Saturday, November 3, 2012

शरदातील पित्तसंतुलन


आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्तसंतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच. 

उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे मुख्य तीन कालविभाग सर्वांना माहिती असतात. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला ऋतू म्हणजे शरद ऋतू. साहजिकच या ऋतूमध्ये एखाद्‌दुसऱ्या सरीचा अपवाद सोडला तर पाऊस जवळजवळ थांबलेला असतो. पावसाळ्यातील काळे ढग जाऊन त्यांची जागा पांढऱ्या ढगांनी घेतलेली असते. दिवसा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे वातावरण चांगलेच तापते, तर रात्री हवेत गारवा जाणवतो. झेंडू, शेवंती वगैरे लाल फुले फुलतात. निसर्गात आणि वातावरणात हे बदल व्हायला लागले, की शरद ऋतू सुरू झाला असे समजता येते.

निसर्गातील प्रत्येक बदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप होतो, त्याचबरोबर पाण्यात वाढलेल्या आम्लतेने पित्तदोष साठायला सुरवात झालेली असते. पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्याऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली, की त्याचा परिणाम म्हणून अगोदर साठलेले पित्त अजूनच वाढते. पित्ताचा प्रकोप होतो. पित्ताचा प्रकोप झाला की पित्ताचे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून शरद ऋतूची सुरवात झाली, की लगेच पित्त संतुलनासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर असते.

पित्त खवळले तर... 
  • शरद ऋतूमध्ये पित्त वाढल्याने होऊ शकणारे त्रास पुढीलप्रमाणे सांगता येतात-
  • हातापायांच्या तळव्यांची आग होणे.
  • डोळे लाल होणे, जळजळणे, पापणीवर रांजणवाडी येणे.
  • शरीर स्पर्शाला गरम लागणे, ताप आल्यासारखे वाटणे.
  • अंगावर गळू येणे, त्यात पाणी किंवा पू होणे.
  • डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे.
  • त्वचेवर लालसर पुरळ उठणे.
  • मळमळणे, डोके दुखणे, उलटी होऊन पित्त पडून जाणे.
  • घशाशी आंबट येणे.
  • तोंड येणे.
  • नाकातून रक्‍त येणे.
  • लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे.
  • फार तहान लागणे, पाणी प्यायले तरी समाधान न होणे.

अर्थात व्यक्‍तीची प्रकृती, तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शरीराची प्रवृत्ती यासारख्या अनेक मुद्‌द्‌यांवरून यापैकी नेमका कोणता त्रास होईल व त्याची तीव्रता कशी असेल हे ठरत असते. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शरद ऋतू सुरू होतो आहे याचे भान ठेवले, खाण्यापिण्यात, वागण्यात आवश्‍यक ते बदल केले तर हे त्रास टाळताही येऊ शकतात.

ऐसा घ्यावा आहार 
पित्त संतुलनासाठी शरद ऋतूत पुढीलप्रमाणे आहारयोजना करायला सांगितली आहे-
  • तत्रान्नपानं मधुरं लघु शीतं सतिक्‍तकम्‌ ।
  • पित्तप्रशमनं सेव्यं मात्रया सुप्रकांक्षितैः ।। ...चरक सूत्रस्थान
  • खाण्यापिण्यात मधुर रस म्हणजेच गोड चव मुख्य असावी.
  • पचण्यास हलके पदार्थ योग्य प्रमाणात सेवन करावेत.
  • आहारात काही प्रमाणात कडू चवीच्या पदार्थांचाही समावेश असावा.
  • थंड स्वभावाचे, पित्तशमन करणारे अन्न सेवन करावे.

भारतीय उत्सव, परंपरा आणि आरोग्य यांचा कायम संबंध असतोच. शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा. या दिवशी खारीक, बदाम, खसखस, साखर वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्तशमनाचा एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदाने फक्‍त शरद पौर्णिमेलाच नाही, तर संपूर्ण शरद ऋतूत चांदीच्या भांड्यात दूध ठेवून सकाळी ते सेवन करायला सांगितले आहे. दूध मुळात शीत स्वभावाचे असते. चंद्राची शीतलताही सर्वांच्या अनुभवाची असते. चांदीसुद्धा शीतल करणारी असते. तेव्हा या तिघांचा संयोग पित्त संतुलनासाठी श्रेष्ठ ठरणारच.

शरद ऋतूत दूध, घरचे लोणी-साखर, साजूक तूप या गोष्टी अमृतोपम होत, कारण हे सर्व पित्तशमनासाठी उत्तम असतात. मुगाचे लाडू, नारळाची वडी, गोड भात, उकडीचे मोदक, दुधी हलवा, कोहाळेपाक हे गोड पदार्थही शरदामध्ये सेवन करण्यास योग्य असतात. कारले, कडवे वाल, मेथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते. साळीच्या लाह्या, मनुका, अंजीर, खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे, फळांमध्ये शहाळ्याचे पाणी, नारळाचे दूध, आवळा, डाळिंब, सफरचंद, केळे, ऊस यांना अधिक प्राधान्य देणे, मोरावळा, गुलकंद, दाडिमावलेह सेवन करणेही शरद ऋतूत पथ्यकर असते.

उकळून गार (सामान्य तापमानाचे) पाणी पिणे, पाणी उकळताना त्यात चंदन, वाळा, अनंतमूळ वगैरे शीतल द्रव्ये टाकणे हेसुद्धा या ऋतूत पित्त संतुलनास मदत करते.

भाज्यांमध्ये दुधी, तोंडली, घोसाळी, दोडका, भेंडी, कोहळा, पडवळ, परवर, चाकवत, पालक अशा पचायला हलक्‍या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे; भाज्या करताना जिरे, हळद, धणे, कोकम, मेथ्या, तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे, हिरव्या मिरचीऐवजी शक्‍यतो लाल मिरची, आले वापरणे हेसुद्धा शरदात पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते.

पित्तदोषाला प्रतिबंध 
शरदामध्ये पित्ताचा प्रकोप होतो हे आपण सुरवातीला पाहिले. कोणत्याही दोषाचा प्रकोप होतो तेव्हा तो दोष वाढलेला तर असतोच, पण स्वतःच्या स्थानातून बाहेर पडलेला असतो. म्हणूनच या अवस्थेत त्याला बाहेर काढून टाकणे सहज शक्‍य असते. साहजिकच शरद ऋतूमध्ये विरेचन करून प्रकुपित पित्तदोष शरीराबाहेर काढून टाकला, तर पुढे वर्षभर पित्तासंबंधी कोणताही विकार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात विरेचन म्हणजे नुसते जुलाबाचे औषध घेणे नव्हे, तर शास्त्रोक्‍त पद्धतीने स्वेदन, स्नेहन वगैरे सर्व पूर्वतयारी करून पित्तदोष लहान आतड्यापर्यंत आणून विरेचनाद्वारा शरीराबाहेर काढून टाकणे हे खरे विरेचन होय. प्रत्येक शरदात जर असे शास्त्रोक्‍त विरेचन करून घेतले तर पचन नीट राहणे, वजन नियंत्रणात राहणे, पर्यायाने कोलेस्टेरॉल, रक्‍तदाब, मधुमेह, हृद्‍रोग वगैरे सर्वच अवघड रोगांना प्रतिबंध करणे शक्‍य असते.

शरदामध्ये पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी नियमित पादाभ्यंग करणेसुद्धा अतिशय उपयुक्‍त असते. शतावरी कल्प, अविपत्तीकर चूर्ण, पित्तशांती गोळ्या वगैरे पित्तशामक रसायने, औषधे या ऋतूत घेणे; जागरणे, उन्हात जाणे टाळणे; धूम्रपान, मद्यपान, मांसाहार वर्ज्य करणे यासारखी काळजी घेतली तर शरदात पित्ताचा त्रास सहन करावा लागणार नाही, उलट शरदातील चांदण्याचा आनंद घेता येईल.

Ayurveda, Vastu shastra, healthy Food, Healthy Living, Abstract India, Shree Balaji Tambe, India, Yoga, Meditation, Life Style, Marathi Blog, Marriages, Love

No comments:

Post a Comment

ad