली हक्काची संपदा आहे हे सर्वांनाच पटेल. बॅंकेतील पैसे किंवा इतर प्रॉपर्टी वृद्धिंगत व्हावी, अक्षय टिकावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो. मात्र ज्याच्या आधारावर, ज्याच्या भरवशावर या सगळ्या गोष्टी करायच्या त्या आरोग्याला बहुतेक वेळा अध्याहृत धरले जाते. दिवसेंदिवस नवनवीन रोगांची नावे कानावर पडत आहेत. असे काही आपल्याला होऊ नये असे वाटत असेल, तर त्यासाठी जीवनात पदोपदी आरोग्य दृष्टी ठेवायला हवी.

आरोग्य दृष्टीतला सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत भाग म्हणजे स्वतःची प्रकृती माहिती करून घेणे. कारण मूळचा पिंड जसा असतो, त्याच्या अनुरूप आहार-आचरण ठेवणे हे आरोग्याच्या रक्षणासाठी अत्यावश्‍यक असते. प्रकृती नुसती माहिती करून घेणे पुरेसे नसते, तर तिचा स्वीकार करून त्यानुसार जीवनशैलीमध्ये बदल करण्याची तयारी असावी लागते. व्यवसायाची निवडसुद्धा प्रकृतीचा विचार करून करावी असे आयुर्वेदात सुचवलेले आहे. सैन्यात भरती होण्यासाठी जशी खांद्यांची रुंदी, उंची, श्‍वसनाची क्षमता वगैरे गोष्टी पाहिल्या जातात, तसेच इतर कोणत्याही कामासाठी आपली प्रकृती, मानसिकता साजेशी आहे की नाही हे पाहणे आवश्‍यक असते.

निसर्गाशी समन्वय ठेवा
आरोग्य दृष्टीचा दुसरा पैलू म्हणजे निसर्गचक्राशी आपल्या जीवनशैलीचा समन्वय असला पाहिजे. उदा. सूर्योदय झाला की निसर्गात चैतन्य येते, याउलट सूर्यास्त झाला की निसर्गही विश्रांती घेतो. तसेच शरीरालाही सूर्यास्तानंतर शांतता, विश्रांती हवी असते, तसे न करता रात्री कामात किंवा इतर काही करण्यात दंग राहायचे आणि सकाळी उशिरापर्यंत झोपून राहायचे किंवा रात्री उशिरा शरीरातील सूर्य म्हणजे अग्नी मंदावला असतानाही पोट भरून जेवायचे हे निसर्गाच्या विरुद्ध असते आणि याचा अर्थातच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

रोजची जागरणे, सतत गाडी-विमानासारख्या अति वेगवान वाहनातून प्रवास, ऋतूमधील बदलांचा विचार न करता किंवा आपण राहतो त्या प्रदेशातील हवामानाचा विचार न करता आपल्या सवयीनुसार किंवा आवडीनुसार आहार-आचरण ठेवणे, शारीरिक व्यायाम, श्रम अजिबात न करणे वगैरे गोष्टी निसर्गाला विसंगत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने सहसा हितावह नसतात.

निसर्गनियमानुसार वय वाढणेही स्वाभाविक असते, पण त्यातही वात-पित्त-कफाचे न्यूनाधिक्‍य असते. उदा. बालवयात कफाचे, तरुण वयात पित्ताचे आणि उतारवयात वाताचे आधिक्‍य असते. हे वात-पित्त-कफ त्या त्या वयात जितके संतुलित राहतील तेवढी त्यांची कामे व्यवस्थित होतात आणि पर्यायाने आरोग्य चांगले राहते. म्हणूनच लहान वयात अभ्यंग, धूपन, व्यायाम हे कफसंतुलन करणारे उपचार करणे आवश्‍यक असते; मध्यम वयात कामाची धडाडी खूप असली तरी वेळेवर खाणे-पिणे, व्यायामाने शरीरातील लवचिकता कायम ठेवणे आवश्‍यक असते तर उतार वयात वात वाढू नये म्हणून अंगाला तेल लावणे, विश्रांती घेणे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे असते.

नैसर्गिक तेवढंच स्वीकारा
आरोग्य दृष्टीचा अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शरीराला जे काही सात्म्य आहे, म्हणजेच शरीर जे सहजपणे स्वीकारू शकते, शरीराला जे सवयीचे व अनुकूल असते, तेच सेवन करणे, पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार निसर्ग आणि शरीर हे दोघेही परस्परांना तुल्यबळ असतात. ज्या गोष्टी निसर्गातून आल्या आहेत, ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत, त्या शरीरात सहजपणे सामावल्या जातात. या उलट कृत्रिम पद्धतीने, रासायनिक प्रक्रिया करून किंवा निसर्गात नैसर्गिकपणे होत नाही अशा प्रक्रिया करून बनविलेले अन्न, औषध आरोग्याच्या दृष्टीने हितकर असेलच असे नाही. उदा. हायब्रीड, जेनेटिक बदल करून बनवलेले अन्न शरीरात गेल्यावर नैसर्गिक अन्नाप्रमाणे स्वीकारले जात नाही किंवा वनस्पतींवर नैसर्गिक प्रक्रिया करून बनविलेल्या औषधाप्रमाणे रासायनिक प्रक्रिया करून बनविलेले औषध प्रभावी ठरत नाही, उलट त्यांचे दुष्परिणाम झालेले दिसतात. थोडक्‍यात अन्न, औषध, शेतीला दिली जाणारी खते, सौंदर्यप्रसाधने किंवा रोजच्या वापरात असणारी साफ-सफाईची द्रव्ये जितकी नैसर्गिक असतील तितके आरोग्य सुखरूप राहू शकते.

आरोग्य दृष्टीचा यानंतरचा महत्त्वाचा पैलू म्हणजे वापरात असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची प्रत चांगली असण्याकडे लक्ष देणे. प्रत ही वीर्यावरून म्हणजे वस्तूच्या गुणवत्तेवर, सक्षमतेवर, संपन्नतेवर ठरत असते. अर्थातच वस्तूची प्रत जितकी चांगली तितके तिचे काम चांगले असते. संपन्न आयुष्यासाठी, निरामय दीर्घायुष्यासाठी केवळ वस्तूच्या संख्येकडे न पाहता, तिच्या संपन्नतेकडे, प्रत उत्तम असणे.याकडे लक्ष द्यावे लागते. गहू, तांदूळ, भाज्या, साखर अशा रोजच्या आहारातील मूलभूत पदार्थ असोत, केशर, वेलचीसारख्या मौल्यवान गोष्टी असतो, अत्तर, काजळ, उटण्यासारखी सौंदर्यप्रसाधने असोत, प्रत्येक वस्तू संपन्नतेच्या निकषावर निवडली तर त्यातून मिळणारे आरोग्यही बावनकशी सोन्यासारखे असेल हे नक्की. या उलट प्रत्येक वेळी तडजोड केली, प्रतीपेक्षा प्रमाणाला प्राधान्य द्यायचे ठरविले तर आयुष्याची प्रतही खालावू शकते.

संपूर्ण आरोग्याच्या आनंदासाठी

आरोग्य हा फक्‍त निरोगी शरीरावर नाही तर मनाच्या सकारात्मकतेवर बुद्धीच्या सर्जनतेवर अवलंबून असते. म्हणूनच आरोग्यदृष्टी ही केवळ शरीरावरच नाही तर मन, बुद्धी, इंद्रिये यांच्या आरोग्यावरही ठेवावी लागते. त्यासाठी अनुशासन, शिस्त यांना प्राधान्य द्यावे लागते. धावपळीच्या जीवनातही मन व बुद्धीच्या संतुलनासाठी स्वास्थ्यसंगीत, ॐक़ार गुंजन, दीर्घश्‍वसन, ध्यान वगैरेंचा समावेश असू द्यावा, बुद्धी-इंद्रियांना प्रेरणा मिळण्यासाठी सृजनतेला वाव द्यावा, त्यांच्या पोषणासाठी ब्रह्मलीन घृतासारखे घृत घ्यावे, पंचेद्रियवर्धन करणाऱ्या नस्यसॅन घृत, श्रुती तेल, सुमुख तेल, अंजन वगैरेंचा वापर करणे वगैरे उपायांचा योजना करावी, म्हणजे संपूर्ण आरोग्याचा आनंद घेता येईल.

स्वच्छता राखा
आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे स्वतःचे पोट भरताना, स्वतःचे जीवनव्यवहार चालविताना, अगदी आरोग्य सांभाळताना देखील निसर्गाचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. ज्या प्रमाणे गावातील प्रत्येकाने आपले घर स्वच्छ करून कचरा घराबाहेर टाकला तर गाव अस्वच्छ राहिल्याने रोगराईला उलट आमंत्रणच मिळेल, त्या प्रमाणे आपल्या गरजांसाठी, सुखासाठी आपण जर निसर्गाला बिघडवत राहिलो तर एक दिवस निसर्गाचा कोप झाल्याशिवाय आणि त्यातून एकाएकी मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रासायनिक पदार्थांपासून बनविलेल्या गोष्टी कमीत कमी वापरणे, प्लॅस्टिकसारख्या विघटन होण्यास अशक्‍य असलेल्या गोष्टींचा वापर टाळणे, निसर्गाची स्वच्छता राखणे हा आरोग्य दृष्टीचा महत्त्वाचा भाग होय. कचऱ्याची नीट नियमाप्रमाणे विल्हेवाट लावणे, प्रवासाला गेले असता त्या ठिकाणी कचरा राहणार नाही याची काळजी घेणे.

थोडक्‍यात, आरोग्याच्या दृष्टीने सतत सजग पाहण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. रोग झाल्यावर त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न करणे भाग असतेच, पण रोग होण्यापूर्वी आरोग्य दृष्ट विकसित झाली असेल तर अबाधित आरोग्य मिळू शकेल.

---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad