Showing posts with label पित्तशमन. Show all posts
Showing posts with label पित्तशमन. Show all posts

Saturday, November 3, 2012

शरदातील पित्तसंतुलन


आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच. 

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य तीन कालविभाग सर्वांना माहिती असतात. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला ऋतू म्हणजे शरद ऋतू. साहजिकच या ऋतूमध्ये एखाद्‌दुसऱ्या सरीचा अपवाद सोडला तर पाऊस जवळजवळ थांबलेला असतो. पावसाळ्यातील काळे ढग जाऊन त्यांची जागा पांढऱ्या ढगांनी घेतलेली असते. दिवसा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे वातावरण चांगलेच तापते, तर रात्री हवेत गारवा जाणवतो. झेंडू, शेवंती वगैरे लाल फुले फुलतात. निसर्गात आणि वातावरणात हे बदल व्हायला लागले, की शरद ऋतू सुरू झाला असे समजता येते.

निसर्गातील प्रत्येक बदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप होतो, त्याचबरोबर पाण्यात वाढलेल्या आम्लतेने पित्तदोष साठायला सुरवात झालेली असते. पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्याऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली, की त्याचा परिणाम म्हणून अगोदर साठलेले पित्त अजूनच वाढते. पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताचा प्रकोप झाला की पित्ताचे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून शरद ऋतूची सुरवात झाली, की लगेच पित्त संतुलनासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर असते.

पित्त खवळले तर... 
  • शरद ऋतूमध्ये पित्त वाढल्याने होऊ शकणारे त्रास पुढीलप्रमाणे सांगता येतात-
  • हातापायांच्या तळव्यांची आग होणे.
  • डोळे लाल होणे, जळजळणे, पापणीवर रांजणवाडी येणे.
  • शरीर स्पर्शाला गरम लागणे, ताप आल्यासारखे वाटणे.
  • अंगावर गळू येणे, त्यात पाणी किंवा पू होणे.
  • डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे.
  • त्वचेवर लालसर पुरळ उठणे.
  • मळमळणे, डोके दुखणे, उलटी होऊन पित्त पडून जाणे.
  • घशाशी आंबट येणे.
  • तोंड येणे.
  • नाकातून रक्‍त येणे.
  • लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे.
  • फार तहान लागणे, पाणी प्यायले तरी समाधान न होणे.

अर्थात व्यक्‍तीची प्रकृती, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराची प्रवृत्ती यासारख्या अनेक मुद्‌द्‌यांवरून यापैकी नेमका कोणता त्रास होईल व त्याची तीव्रता कशी असेल हे ठरत असते. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरद ऋतू सुरू होतो आहे याचे भान ठेवले, खाण्यापिण्यात, वागण्यात आवश्‍यक ते बदल केले तर हे त्रास टाळताही येऊ शकतात.

ऐसा घ्यावा आहार 
पित्त संतुलनासाठी शरद ऋतूत पुढीलप्रमाणे आहारयोजना करायला सांगितली आहे-
  • तत्रान्नपानं मधुरं लघु शीतं सतिक्‍तकम्‌ ।
  • पित्तप्रशमनं सेव्यं मात्रया सुप्रकांक्षितैः ।। ...चरक सूत्रस्थान
  • खाण्यापिण्यात मधुर रस म्हणजेच गोड चव मुख्य असावी.
  • पचण्यास हलके पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावेत.
  • आहारात काही प्रमाणात कडू चवीच्या पदार्थांचाही समावेश असावा.
  • थंड स्वभावाचे, पित्तशमन करणारे अन्न सेवन करावे.

भारतीय उत्सव, परंपरा आणि आरोग्य यांचा कायम संबंध असतोच. शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी खारीक, बदाम, खसखस, साखर वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्त संतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच.

शरद ऋतूत दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम होत, कारण हे सर्व पित्तशमनासाठी उत्तम असतात. मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहाळेपाक हे गोड पदार्थही शरदामध्ये सेवन करण्यास योग्य असतात. कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते. साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे, मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही शरद ऋतूत पथ्यकर असते.

उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा या ऋतूत पित्त संतुलनास मदत करते.

भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे; भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा शरदात पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते.

पित्तदोषाला प्रतिबंध 
शरदामध्ये पित्ताचा प्रकोप होतो हे आपण सुरवातीला पाहिले. कोणत्याही दोषाचा प्रकोप होतो तेव्हा तो दोष वाढलेला तर असतोच, पण स्वतःच्या स्थानातून बाहेर पडलेला असतो. म्हणूनच या अवस्थेत त्याला बाहेर काढून टाकणे सहज शक्‍य असते. साहजिकच शरद ऋतूमध्ये विरेचन करून प्रकुपित पित्तदोष शरीराबाहेर काढून टाकला, तर पुढे वर्षभर पित्तासंबंधी कोणताही विकार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात विरेचन म्हणजे नुसते जुलाबाचे औषध घेणे नव्हे, तर शास्त्रोक्‍त पद्धतीने स्वेदन, स्नेहन वगैरे सर्व पूर्वतयारी करून पित्तदोष लहान आतड्यापर्यंत आणून विरेचनाद्वारा शरीराबाहेर काढून टाकणे हे खरे विरेचन होय. प्रत्येक शरदात जर असे शास्त्रोक्‍त विरेचन करून घेतले तर पचन नीट राहणे, वजन नियंत्रणात राहणे, पर्यायाने कोलेस्टेरॉल, रक्‍तदाब, मधुमेह, हृद्‍रोग वगैरे सर्वच अवघड रोगांना प्रतिबंध करणे शक्‍य असते.

शरदामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पादाभ्यंग करणेसुद्धा अतिशय उपयुक्‍त असते. शतावरी कल्प, अविपत्तीकर चूर्ण, पित्तशांती गोळ्या वगैरे पित्तशामक रसायने, औषधे या ऋतूत घेणे; जागरणे, उन्हात जाणे टाळणे; धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे यासारखी काळजी घेतली तर शरदात पित्ताचा त्रास सहन करावा लागणार नाही, उलट शरदातील चांदण्याचा आनंद घेता येईल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

चंद्राचा अमृतरस दुधात!


शुद्ध दुधाचे माहात्म्य जाणून घ्या. केवळ कोजागरीलाच नव्हे, तर रोजच पित्त शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले आहे. शरद ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल, हे पाहणे इष्ट असते. सर्जनप्रक्रियेचे चक्र निरंतर सुरू राहावे, या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा स्वीकार केलेले दूध सेवन केले जाते. सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते. 

शरद ऋतूचे आगमन झाले, पावसाळा संपला. पहिल्या पावसाचे पहिले थेंब मातीवर पडल्यावर येणारा सुवास प्रत्येक प्राणिमात्रास मोहित करतो. हा सुवास कशामुळे येतो व तो पसरतो कसा? उन्हाळ्याने पृथ्वीच्या मातीला भाजून काढलेले असते. गरम तव्यावर पाणी पडल्यास त्याचा सुंदर आवाज होऊन वाफ होऊन उडून जाते, तसेच पृथ्वीच्या पोटात साठवलेल्या उष्णतेमुळे पहिल्या पावसाच्या पाण्याची वाफ होते व या वाफेबरोबर भूमितत्त्वाचा वास सगळीकडे पसरतो व सर्व जण मोहित होतात.

पावसाळ्यामध्ये मनुष्याच्या शरीरात साठलेला पित्तदोष बाहेर ऊन पडल्यावर अशाच तऱ्हेने उफाळून येतो. शरीरातील पित्त काढून टाकण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेला विरेचन विधी तसा वर्षभर करता येत असला तरी शरदात विरेचन विधी केल्यास शरीरात अनायासे प्रकुपित झालेले पित्त बाहेर टाकायला मदत होते. शरीरात झालेला अग्नीचा प्रताप म्हणजे पित्तदोष असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संपूर्ण जीवन माणसाच्या नात्यातील उष्णतेच्या उबेवर, कर्तृत्वशक्‍तीसाठी लागणाऱ्या अग्नीच्या शक्‍तीवर, शरीराचे व्यवहार नीट चालण्यासाठी हॉर्मोन्सच्या अग्नीवर अवलंबून असते. अग्नीला जीवनात एकूणच अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो अग्नी संतुलित राहावा व पित्तदोष वाढू नये ही अपेक्षा असते, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे रोग किंवा शारीरिक, मानसिक त्रास पित्तामुळेच होत राहतात. त्वचा लाल होणे, त्यावर बारीक पुटकुळ्या येणे, गांधी येणे, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, आंबट-कडू उलट्या होणे, छोट्याशा कारणाने राग येणे, राग मस्तकात जाणे, असे अनेक त्रास पित्तामुळे होत राहतात.

शक्तिपरिवर्तनासाठी... 
पित्तदोष वाढून त्रास होऊ नये यासाठी अनेक नियम सांगितलेले असतात. अग्नी हा वायूचा मित्र आहे. तेव्हा पित्तदोषाबरोबरच वातदोषही वाढतो व पावसाळ्यातील वातदोष पित्ताला उफाळण्यास मदत करत असावा. म्हणून वात-पित्ताची जोडी सांभाळावीच लागते. त्यासाठी आहार-विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. निसर्गातील ऋतुबदल प्राणिमात्रांच्या शरीरातही परिणाम घडवतात. त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भारतीय परंपरेत सणावारांची योजना केलेली आहे.

ऋग्वेदातील पुरुषसूक्‍तातील 16 ऋचांपैकी सहाव्या ऋचेत म्हटले आहे-
यत्‌ पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत । 
वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः ।।6।। 

शरीराची व एकूणच आरोग्याची काळजी घेणारी व देवत्व धारण करणारी केंद्रे अन्नाचे ऊर्ध्वगमन करून शक्‍ती व जाणिवेत रूपांतर करण्यासाठी होणाऱ्या यज्ञाला वातावरणातील बदल जबाबदार असतात, असे या ऋचेत सुचविलेले आहे. वसंत ऋतू एक प्रकारे या सर्व क्रियेचे नियमन करतो व आज्य म्हणून मदत करतो; ग्रीष्म ऋतू अग्नी पेटविण्यासाठी व अग्नी प्रकट करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचे काम करतो व त्यातून शरद ऋतूत अन्न तयार होते, जे आहुती म्हणून यज्ञात द्यावे लागते. मनुष्याच्या जीवनातील सर्व स्थित्यंतरे या यज्ञावरच म्हणजे या शक्‍तिपरिवर्तनाच्या क्रियेवर चालतात. त्यासाठी आवश्‍यक असते अन्न. "अन्नाद्‌ भवन्ति भूतानि' म्हणजे सर्व प्राणिमात्र अन्नानेच अस्तित्वात येतात, अन्नानेच वाढतात, अन्नानेच त्यांचा उत्कर्ष होतो, असे म्हटलेले आहे. असे अन्न शरद ऋतूत शरीररूपी यज्ञात आहुतीरूपाने व्यवस्थित दिले गेले तर पुढे वर्षभर ताकद व स्फूर्तीचा लाभ होतो. पण या ऋतूत प्रकुपित झालेला पित्तरूपी अग्नी सगळे अन्न जाळून टाकणार नाही, पण केवळ पचनासाठी मदत करेल हे पाहणे इष्ट असते. म्हणून शरद ऋतूत प्रथम येणाऱ्या नवरात्रोत्सवात शक्‍तीची उपासना करून शक्‍तीला एका विशिष्ट मार्गाने आशीर्वादाच्या मर्यादेत आणून नंतर भौतिक पातळीवर शरद पौर्णिमेच्या दिवशी एक खास उत्सव केला जातो.

सर्जनाची प्रक्रिया जेथून सुरू झाली ते लक्षात राहावे या हेतूने ज्येष्ठ अपत्याला मान दिला जातो. नंतर हे चक्र सतत चालू राहावे या हेतूने शरद पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणाऱ्या अमृताचा दुधामध्ये स्वीकार करून ते दूध सेवन करावे आणि सर्वांनी निसर्गाबरोबर आनंद साजरा करावा, या हेतूने कोजागरी साजरी केली जाते. आपल्या शरीरात होणारे बदल बाहेरील निसर्गात होणाऱ्या बदलांना समांतर राहिले तर आयुष्य व्यवस्थित राहते, अन्यथा ऋतुमानातील प्रत्येक बदल प्रकृती अस्वास्थ्य उत्पन्न करू शकतो.

पित्त शमवणारी कोजागरी 
शरीरात साठलेले पित्त शरद पौर्णिमेला किंवा कोजागरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता दूध पिऊन शांत व्हावे ही झाली सुरवात; परंतु संपूर्ण शरद ऋतूत किंवा एरवीही वाढलेल्या पित्ताचे शमन करण्यासाठी पाव कप थंड दूध थोडी साखर घालून घेण्यास आयुर्वेदाने सुचविलेले असते. शरीरातील पित्त अशा प्रकारे संतुलित राहिल्यानंतर वर्षभर शरीराला ताकद मिळू शकेल, असे अन्न दीपावलीच्या निमित्ताने प्रत्येकाने खावे, अशी योजना असते. ही सर्व उत्सवांची योजना पाहिल्यानंतर भारतीय परंपरा व आयुर्वेद एकमेकांत हात घालून कसे जातात व एकूण मनुष्यमात्राचे जीवन सुखी कसे करतात, हे लक्षात येईल.

प्रत्येकाने दूध अवश्‍य प्यावे, पण ते होमोजिनाइज केलेले नसावे. शुद्ध ताजे दूध मिळाले तर उत्तम, अन्यथा पाश्‍चराइज केलेले दूध चालू शकते; पण ते उकळण्याच्या बिंदूपर्यंत किंवा साय धरून फुगा येईल इथपर्यंत एकदा तापवलेले असावे. ज्या दुधात किमान पाच-सात प्रतिशत स्निग्धांश आहे असे दूध अमृतासमान असते व ते शरीराला कायम उपयोगी पडू शकते. दूध हे रोगहारक आहे. दुधाचा सत्त्वांश म्हणजे तूप. पारंपरिक व आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले तूप अमृतासमान असते व ते आरोग्यासाठी अप्रतिम असते, हे लक्षात ठेवून दीपावलीच्या शुभमुहूर्तावर तुपाचा उपयोग संपूर्ण स्वयंपाकासाठी करावा. योग्य प्रकारे बनविलेले तूप सेवन केले असता शरीरातील अतिरिक्‍त चरबी तर घटतेच, पण शरीरात साठलेले इतर दोष शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते. अमृताने जसे आयुष्य वाढते तसे तुपामुळे शरीरातील दोष दूर झाल्यानेही आयुष्य वाढते.

या कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनाच या अमृताचा लाभ व्हावा व आता तरी शुद्ध दुधाचे माहात्म्य ओळखून पुन्हा एकदा भारतवर्षात शुद्ध दुधाचे पर्व सुरू होईल हा विश्‍वास! 

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

Wednesday, November 23, 2011

कथा च्यवनप्राशाची

डॉ. श्री बालाजी तांबे
आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

श्रीखंड हा पदार्थ पक्वान्न म्हणून सर्वांच्या परिचयाचा असतो. सणावारी किंवा विशेष प्रसंगी काही तरी गोड धोड व्हावे या हेतूने पक्वान्नाची योजना केलेली असते. मधुर रसाचा म्हणजे गोड स्वादाचा ताकदीशी संबंध असतो. तसेच मधुर रसामुळे थोडीशी कफवृद्धी होते व झोप निवांत लागू शकते. श्रीखंड आंबटगोड असल्याने ते खाताना बरे वाटले तरी काही प्रकृतीच्या लोकांना त्याचा त्रासही होऊ शकतो. श्रीखंडाला आंब्याच्या रसाचा स्वाद लाव, चॉकलेटचा स्वाद लाव अशा तऱ्हेने मूळ श्रीखंड राहते बाजूला व मनाला बऱ्या वाटणाऱ्या म्हणजे करमणूक करणाऱ्या इतर गोष्टी वाढू लागतात. तसेही भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाने सांगितलेल्या श्रीखंड ह्या पक्वान्नाची कृती अशी सांगितली की ज्यामुळे कुठलाही त्रास न होता प्रतिकारशक्‍ती वाढावी, वीर्य वाढावे आणि त्याचा पक्वान्न म्हणूनही आनंद घेता यावा.

उद्या आम्रच्यवनप्राश कोणी तयार केला तर त्याचे आश्‍चर्य वाटणार नाही. कारण सध्या आयुर्वेदाच्या पाठानुसार असलेला मूळ च्यवनप्राश बाजूला राहून एक फॅशन म्हणून व ताकद येणाऱ्या आशेवर जगण्यासाठी च्यवनप्राश नावाचा एक जणू साधाच जॅम खाण्याची पद्धत रूढ होत आहे. आंबा आवडणाऱ्यांनी आंब्याच्या आशेने च्यवनप्राश खावा अशी कल्पना असेल तर मूळ कथेला भलतीच विकृती येऊन कथा निरुपयोगी ठरू शकते. मुख्य म्हणजे च्यवनप्राश आयुर्वेदाच्या पद्धतीने बनविलेला असावा, नंतर त्याला सुगंध वगैरे देणे हे दुय्यम.

च्यवन ऋषींनी अगदी म्हातारपण आल्यानंतर म्हणजे वृद्धत्वाची सर्व लक्षणे दिसू लागल्यानंतर, बरोबरीने मेरुदंड वाकून डोके जमिनीकडे जायला लागल्यानंतर संतानप्राप्तीची अपेक्षा केली. म्हणून प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी हा आवळ्याचा च्यवनप्राश बनवून त्यांना दिला व त्यानंतर त्यांचे वयस्थापन झाले म्हणजे त्यांना तारुण्य परत मिळाले, पाठीच्या मणक्‍यांना ताकद मिळाली, वीर्यवृद्धी झाली आणि उशिरा सुरू केलेला संसार साधता आला आणि ते निसर्गचक्राला गती देण्यास समर्थ झाले.

आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूंचा वास असतो म्हणून आवळ्याच्या झाडाचे आणि श्री विष्णूंचे पूजन व आवळीच्या सावलीत भोजन सांगितलेले असते. आवळ्याच्या झाडाच्या आसपास असणाऱ्या वातावरणात प्रतिकारशक्‍ती वाढवून चेतासंस्थेसाठी फायदा होईल असे वायू व शक्‍ती असणार म्हणूनच ह्या परंपरा भारतीयांनी स्वीकारल्या.

आवळा चोचून साखरेच्या पाकात टाकून केलेला मोरावळा हा अवलेह सर्वांच्या परिचयाचा असतो. आवळा, आवळ्याचा रस, मोरावळा ही सर्व रसायनेच आहेत. म्हणूनच आवळा, हिरडा, बेहडा यांच्यापासून बनविलेला त्रिफळा हे सुद्धा एक रसायनच आहे. हिरडा हे स्वतंत्ररीत्याही एक रसायन आहेच.

शिजवलेले आवळे, साखरेचा पाक व वेगवेगळ्या वनस्पतींची चूर्ण, घन वगैरे गोष्टींचे मिश्रण म्हणजे च्यवनप्राश नव्हे. आवळा कमी पडतो म्हणून आवळ्याच्या ऐवजी भोपळा टाकून बनविलेल्या च्यवनप्राशबद्दल तर काही बोलायलाच नको. च्यवनप्राश बनविताना वात-पित्त-कफ ह्यांचे संतुलन करणाऱ्या तसेच सप्तधातूंना संतुलित करून पुष्ट करणाऱ्या वनस्पती तसेच रक्‍तशुद्धीसाठी व एकूणच शरीराची प्रतिकारशक्‍ती वाढावी, वीर्यवर्धन व्हावे ह्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींची योजना करून त्यांचा काढा बनविणे अभिप्रेत असते. काढा केल्याने वनस्पतींमध्ये असलेली द्रव्ये अति सूक्ष्म कणात (नॅनो) रूपांतरित होतात. काढा होत असताना त्यात आवळे शिजवले जातात त्यामुळे आवळ्यांवर वनस्पतींचा संस्कार व्हायला सुरुवात होते. शिजलेल्या आवळ्यांमधील बिया व रेषा काढून मिळालेला गर तुपावर लालसर परतून घेतला जातो, नंतर तेलावर परतला जातो. तयार झालेला काढा गाळून घेऊन वनस्पती टाकून दिल्या जातात व उरलेला काढा घट्ट केला जातो. साखरेच्या पाकात काढा व तेला-तुपावर परतलेला गर टाकून मिश्रण परत शिजविले जाते. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात मध, सुगंधी द्रव्ये मिसळली जातात. ह्या सुगंधी द्रव्यांच्या औषधी गुणधर्माचा फायदा होतोच पण मन प्रसन्न करण्यासाठीही उपयोग होतो. हा झाला आयुर्वेदात सांगितलेल्या पाठानुसार बनविलेला च्यवनप्राश.

ताज्या आवळ्यांऐवजी वाळलेले आवळे म्हणजे आवळकाठी, इतर वनस्पती एकत्र शिजवून त्यात साखर टाकून केलेल्या पदार्थाला च्यवनप्राश असे म्हणता येणार नाही. अश्‍विनीकुमारांनी च्यवनऋषींसाठी केलेला प्राश तो खरा च्यवनप्राश. तो बनविण्याची पद्धत बदलली, संस्कार करण्याची परंपरा बदलली तर बनलेल्या पदार्थाला च्यवनप्राश म्हणता येत नाही. शिवाय च्यवनप्राश बनविताना त्यातील काही महाग वनस्पती वापरल्याच नाही तरी त्याला च्यवनप्राश म्हणता येत नाही, त्याचा उपयोग पोळी-भाकरीबरोबर जॅम म्हणून खाण्यासाठी होऊ शकतो.

च्यवनप्राश प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी मानवजातीला दिलेला प्रसाद आहे. सर्वसामान्यांना सर्वात सोपे रसायन कायम सेवन करता यावे आणि आजारपण दूर ठेवता यावे, तसेच शारीरिक ताकद चांगली राहावी यासाठी च्यवनप्राशची योजना करावी असे सांगितलेले आहे.

प्रत्येकाने जर आवळ्याच्या ऋतूमध्ये आवळे घरी आणून च्यवनप्राश बनविण्याचा प्रयत्न केला तर वर्षभर घरात ठेवून प्रत्येकाला आपण स्वतः बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्याचे समाधान मिळेल. यासाठी आवश्‍यक असलेल्या वनस्पती आणताना मात्र माहितगार व्यक्‍ती बरोबर असावी कारण वनस्पती बरोबर आहेत का शिवाय त्या वीर्यवान आहेत का वगैरे गोष्टी पारखून घेता येतील. च्यवनप्राश बनविताना दशमूळांचे महत्त्व असते. बाजारात मिळणाऱ्या दशमूळ भरड वा चूर्ण ह्या पदार्थात सर्व घटक आहेत का वा सर्व घटक योग्य प्रमाणात घेतलेले आहेत का हे कळायला काही मार्ग नसतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश सर्व लहान-मोठ्यांनी व सर्व ऋतूत सेवन करून वर्षभर सुखी तर व्हावेच व बरोबरीने वयस्थापन करून तारुण्य टिकवावे आणि जीवनाचा आनंद मिळत राहील. अशी ही च्यवनप्राशाची कथा.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

च्यवनप्राश

डॉ. श्री बालाजी तांबे

च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते. च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

चरकसंहितेमध्ये आवळ्यापासून बनविलेली निरनिराळी रसायने सांगताना सुरुवातीला सांगितलेले आहे,

करत्रचितानां यथोक्‍तगुणानाम्‌ आमलकानां उद्‌धृनास्थ्नां
शुष्कचूर्णितानां पुनर्मार्थे फाल्गुने वा मासे ।
...चरक चिकित्सास्थान


कार्तिक महिन्याच्या शेवटापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत जेव्हा आवळा आपल्या रस, वीर्याने परिपूर्ण झालेला असतो, तेव्हा झाडावरून हाताने तोडून गोळा करावा.

याठिकाणी लक्षात घ्यायची मुख्य गोष्ट म्हणजे झाडावर उत्तम पोसला गेलेला, रस-वीर्याने परिपूर्ण झालेला आवळाच औषधात वापरणे अपेक्षित असते. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच झाडावरून गळून पडलेले आवळे वापरणे योग्य नाही. याशिवाय उत्तम कसदार जमिनीमध्ये तयार झालेला, गंध, रूप व चव उत्तम असलेला, पुरेसा रस असलेला आवळाच रसायन म्हणून वापरण्यास योग्य असतो, असेही ग्रंथकार सांगतात.

च्यवनप्राश तयार करताना पूर्ण तयार झालेला व रसरशीत आवळा वापरावा असे सांगितलेले असते, आवळ्याचे चूर्ण करायचे असले तर ताज्या आवळ्यातून बी काढून मग वाळवून चूर्ण करावे असे सांगितलेले असते.

आवळ्याच्या दोन जाती असतात, मोठा आवळा व रान आवळा. मोठा आवळा चवीला आंबट, गोड, रसरशीत असतो व औषधात वापरला जातो. रान आवळे मात्र आकाराने लहान असून चवीला तुरट, कडवट व कोरडे असतात. हे आवळे औषधासाठी वापरणे योग्य नव्हे. रायआवळा म्हणून अतिशय आंबट छोटे फळ मिळते पण नावात साधर्म्य असले तरी त्याचा रसायन आवळ्याशी काही संबंध नसतो.

आयुर्वेदात आमलकी, धात्री, वगैरे नावांनी ओळखला जाणारा आवळा हे एक सुलभतेने उपलब्ध असणारे उत्कृष्ट रसायनद्रव्य आहे.

वृष्यं रसायनं रुच्यं त्रिदोषघ्नं विशेषतः ।
वमनप्रमेहशोफपित्तास्र श्रमविबन्धाध्मान विष्टम्भघ्नम्‌ ।।
...धन्वंतरी निघण्टु


आवळा शुक्रधातूला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण असतो, रुची वाढविणारा असतो; त्रिदोषांचे संतुलन करण्यास समर्थ असतो, विशेषतः पित्तदोषाचे शमन करतो; ताप, दाह, उलटी, प्रमेह, शोथ, रक्‍तपित्त, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी वगैरेंसाठी औषध म्हणून उपयुक्‍त असतो. "इदं वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌' असेही चरकसंहितेमध्ये म्हटलेले आहे. वय वाढले तरी त्यामुळे होणारी शरीराची झीज कमीत कमी प्रमाणात व्हावी किंवा तारुण्य टिकविणारे द्रव्य म्हणजे वयःस्थापन द्रव्य होय. आवळा हा नुसते वयःस्थापन करतो असे नाही तर तो अशा प्रकारच्या द्रव्यात श्रेष्ठ, सर्वोत्तम समजला जातो, यावरूनच आवळ्याची महती लक्षात येते.

म्हणूनच आवळा असंख्य रसायनांमध्ये प्रयुक्‍त केलेला आहे. च्यवनप्राश या प्रसिद्ध रसायनात आवळा हे मुख्य द्रव्य असते हे बहुतेक जणांना माहिती असते. आयुर्वेदाच्या संहितांमध्ये आमलकायस, ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अशी अनेक रसायने आहेत की जी मुख्यत्वे आवळ्यापासून तयार केलेली असतात. चरक, शारंगधर बहुतेक संहितांमध्ये च्यवनप्राश अवलेह वर्णन केलेला आहे. च्यवनप्राश प्रभावी होण्यासाठी त्यात वापरलेली द्रव्ये तर उत्तम प्रतीची असावी लागतातच व बरोबरीने च्यवनप्राश बनविण्याची पद्धतही शास्त्रोक्‍त असावी लागते. च्यवनप्राश अतिशय प्रसिद्ध असल्याने आजकाल अनेक जण तो बनवितात, पण त्यासाठी ग्रंथोक्‍त योग्य पद्धत माहीत असणे व त्या पद्धतीने च्यवनप्राश बनविण्याचा अनुभव गाठीशी असणे आवश्‍यक आहे.

च्यवनप्राश बनविण्याची कृती
1. रसरशीत ताजे आवळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवावे व नंतर रात्रभर पाण्यात भिजत घालावेत (पाण्यात थोडेसे मीठ घालावे).
2. सूचीतील 1 ते 33 द्रव्यांचे बारीक तुकडे करून रात्रभर पाण्यात भिजत घालावे.
3. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व आवळे पाण्यातून काढून पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवावेत. सर्व आवळे सुती कापडात बांधून पोटली तयार करावी. भिजलेल्या सर्व वनस्पती पाण्यात कुस्करून घ्याव्यात.
4. साधारण 20 लिटर पाणी घेऊन या सर्व वनस्पती त्यात घालून काढा बनविण्यासाठी मंद आचेवर ठेवणे. यावेळी आवळ्यांची पोटली अधांतरी लटकत ठेवावी.
5. आवळे शिजल्यावर पोटली बाहेर काढून घ्यावी.
6. एकीकडे मंद आचेवर काढा उकळणे सुरू ठेवावे.
7. शिजलेल्या आवळ्यांमधून बिया काढून टाकाव्या.
8. आवळ्याच्या फोडी 40 मेशच्या स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवर अथवा सुती कपड्यावर घासून आवळ्याच्या गरातील धागे काढून टाकून बी-विरहित व धागेविरहित गर जमा करावा. या गरालाच मावा म्हणतात.
9. योग्य आकाराच्या जाड बुडाच्या स्टेनलेस स्टीलच्या किंवा कल्हई असलेल्या पातेल्यात तेल व तुपावर मंद आचेवर पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत मावा परतावा. यावेळी मावा करपणार नाही वा इकडे तिकडे उडणार नाही अशी काळजी घेणे आवश्‍यक असते.
10. एका बाजूला काढा साधारण एक चतुर्थांश होईपर्यंत उकळावा.
11. तयार झालेला काढा कापडातून गाळून घ्यावा व काढ्याची द्रव्ये बाजूला टाकून द्यावी.
12. गाळलेला काढा साधारण घट्ट होईपर्यंत उकळवत ठेवावा.
13. साखरेचा पाक करून घ्यावा.
14. साखरेचा पाक, घट्ट केलेला काढा व आवळ्याचा परतलेला मावा एकत्र करून हे सर्व मिश्रण मंद आचेवर ठेवून चाटण-अवलेह होईपर्यंत ठेवावा. यावेळी अवलेह करपणार नाही याकडे लक्ष ठेवावे लागते.
15. जवळ जवळ अवलेह तयार होत आला आहे असे वाटले की प्रक्षेप द्रव्ये घालावीत व सर्व मिश्रण एकजीव करावे.
16. अवलेह साधारण गार झाल्यावर त्यात मध घालून नीट एकत्र करावे.
17. च्यवनप्राशची गुणवत्ता व प्रभाव वाढविण्यासाठी सोन्याचा वर्ख, चांदीचा वर्ख वसंतमालिनी, मकरध्वज वगैरे द्रव्ये मधात मिसळून टाकता येतात.
18. तयार झालेला च्यवनप्राश योग्य आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवावा व आवश्‍यकतेप्रमाणे वर्षभर वापरावा.

सूचना
आवळे आम्ल रसाचे असल्यामुळे च्यवनप्राश बनविण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत ऍल्युमिनियम वा हिंदालियमची भांडी, चमचे, झाकण्या वापरू नये.
अशा प्रकारे तयार केलेला च्यवनप्राश दीर्घकाळ टिकू शकतो व रस या गुणांनी परिपूर्ण असतो. च्यवनप्राशची उपयुक्‍तता आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये याप्रकारे सांगितलेली आहे, मेधा, स्मृती, आकलनशक्‍ती चांगली राहते; कांती, वर्ण, त्वचा उजळते, तेजस्विता येते; मन प्रसन्न राहते; हृद्रोग, खोकला, दमा, तृष्णा, वातरक्‍त, उरोग्रह, शुक्रदोष, मूत्रदोष, विविध वात-पित्त विकारांवर च्यवनप्राश उपयुक्‍त असतो. रसायन म्हणून सेवन केल्यास मनुष्य अकाली वृद्धत्वापासून तसेच सर्व रोगांपासून दूर राहू शकतो.




---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

Saturday, November 12, 2011

आवळा

डॉ. श्री बालाजी तांबे


भारतीय संस्कृतीत वृक्ष-वनस्पतींना अतिशय मानाचे स्थान दिलेले आढळते. वृक्षांचे संवर्धन, पालन-पोषण, इतकेच नाही, तर त्यांचे पूजन करण्याचीही पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. तुळशीला पाणी घालणे, तुळशीची पूजा हे तर दैनंदिन कर्मातील एक कर्म समजले जाते, तसेच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमेच्या काळात आवळ्याच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यावर आवळ्याचा औषधासाठी वापर करण्यास प्रारंभ करायचा असतो.

वाळवलेल्या आवळ्यांचाही औषधात वापर करता येतो. मात्र च्यवनप्राशसारखे रसायन बनवताना किंवा ज्या ठिकाणी आवळ्याचा रस वापरायला सांगितला आहे अशा ठिकाणी ताजे आवळेच वापरायचे असतात. म्हणूनच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांमध्ये आयुर्वेदिक फार्मसीत आवळा प्रमुख घटक असणारी औषधे बनवून ठेवावी लागतात. आवळकाठी म्हणजे वाळवून ठेवलेले आवळे. मात्र झाडावरून आपोआप गळून पडलेले कोवळे, रस न धरलेले आवळे वाळवून आवळकाठी तयार केलेली असेल तर तिचा गुण येत नाही. म्हणून वर्षभर लागणारी आवळकाठीसुद्धा या चार महिन्यांत तयार करून ठेवणे चांगले असते.

आवळा हा औषधात मोठ्या प्रमाणावर वापरला जातोच, पण तो स्वयंपाकातही महत्त्वाचा असतो. "अम्लफलेषु श्रेयम्‌' म्हणजे सर्व आंबट फळांमध्ये आवळा श्रेष्ठ सांगितला असल्याने चटणी, लोणचे, सुपारी करण्यासाठी आवळ्यासारखे दुसरे उत्तम फळ नाही. मोरावळा तर सर्वांच्याच परिचयाचा असतो.

औषधात आवळ्याचे फळ, पाने आणि बिया वापरल्या जातात. आवळा पोटात घेतला जातो, तसेच शरीराला बाहेरून लावण्यासाठीसुद्धा वापरला जातो.

अम्लं समधुरं तिक्‍तं कषायं कटुकं सरम्‌ ।
चक्षुष्यं सर्वदोषघ्नं वफष्यमामलकीफलम्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान

आवळा चवीला आंबट, गोड, कडू, तुरट व किंचित तिखट असतो, सारक असतो, डोळ्यांना हितकर असतो, तिन्ही दोषांना संतुलित करतो, शुक्रधातूचे पोषण करतो.

एकटा आवळा तिन्ही दोषांवर काम कसा करतो, हेही सुश्रुताचार्य सांगतात...
हन्ति वातं तदम्लत्वात्‌ पित्तं माधुर्यशैत्यतः ।
कफं रूक्षकषायत्वात्‌ फलेभ्यो।भ्य़धिकं च यत्‌ ।।...सुश्रुत सूत्रस्थान

आंबट असल्याने आवळा वाताचे शमन करतो; गोड व थंड असल्याने पित्ताचे शमन करतो; तुरट व रूक्ष (कोरडा) असल्याने कफाचे शमन करतो. त्रिदोषांचे संतुलन करणारा असला तरी आवळा प्रामुख्याने पित्तशमन करत असतो.

शरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग
- आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही.
- आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात.
- उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.
- अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.
- नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा किंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो.
- आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग होण्यास प्रतिबंध होतो.
- केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.
- कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते.
- ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते.
- "वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌' म्हणजे तारुण्य टिकविण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांमध्ये आवळा श्रेष्ठ समजला जातो. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.

याच कारणासाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो. च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते. तसेच ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अनेक रसायने आवळ्यापासून तयार केलेली असतात.

भूक लागावी, पचन व्यवस्थित व्हावे, तोंडाला रुची यावी, यासाठी आवळ्याच्या पाचक वड्या किंवा गोळ्या करता येतात. आवळे वाफवून घ्यावेत, त्यांचा गर वेगळा करावा. या गरात जिरे, मिरे, पिंपळी, धने, सुंठ, दालचिनी, सैंधव मीठ, काळे मीठ यांची बारीक पूड घालावी व त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवून ठेवाव्यात. ही वडी किंवा गोळी चघळून खाण्यास उत्तम असते.

पित्तशमनासाठी उत्तम घरगुती औषध म्हणजे मोरावळा. चांगले मोठे आवळे निवडून वाफवावेत, टोचणीने बीपर्यंत टोचावेत, सुती कापडाने नीट पुसून घ्यावेत व तीन-चार तारी साखरेच्या पाकात बुडवून ठेवावेत. 25-30 दिवस मुरले की मोरावळा खाण्यासाठी वापरता येतो. मोरावळा जेवढा अधिक मुरेल म्हणजे जेवढा जुना असेल तेवढा अधिक गुणकारी असतो.

आवळा, आले व लिंबाचा रस यांचे लोणचेही बनवता येते. हे लोणचे रुचकर व पचनास मदत करणारे असते.

आवळा, आले किसून त्याला सैंधव व जिरेपूड लावून उन्हात वाळवून तयार केलेली सुपारी भोजनानंतर सेवन केल्यास पचनास मदत करते, तसेच पित्तशमनासाठी उत्तम असते.

आवळ्याचा उपयोग खालील तक्रारींमध्ये होतो
- खूप उचकी लागत असेल आणि पाणी, साखर वगैरे खाऊनही थांबत नसेल तर आवळ्याचा रस मधात मिसळून थोडा थोडा घेण्याचा उपयोग होतो.
- उलट्या होत असल्यास आवळ्याचे चूर्ण, चंदनाचे गंध व मध यांचे मिश्रण घेण्याने बरे वाटते.
- तापामध्ये तोंडाला शोष पडतो, त्यावर आवळकाठी व द्राक्षे तुपासह वाटून तयार केलेली गोळी तोंडात धरण्याने बरे वाटते.
- उष्णता वाढल्याने योनीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास आवळ्याचा रस साखर मिसळून घेण्याने बरे वाटते.
- स्त्रियांच्या अंगावरून पांढरे जाते, त्यावर आवळ्याच्या आठळीतील बिया पाण्यात वाटून साखर व मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र या बिया मदकारक असल्याने त्यांचे प्रमाण वैद्यांच्या सल्ल्याने ठरविणे चांगले.
- आवळा हा आम्लपित्तावर खूप प्रभावी असतो. आवळ्याचा रस दोन चमचे, दोन चिमूट जिरेपूड आणि चवीनुसार खडीसाखर मिसळून सकाळ-संध्याकाळ घेतल्यास 15 दिवसांत आम्लपित्ताचा त्रास थांबतो.
- पित्त वाढल्याने चक्कर येत असेल तर त्यावरही आवळ्याचा रस दोन चमचे खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

जीवनरसदायी आवळा

डॉ. श्री बालाजी तांबे
केवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला "रसायनाचे' असे फायदे मिळतात.

वाजीकरण व रसायन हा आयुर्वेदाचा महत्त्वाचा विषय. सळसळते तारुण्य हे सप्तधातू-रसांवर व विशेषकरून वीर्यधातूवर अवलंबून असते. अर्थात जगण्यात व जीवनात रस असावा लागतो, हे निश्‍चितच. च्यवनप्राशसारखी काही रसायने आहेतच, पण मोठ्या प्रमाणात हिरडा व आवळा हीच महत्त्वाची रसायनद्रव्ये. योग्य योजनेद्वारा रसायनाने वीर्यवृद्धी होते. शरीरातील संपूर्ण चलनवलन व पेशीपेशीमधील किंवा सर्व अंतर्गत अवयवरचनेतील संदेश देवाणघेवाणसुद्धा रसायनामुळेच व्यवस्थित चालते. जगण्यातील रस हाही व्यक्‍ती-व्यक्‍तीतील संपर्क व संवाद यामुळेच वाढतो व त्यासाठी आवश्‍यकता असते ताकदवान व निरोगी चेतासंस्थेची. या सर्व कार्यासाठी उत्तम पर्याय आहे "आवळा'.

आवळ्याचे अनेक प्रकार असतात. डोंगरी आवळ्यात बी मोठी असते, गर त्यामानाने कमी असतो व गरात धागे अधिक असतात. हे आवळे चवीला अधिक तुरट असतात. काही प्रकारचे आवळे मोठे रसरसशीत, अधिक गर व अधिक रस असणारे असतात. अपरिपक्‍व म्हणजे नीट न वाढलेले आवळे व झाडावरून गळून खाली पडून वाळलेले आवळे औषधाच्या दृष्टीने तेवढेसे उपयोगी नसतात. असे आवळे वाळवून आवळकाठी वा आवळकाठीचे चूर्ण म्हणून विकले जाते किंवा त्यांना भिजत घालून च्यवनप्राशसारख्या रसायनात वापरलेले दिसते. असे कमी दर्जाचे आवळे वापरल्यामुळे अशा वस्तूंचा प्रभाव खूपच कमी झाला असल्याचे दिसते. त्यामुळे अशी उत्पादने स्वस्त वाटली तरी त्यांची उपयोगिता व गुण खूपच कमी असतात.

त्यामुळे औषधांचे उत्पादन करतेवेळी आवळे रसरसशीत व ताजे हवेत. अशा रसरसशीत, ताज्या आवळ्यांचा रस साखरेबरोबर वा मधाबरोबर घेण्याने उपयोग होतो. मीठ लावून आवळे खाण्यात कसा आनंद होतो, हे चार तरुण मुलींना विचारायला हरकत नाही. आवळ्याचे लोणचे हा एक पचनासाठी मदत करणारा अप्रतिम पदार्थ आहे. त्याहीपेक्षा उपयोगी व महत्त्वाचा पदार्थ आहे मोरावळा. साखरेच्या पाकात मुरलेला आवळा म्हणजे मोरावळा. पूर्ण आवळे टोचे मारून गरम पाण्यात किंचित वाफवून साखरेच्या पाकात टाकून किंवा किसून साखरेच्या पाकात टाकून मोरावळा केला जातो. मोरावळा करण्याची कृती कोणतीही असली तरी मोरावळा मुरू देणे म्हणजेच जुना होऊ देणे खूप महत्त्वाचे असते. म्हणून जुना मोरावळा गुणांमध्ये श्रेष्ठ असतो. पित्तशामक म्हणून मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. वाढलेले पित्त- मग ते उन्हाळ्यातील असो वा इतर ऋतूतील- नेहमीच त्रास देते व ते मेंदूचे व डोळ्यांचे अधिक नुकसान करते. अशा वेळी मोरावळ्याचा खूप उपयोग होतो. यकृत व्यवस्थित काम करत नसल्यास किंवा यकृताचा आकार वाढत असल्यास मोरावळ्याचा चांगला उपयोग होतो. अशा वेळी दिवसातून दोनदा मोरावळा खाण्याने खूप उपयोग होताना दिसतो. गुलाबाची फुले साखरेत टाकून तयार झालेला गुलकंद सेवन केल्यासही शरीरात शीतता व शांतता उत्पन्न होते, परंतु ज्यांना गुलकंदाची गोड चव फारशी आवडत नाही, मोरावळ्याची आंबटगोड चव आवडते व ज्यांना पित्तशमनाची अधिक गरज आहे व मुख्य म्हणजे ज्यांना रसायनाचा फायदा हवा आहे त्यांनी मोरावळा सेवन करणे अधिक योग्य ठरते.

केवळ आवळ्याच्या फळातच रसायनाचे गुण आहेत असे नव्हे, तर आवळ्याच्या झाडाच्या वातावरणातही हा गुण आलेला दिसतो. त्यामुळे आवळ्याच्या झाडाच्या सान्निध्यात राहिल्यानेही पित्तशमन, रक्‍तसंवर्धन, रक्‍ताभिसरण वाढून शरीराला "रसायनाचे' असे फायदे मिळतात. म्हणूनच कार्तिक महिन्यात एकादशी ते पौर्णिमा या काळात आवळी भोजन, आवळीपूजन वगैरे करण्याची परंपरा असल्याचे दिसते. या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसावे, विश्रांती घ्यावी, तेथे बसून काही खावे- जेणेकरून झाडाच्या आजूबाजूला असलेल्या प्राणशक्‍तीचा उपयोग होईल, अशी प्रथा असलेली दिसते. भगवान विष्णूंना जशी तुळशी प्रिय आहे तसा त्यांना आवळाही प्रिय आहे. म्हणून आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णुपूजन केल्याने पुण्य मिळते असे म्हणतात.

"आवळा देऊन कोहळा काढणे' अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा, की बारीकशी वस्तू देऊन त्याच्या मोबदल्यात मोठा मोबदला मिळविणे. कोहळा हेसुद्धा रसायनच आहे, पण त्यात सर्व सहा रस नसतात, तर पाच रस असतात. कोहळ्याचाही वीर्यवर्धनासाठी उपयोग होतो. म्हणून आकाराने लहान असलेल्या आवळ्याची तुलना आकाराने मोठ्या असलेल्या कोहळ्याशी करून अशी म्हण व्यवहारात आली असावी.

असा हा बहुगुणी, रसायनी, तारुण्य देणारा, नवजीवन देणारा आवळा. आवळ्यापासून बनविलेला मोरावळा व पूर्ण रसायनात रूपांतर केलेले "संतुलन च्यवनप्राश', "संतुलन अमरप्राश', "संतुलन आत्मप्राश', "संतुलन सुहृद्‌प्राश' असे अनेक प्रकारचे प्राश मनुष्याला आयुष्यवृद्धी व शांती देण्यासाठी खूपच उपयोगी पडताना दिसतात.
---- Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog

ad