Tuesday, August 4, 2009

शरीराची निगा -1

आपल्या शरीराला असं फुलासारखं जपलं, तरच ते आपल्याला योग्य ती साथ देतं.

(डॉ. हिमांशू वझे)
चेहरा व मस्तक यांना मालिश केल्याने त्वचेचे व केसांचे आरोग्य वाढते. पुरेशी झोप घेणे, नियमित दिनचर्या, जागरणे टाळणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्वचेच्या तुकतुकीतपणासाठी भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, संत्री, मोसंबी, आंबा, लिंबू, आवळे, टोमॅटो, गाजर, कडधान्ये इत्यादी 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश हवा.
त्वचा हे संपूर्ण शरीराचे आवरण आहे. शरीराचा हा अवयव सर्वाधिक दर्शनीय असल्यामुळे सर्वप्रथम नजरेत भरतो. त्वचा हे महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. इतर ज्ञानेंद्रिये नसली तरी माणूस जगू शकतो; पण त्वचेशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणूनच अपघाताने भाजल्यावर किती टक्के त्वचा जळाली याचा उल्लेख केला जातो. त्वचेमुळे शरीरातील जलसंतुलन होते. शरीराचे तापमान टिकून राहते. बाहेरील जिवाणू-विषाणूंपासून शरीराचे संरक्षण होते. सर्व ऋतूंमध्ये तसेच वयोमानपरत्वे त्वचेची निगा राखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केले पाहिजे.
त्वचा ही आतून सजीव आणि बाहेरून निर्जीव असते. निर्जीव बाह्य आवरणामुळेच कुठलेही जंतू त्यावर तग धरू शकत नाहीत. याला अपवाद मात्र काही फंगसचा (बुरशीचा) असतो. त्वचेवर असंख्य रंध्रे असतात. त्वचेमध्ये तेलग्रंथी ऊर्फ सिबॅशियम ग्लॅंड्‌स असतात. त्या त्वचेवर तेलाचे आवरण निर्माण करतात. याशिवाय त्वचेवर पुरुषांमध्ये नऊ आणि स्त्रियांमध्ये दहा द्वारे असतात. त्वचेमधील सर्व रंध्रे तसेच द्वारांमधून आतील पदार्थ बाहेर येऊ शकतात आणि बाहेरील पदार्थ व घाण आत जाऊ शकते. त्वचेच्या निगेमध्ये मुख्यतः या रंध्रद्वारांच्या स्वच्छतेचा विचार व्हायला हवा.
त्वचा, डोळे, कान, नाक इत्यादी ज्ञानेंद्रिये तसेच तोंड, मूत्रमार्ग, मलमार्ग याची स्वच्छता नियमितपणे करायला हवी. अस्वच्छता हे वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण ठरते. स्वच्छतेविषयी सजगता बाळगताना शरीर हे सतत दुर्गंधीयुक्त पदार्थ बाहेर टाकत असते, हे लक्षात येते. त्यामुळे काही वेळा काही जण "अतिस्वच्छते'च्या आहारी जाऊन झपाटल्याप्रमाणे दिवसातून अनेकदा शरीर स्वच्छ ठेवण्याच्या मागे असतात. शरीर जराही मळलेले त्यांना सहन होत नाही. अस्वच्छता जशी वाईट; तशीच स्वच्छतेची सततची चिंताही वाईट. अस्वच्छतेने शारीरिक आजारपणे येतात, तर अति स्वच्छ राहण्याच्या स्वभावाने मानसिक संतुलन बिघडते. त्यासाठी शरीर हे सतत अस्वच्छ होणारे यंत्र आहे हे लक्षात ठेवून योग्य वेळी योग्य ती स्वच्छता करणे आवश्‍यक आहे.
(क्रमशः)

No comments:

Post a Comment

ad